Articles by "latestnews"

बेलापूर ( प्रतिनिधी)-देवा धर्माच्या नावाखाली सर्व सामान्य नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेवून दैवी शक्तीच्या आधारे विविध आजार बरे करण्याचे खोटे आश्वासन देऊन कुणी बाबा बुवा आर्थिक, शारीरिक, मानसिक फसवणूक करत असेल तर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समीतीशी संपर्क साधवा असे आवाहन अंनिसचे देविदास देसाई यांनी केले आहे.                                     महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला असला तरी श्रीरामपूर तालुक्यासह अहिल्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भोंदूगीरी केली जात आहे भूत ,जादूटोणा,करणी काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे या भोंदू बाबाकडे जाणार्ऱ्यामध्ये महीलांचे प्रमाण मोठे आहे.त्याचा गैरफायदा घेऊन सर्वच धर्मात पसरलेले हे भोंदु बाबा महीलांचे लैंगिक शोषण करत असल्याच्या तक्रारी समितीकडे आलेल्या आहेत.जिल्ह्यात पसरलेल्या या भोंदू बाबाचा अंनिसच्या वतीने भांडाफोड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.त्यामुळे अंधश्रद्धेतून फसवणूक झालेल्यांनी ,देविदास देसाई बेलापूर तालुका श्रीरामपूर या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.आपले नाव गुप्त ठेवले जाईल . श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्यात भोंदूगिरी करणाऱ्या भोंदू बुवा बाबाचे मोठे जाळे पसरले आहे  अंनिसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत जिल्ह्यात भोंदूगिरी करणाऱ्या बाबा बुवावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.लवकरच श्रीरामपूर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक आयोजित करण्यात येणार असुन अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य करण्याची ज्यांना आवड असेल त्यांनी अंनिसशी संपर्क साधावा असेही आवाहनही देसाई यांनी केले आहे.

बेलापूर(प्रतिनिधी)-बेलापूर- श्रीरामपूर रस्त्याच्या दुभाजकात लावलेली झाडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे  वाळत चालली असून वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यामुळे अखेर बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुप बेलापूर यांनी झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली.या उपक्रमाचे  वृक्षप्रेमीकडून  कौतुक केले जात आहे.                                            माजी आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून  बेलापूर -श्रीरामपूर रस्त्याचे चौपदरीकरण होवून  दुभाजकामध्ये  वृक्षारोपण करण्यात आले होते.काही काळ त्याचे संगोपन ही व्यवस्थित झाले. परंतु आता कडक उन्हाळा सुरू झाला असून पाणी न मिळाल्यामुळे अपार मेहनत घेऊन जगवलेली ही झाडे शेवटच्या घटका मोजत आहेत. याप्रमाणेच बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांचीही दुरवस्था झाली आहे.याकडे बेलापूर ग्रामपंचायत सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपने  प्रशासनाचे लक्ष वेधले होते परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.अखेर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष  शरद नवले यांच्या पुढाकाराने बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपने झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली.बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या                                              टँकरव्दारे पाणी दिले जात असून यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान, अविनाश शेलार,दत्तात्रय वक्ते,सुमित शेलार आदी परिश्रम घेत आहेत.                 बेलापूर-श्रीरामपूर  रस्त्याचे दुतर्फा पावसाळ्यामध्ये झाडे लावण्याचा ठेका एका ठेकेदारांनी घेतला. त्याने पावसाळ्यात ती झाडे लावली देखील परंतु त्यानंतर लावलेल्या झाडांची देखभाल न केल्याने झाडांची दूरवास्था होत आहे. त्यामुळे ज्या ठेकेदारांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा ठेका घेतलेला असेल त्या ठेकेदाराकडून   जळून गेलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन वृक्ष लागवड करावी.तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करावे याबाबत संबंधित ठेकेदाराला सुचना देण्याची मागणी बेलापूर बु ग्रामपंचायतीसह सत्यमेव जयते ग्रुपचे सदस्य संजय भोंडगे, विष्णुपंत डावरे,देविदास देसाई,अभिषेक खंडागळे, राधेश्याम अंबिलवादे,बाबासाहेब काळे,राजेंद्र कर्पे,भगीरथ मुंडलिक, दिलीप अमोलिक,बाबुलाल पठाण,विशाल आंबेकर, सचिन कणसे,हाजी इस्माईल शेख, इरफान शेख, किरण गागरे, दिपक क्षत्रिय,विलास नागले,प्रा निजाम शेख, सचिन देवरे,पुंजाहरी सुपेकर, महेश कुऱ्हे, सोमनाथ जावरे,जाकीर शेख,महेश ओहोळ,किशोर दायमा,गोपी दाणी, दिलीप दुधाळ,अर्जुन डुकरे,राहुल माळवदे,सलीम शेख आदींनी केली आहे.

लोणी खुर्द (प्रतिनिधी):राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे गट नंबर 60 मधील शेतकऱ्यांना शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे. रस्ता बंद झाल्याने शेतीकाम तसेच दैनंदिन हालचालींमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गट नंबर 60 परिसरातील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू असताना अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईदरम्यान शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा जुना रस्ता काढून टाकण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. हा रस्ता लहानपणापासून तसेच त्यांच्या आजोबांच्या काळापासून वापरात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी शेतकऱ्यांनी जनसेवा कार्यालयात तक्रार केल्यानंतर 17 जानेवारी 2026 रोजी जलसंधारण अधिकारी, सर्कल अधिकारी, तलाठी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. त्यावेळी लवकरच रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान गट नंबर 61, 62, 65, 66, 67, 68, 69, 70 व 71 या शेतकऱ्यांसाठी ओढ्यातील रस्त्याचा काही भाग कायम ठेवण्यात आला असून गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता मात्र अर्धवट काढून टाकण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.

सध्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना शेजारील शेतातील मका पिकातून जावे लागत आहे. दूध काढण्यासाठी पहाटे व रात्रीही त्याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे जीवितास धोका असल्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर गणेश रमेश काळवाघे, शुभम दत्तात्रेय आहेर आणि निखिल अनिल आहेर यांनी 7 मार्च 2026 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता उपलब्ध करून दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


बेलापूर ( प्रतिनिधी)-देव अंगात संचारला असे भासवून काही भोंदू बाबा आलेल्या भक्तांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण करत असल्याच्या बेलापूर व परिसरात चर्चा सुरू असुन अशा प्रकारे भोंदूगिरी करणाऱ्या बाबा संदर्भात काही तक्रारी असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन अंनिसच्या  राज्य सचिव एडवोकेट रंजनाताई गवांदे, बाबा आरगडे ,देविदास देसाई यांनी केले आहे.       या बाबत अंनिसच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात गवांदे, आरगडे ,देसाई यांनी पुढे म्हटले आहे की बेलापूरातील एका भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने काही महीलांचे लैंगिक शोषण केल्याची परिसरात चर्चा असुन बाबांच्या भितीपोटी व इज्जतीमुळे महीला तक्रार देण्यास पुढे येत नाही.ज्या महीलांची आर्थिक शारीरिक फसवणूक झाली असेल अशा महीलांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी अथवा पोलीस 

स्टेशनमध्ये संपर्क साधावा त्या भोंदू बाबाची भोंदूगिरी समाजासमोर उघड करुन त्याचेवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल . संबंधित भोंदू बाबा विरुद्ध कारवाई करण्याच्या दृष्टीने अंनिसने पावले उचलली असुन त्या भोंदू बाबाने आलेल्या भक्तांकडून मोठ्या रकमा वसुल केल्या असल्याची ही परिसरात चर्चा असुन या बाबाकडे येणाऱ्या मध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांचा भरणा आहे.  राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाखाली हा बाबा महीलांचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती अंनिसच्या कार्यकर्त्यांना मिळाली असुन त्या भोंदू बाबांचे कारनामे दडपण्यासाठी मदत करणाऱ्या पुढाऱ्यांची नावे देखील उघड केली जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर अंनिसच्या राज्य सचिव अँड रंजना ताई गवांदे ,बाबा आरगडे, देविदास देसाई ,छायाताई बंगाळ आदिच्या सह्या आहेत.


बेलापूरच्या 'सत्यमेव जयते' ग्रुपची पाणी देण्याची आग्रही मागणी!

बेलापूर (प्रतिनिधी):

बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याच्या दुभाजकामध्ये लावलेली तसेच दुतर्फा लावलेली झाडे वेळेवर पाणी न दिल्यामुळे  जळून चालली आहेत.त्याचबरोबर  झाडांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळया देखील गायब झालेल्या आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने झाडांचे संगोपन होईल अशी व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी बेलापूर येथील 'सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुप' च्या वतीने पत्रकार देविदास देसाई यांनी केली आहे.

सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की पर्यावरणाचे संतुलन रहावे त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस समोरुन येणाऱ्या वाहनांच्या प्रखर लाईटच्या प्रभाव पडू नये या करीता कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता दुभाथकामध्ये ही झाडे लावण्यात आली होती. सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असून झाडांना वेळेवर पाणी न दिल्यामुळे झाडे वाळत चालली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावुन त्यां झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराला देण्यात आली होती.पावसाळ्यात संबंधीत ठेकेदाराने झाडे लावली पण नंतर त्या झाडाकडे ढुंकूनही पाहीले नाही. लावलेल्या झाडापैकी केवळ पाच दहा टक्केच झाडे कशीबशी तग धरुन आहे. अनेक झाडे पूर्णपणे वाळली असून, काही शेवटच्या घटका मोजत आहेत. शासनाचा पैसा खर्च करून लावलेली ही झाडे जगविणे  संबधीत ठेकेदाराची जबाबदारी आहे.

या संदर्भात 'सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुप' च्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या झाडांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि त्यांची योग्य निगा ठेवावी, असे आवाहन केले आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर सर्व झाडे नष्ट होतील, व केलेला खर्च वाया जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पर्यावरण रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या या ग्रुपने प्रशासनाला तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला झाडाला पाणी देण्याबाबत आदेश करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.या निवेदनावर देविदास देसाई सह अभिषेक खंडागळे ,राधेश्याम अंबिलवादे, संजय भोंडगे, हाजी इस्माईल शेख ,इरफान शेख, किरण गागरे, दिपक क्षत्रिय,सचिन वाघ,विष्णुपंत डावरे ,किरण शेलार,दिलीप अमोलिक, भगीरथ मुंडलीक ,विलास नागले,प्रा निजाम शेख,सचिन देवरे,सचिन कणसे, पुंजाहरी सुपेकर,महेश कुऱ्हे, सोमनाथ जावरे, बाबुलाल पठाण, जाकीर शेख, रवींद्र करपे, विशाल आंबेकर, महेश ओहोळ, गोपी दाणी, दिलीप दुधाळ,बाबासाहेब काळे,अर्जुन डूकरे आदिंसह सदस्यांनी केले आहे

बेलापूर(प्रतिनिधी ): येथील छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा मंडळाचे १९वे वर्ष असून शिवजयंती निमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.                                                       शुक्रवार (६मार्च) रोजी स.१० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन तसेच संध्याकाळी ६वा.महाआरती  व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे शनिवार (७मार्च) रोजी संध्याकाळी ६वा. प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.संग्रामबापू भंडारे यांचे जाहीर हरी किर्तन होणार आहे.सदरचे  कार्यक्रम वीर सावरकर चौक,नगररोड, बेलापूर बु|| याठिकाणी होणार आहेत.तरी याप्रसंगी शिवप्रेमी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन छञपती तरुण मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी केले आहे.

बेलापूर ( प्रतिनिधी)-अहिल्यानगर  माहेश्वरी महीला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ अनुराधा राठी यांची तर जिल्हा सचिव पदी सौ रक्षा बुब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.                                       अहिल्या नगर जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या सन 2026 ते 2028 या कालावधीसाठी नविन कार्यकारिणी निवडण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली.या वेळी कोषाध्यक्ष म्हणून सौ अचला झंवर, संगठन मंत्री म्हणून सौ उषा मुंदडा, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सौ मिना मणियार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून खानदेश विभागाच्या सहसचिव राधा झंवर, रचना मालपाणी व राजश्री मिनीयार उपस्थित होत्या.या वेळी नुतन जिल्हाध्यक्ष अनुराधा राठी म्हणाल्या की संघटनेच्या माध्यमातून महीलांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु तसेच जिल्ह्यातील माहेश्वरी समाजातील महीलांना एकत्र आणून विविध उपक्रम राबविणार असल्याचा मानस सौ राठी यांनी व्यक्त केला.या वेळी माजी जिल्हाध्यक्ष सौ किरण डागा,  गठबंधन समितीच्या सह संयोजीका सौ मंजुश्री धुत, सौ राजश्री मणियार, सुनिता मुंदडा,सौ शोभा बाहेती ,सौ मधुमती धुत आदि प्रमुख महीला उपस्थित होत्या.

बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु असलेल्या घरकुल बांधकामास आसाम राज्याच्या शिष्टमंडळाने भेट दिली.कामाची पाहाणी केल्यानंतर सदर घरकुल वसाहतीबद्दल प्रशंसोदगार काढले.बेलापूरची घरकुल योजना हि पथदर्शक असून अशा पध्दतीचा पॕटर्न सर्वञ राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आसाम राज्याचे ग्रामविकास विभागाचे सहआयुक्त धृवज्योती नाथ यांनी केले.                                                                आसाम राज्याच्या शासकीय शिष्टमंडळाने बेलापूरच्या घरकुल वसाहतीस भेट दिली.सदरच्या शिष्टमंडळामध्ये श्री.धृबज्योती नाथ(सहआयुक्त, पंचायतराज व ग्रामविकास आयुक्तालय,आसाम)श्री. रणजीत दास(एस.पी.ई.पंतप्रधान ग्रामीण आवास योजना ,आसाम), श्री.निलोतनाथ मिश्रा(एस.पी.ई.पंतप्रधान ग्रामीण आवास योजना,आसाम) यांचेसह अहिल्यानगर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे श्री.किरण साळवे आदि सहभागी होते.          यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच सौ. मीनाताई साळवी, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी घरकुल कामाबाबत सविस्तर माहिती दिली. सदर प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर बेलापूरची घरकुल योजना पथदर्शक असून हा पॕटर्न सर्वञ अवलंबला जावा असे मत या प्रतिनिधींनी व्यक्त केले.                       यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे, इंजिनिअर विकास पगारे,हर्षल दांगट,गणेश गोरे, शरद त्रिभुवन,जालिंदर कुऱ्हे, भाऊसाहेब कुताळ,पुरुषोत्तम भराटे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,अँड.अरविंद साळवी,जाकीर हसन शेख,मोहसीन सय्यद,प्रभात कुऱ्हे,शफिक बागवान,जाकीर शेख,शफिक शेख,सौरभ बनकर,दादासाहेब कुताळ,बबन गायकवाड,विशाल सुरडकर, सुनिल हिवराळे,संतोष मगर,आकाश वाद्ये, अमजद शेख,ग्रामपंचायत कर्मचारी सचिन साळुंके,बाबासाहेब प्रधान आदी उपस्थित होते.*

बेलापूर-( प्रतिनिधी)-गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुलात सुरु असलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे पित्त खवळलेल्या सत्ताधाऱ्यांनी पत्रकबाजी सुरु केली असुन ही पत्रकबाजी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे माजी सरपंच महेंद्र साळवी व सदस्य रमेश अमोलीक यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .साळवी व अमोलीक यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की घरकुलाच्या चौकशी करीता गटविकास अधिकारी म्हस्के यांनी उपोषण सोडविताना ज्या बारा  मागण्या केल्या होत्या त्यात सत्यता असल्यामुळे चौकशी समीतीची नियुक्ती करुन सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या चौकशी समीतीमुळे आपली लबाडी उघड होण्याच्या भितीमुळे सत्ताधारी गडबडले आहेत ही बाब नागरिकांच्या लक्षात येणार असल्याने चुकीच्या पद्धतीच्या कामावरील लक्ष विचलित करण्यासाठी गावातील काहींना  हाताशी धरून गटविकास अधिकारी मस्के साहेब यांना निवेदन देऊन चौकशीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे तसेच माजी सरपंच भरत साळुंके व सभापती सुधीर नवले यांच्या खाजगी बांधकामाची चौकशीचे आदेश घेण्यात आले .मुळात बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये बांधकाम कायदेशीर  कि बेकायदेशीर हे पाहण्याचा अधिकार ग्रामपंचायत प्रशासनाला आहे  यांच्या बांधकामाची चौकशी सरपंच व ग्रामसेवक यानी करणे गरजेचे असताना चौकशीचा फार्स कशासाठी आम्ही मांडलेल्या मुद्द्यापैकी घरकुलाच्या बाबत सरपंचांना गावातील गावकरी मडळाचे पुढारी व ठेकेदार चुकीची माहिती दिलेली दिसते कारण माननीय ना राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी शासनाकडून बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतला जी जमीन देण्यात आली त्यामध्ये काही अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मुख्य अट हि बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत च्या नावे जमीन झाल्यानंतर सदरच्या जमिनीचा लेआउट तयार करून नगरचना विभाग श्रीरामपूर यांचे कडून रेखांकन मंजूर करून सदरील भूमिहीन लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीने पाचशे स्क्वेअर फुट जागा वाटप करण्यात यावी असे असताना ग्रामसभेत दोन तास चर्चा करून ज्या लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीत भाग घ्यायचा आहे त्यांच्या सोबत काढुनी 500फुट जागा त्यांच्या ताब्यात द्यावी असे ठरलेले असताना खाजगी ठेकेदाराकडे एक लाख 35 हजार रुपये रोख स्वरूपात जमा करणारे हे कोण असा सवाल साळवी व अमोलीक यांनी केला असून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गरीबांच्या घरकुलासाठी जमीन देवुन ही सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे लाभार्थी घरकुलापासुन वंचित राहु शकतात.  रेखांकन मंजूर न करता घरकुल बांधण्याची घाई का केली जात आहे तसेच सुमारे 400 लाभार्थींची ओटीपी नंबर घेऊन वाळू कोणाच्या बांधकामावर गेली किंवा त्याची विक्री करण्यात आली याची चौकशी होणे गरजेचे आहे तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवेदन दिलेले होते. त्या नीवेदनातील सर्व बाबी समजून सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून याची सत्यता जाणून घेतली व ती केलेली मागणी योग्य असल्यामुळे  तालुक्यामध्ये कुठल्याही गावांमध्ये चुकीच्या पद्धतीने काम होऊन देणार नाही मागील एक वर्षांमध्ये मा आमदार हेमंत ओगले यांनी बेलापूर ग्रामपंचायत परिसरात एक कोटी दहा लाख रुपयांची कामे मंजूर केली असून यावर्षी एक कोटीचे विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेले आहेत.असे असताना जर कुणी आंदोलन करण्याची धमकी देत असेल तर प्रति आंदोलन करण्याची आमची तयारी आहे मागील चार दिवसांपूर्वी मा गटविकास अधिकारी श्रीरामपूर पंचायत समिती यांनी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच यांच्या पत्रावरून लाभार्थींना दुसरा हप्ता देण्यात यावा अशी मागणी केली होती ती जर बरोबर असेल तर गटविकास अधिकारी श्रीरामपूर यांनी जोपर्यंत रेखांकन मंजूर होऊन जागावाटप होत नाही व जिओ टॅगिंग संबंधित लाभार्थींच्या व ग्राम विकास अधिकारी यांच्या फोटोसह मला उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत दुसरा हप्ता देणार नाही अशा आशयाचे पत्र बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतला देण्यात आलेले आहे बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये मागील पाच वर्षांमध्ये कोणत्या नेत्याचे चिरंजीव काम करतात हे नागरिकांना वेगळे सांगण्याची गरज नाही कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा अधिकाऱ्यांना इतर गावातील कामांच्या नावाने ब्लॅकमेलिंग करून बिले काढण्याचा धडाका संबंधित गावपुढ्यार्यानी केलेला आहे सरपंच सौ साळवी यांनी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील झालेल्या कामांची पाहणी करून चौकशी करावी आपला बोलवता धनी कोण आहे हे सर्व जनतेला माहित आहे व सर्व जनतेला झेंडा चौकात वरील सर्व कागदपत्र घेऊन मी दाखवायला तयार आहे त्यामुळे बेलापूर येथील नागरिकांनी या गाव पुढ्याया पासुन  सावध राहावे असे आव्हान माजी सरपंच महेंद्र साळवी व ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी केले आहे

बेलापूरःबेलापूरची घरकुल योजना पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा. यांचे संकल्पनेनुसार सुरु आहे.सदर योजनेबाबात आमदारांना बिल्डर लाॕबीकडून चुकीची माहिती दिली जात असल्याने आमदार अधिकाऱ्यांवर दबाव आणून आडकाठी आणित आहेत.वास्तविक सदर योजनेच्या स्वरुपास व योजनेस आमदारांनी आमसभेमध्ये संमती दिली.आता तेच  गोरगरीबांच्या सदर योजनेस सहकार्य करणेऐवजी ह्या योजनेत बाधा आणित आहेत.यामुळे गोरगरीब बेघरांना योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.त्यामुळे आमदारांनी चुकीची माहिती देणा-यांच्या सांगण्यावरुन घरकुलाचे कामात बाधा आणल्यास घरकुल योजनेच्या  लाभार्थ्यांचा आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सरपंच  मिनाताई साळवी यांनी दिला आहे.               सौ.साळवी म्हणाल्या की,बेलापूरची घरकुल योजना हि राज्यात आदर्श ठरावी यासाठी नाम.विखे पा. व नाम.गोरे यांनी काही मार्गदर्शक सुचना केल्या.सदर योजनेबाबत आमदारांनी आयोजित केलेल्या आमसभेत सविस्तर चर्चा देखिल झाली.यावेळी योजनेचे सविस्तर स्वरुप व तपशील सविस्तरपणे मांडण्यात आला.तेव्हा आमदारांनी त्यास संमती दिली. माञ या योजनेमुळे बिल्डर लाॕबीच्या हितसंबंधास  बाधा येणार असल्याने  सुधीर नवले,भरत साळुंके ,रविन्द्र खटोड आदि नेत्यांनी काही जणांना चिथावणी देवून मोर्चे,उपोषणे करायला लावले.तसेच या कानभ-या नेत्यांनी आमदारांना चुकीची माहिती देवून अधिका-यांवर दबाव आणणे भाग पाडले.अशाच त-हेने या महाभागांनी महिलांच्या सार्वजनिक शौचालयाला विरोध करुन ते काम बंद पाडले.एकीकडे हे महाभाग स्वतःला नाम.विखे पा.यांचे सरर्थक म्हणवतात तर दुसरीकडे नाम.विखे पा.यांच्या संकल्पनेतील घरकुल योजनेस विरोध करण्याचा  दुटप्पीपणा करतात असा आरोप सौ.साळवी यांनी केला.                                                             घरकुल योजनेचे काम चुकीच्या पध्दतीने होत असल्याचा आरोप तथ्यहिन असून हि निवडणुका जवळ आल्याने होणारी राजकीय स्टंटबाजी आहे.आरोप करणारांनी तक्रारीत नमुद केल्यानुसार  घरकुल योजना राबवायची तर उपलब्ध जागेत फक्त ५३७ इतकीच घरकुले बसतील.यामुळे ५०० लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागेल.या वंचित ५०० लाभार्थ्यांना घरकुले देण्याची जबाबदारी आमदार व तक्रार करणारे घ्यावयास तयार आहेत काय आसा सवाल सौ.साळवींनी उपस्थित केला.                    अशी वस्तुस्थिती असल्याने आमदारांनी या योजनेच्या कामाची समक्ष  पाहणी करुन योजनेची सविस्तर माहिती घ्यावी. चुकीच्या माहितीला बळी पडून स्वतःची अडचण करुन घेवू नये.अशाचत-हेने काहिजणांच्या चुकीच्या माहितीवरुन आमदारांनी टिळकनगर इंडस्ट्रिजबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने त्यांना कामगारांसह नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते.तसेच नंतर दिलगीरी व्यक्त करावी लागली होती याची आठवण ठेवून आमदारांनी चुकीच्या माहितीच्या आधाराने घरकुल योजनेत बाधा आणून गोरगरीब लाभार्थींचा रोष पत्करु नये.अशाच पध्दतीने दत्तनगर येथे रो हऊसिंग पध्दतीचे काम केले जात आहे.तोच पॕटर्न नाम.विखे पा.यांचे सुचनेवरुन स्विकारुन घरकुलांचे काम सुरु आहे.तेव्हा आमदारांनी बिल्डर लाॕबीच्या दिशाभुलीला बळी पडून गोरगरीबांना उघड्यावर पाडू नये असे.उलट या योजनेस मार्गदर्शन  व सहकार्य करावे.तसेच ग्रामस्थांनी आमदारांना मते दिली असल्याने गावातील अरुणकुमार वैद्यपथ,मेनरोड-केशव गोविंद मंदिर रस्ता,कु-हे वस्ती, जामा मशिद - गणपती  मंदिर-ते महादेव मंदिर रस्ता आदि रस्त्यांचे कामांना आमदारनिधी द्यावा असे आवाहन सौ.साळवी यांनी केले आहे.

बेलापूर (प्रतिनिधी):येथील छ.शिवाजी महाराज चौकात   भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त  ह.भ.प. मोहन खानविलकर महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजन तर बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे  यांचे हस्ते सृष्टीचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या विश्वकर्मा महाराजांच्या प्रतिमेचेवस पुष्पहार अर्पण करण्यात आले.               

     प्रतिमा पूजनानंतर  उपस्थितांनी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी भरत साळुंके ,अभिषेक खंडागळे ,रविन्द्र खटोड, प्रकाश कुऱ्हे, पञकार नवनाथ कुताळ,सुहास शेलार,दिलिप दायमा, बाळू शेठ खातीजी, चंद्रकांत पाटील नाईक,  रमेश अमोलिक, श्रीराम शर्मा, संजय शर्मा, सुरज शर्मा, प्रशांत लढा, राधेश शर्मा, राजेंद्र पोपळघट, जालिंदर शिंदे, गोविंद गाडेकर, शफिक आतार, नितीन शर्मा, दत्तात्रय कुऱ्हे, सोमनाथ शिरसाठ, महादेव गाडेकर, ऋषी वाकचौरे, रामभाऊ वाकचौरे, गोविंद भराटे आणि सुनील कुऱ्हे आदिंसह  ग्रामस्थ व कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूर ( प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर बु!! मराठी शाळा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .शाळेतील सर्व मुली व मुले यांचे  कवायत व लेझीम घेण्यात आली उद्देशकांचे वाचन व असाक्षरता प्रतिज्ञा घेण्यात आली. ध्वजारोहण पोलीस पाटील अशोक प्रधान व  बोरुडे सर यांच्या हस्ते करण्यात आले विविध गुणदर्शन स्पर्धेत सहभागी असणाऱ्या मुला-मुलींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले, या वेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनोगत, देशभक्तीपर गीत गायन सादर  केले, बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने मुलांना रेवडी ( खाऊ) वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे व राजाभाऊ काळे, मोकाशी दादा, श्रीमती निमसे ताई यांच्या वतीने देखील खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी. जि. प. सदस्य श्री शरद  नवले पाटील , व माजी उपसरपंच व  ग्रामपंचायत सदस्य  श्री. अभिषेक खंडागळे पाटील, श्री. अरुण पाटील नाईक, सरपंच श्रीमती मीनाताई साळवी, शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.तुफेल अहमद सय्यद,शाळा व्यवस्थापन समिती मुली अध्यक्ष निमसे ताई व माजी विद्यार्थी संघ मेळावा अध्यक्ष श्री. शाहरुख भाई शेख, उपाअध्यक्ष, राज गुडे, कृष्ण भागवत  अंगणवाडी सेविका शेलार ताई, तेलोरे ताई, बेलापूर मुले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उदमले मॅडम, उपमुख्यधापिका सौ. अंत्रे मॅडम, शिंदे मॅडम, देवढे मॅडम बेलापूर मुली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दहिवाळ मॅडम उपमुख्याध्यापिका सौ. भवार मॅडम, श्रीमती. परदेशी मॅडम दोन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

बेबेलापूर (प्रतिनिधी )-जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेलापूरच्या विकासासाठी व गोरगरिबांच्या घरकुलाकरीता विनामूल्य जमीन दिली. परंतु सत्ताधारी स्वतः चे खिसे भरण्याच्या  व श्रेय लाटण्याच्या नादात घरकुल योजनेलाच हरताळ फासत असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड व माजी सरपंच  भरत साळुंके महेंद्र साळवी, रमेश अमोलीक यांनी पत्रकार परिषदेत केला.       बेलपुरात एकाच दिवशी दोन आमरण उपोषण सुरू झाले व त्याच दिवशी ते उपोषण सुटले याबाबत सत्ताधाऱ्याकडून खुलासे करण्यात आले त्या खुलाशाला उत्तर देण्याकरता बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप करण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी सरपंच महेंद्र साळवी व ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश आमोलिक यांनी सांगितले की शासनाने गोरगरिबा करता घरकुल योजना सुरू केली परंतु सत्ताधारी त्या योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वसुली करत आहेत घरकुल योजना पारदर्शक पद्धतीने राबविणे आवश्यक असताना सत्ताधारी मनमानी पद्धतीने कामकाज करत आहेत वास्तविक सर्व घरकुल लाभार्थ्यांची चिठ्ठ्या टाकून कोणाचे घरकुल किती नंबरला आहे हे निश्चित केले पाहिजे होते.प्रत्येक लाभार्थ्यांना नियमानुसार 500 चौरस फुट जागा वाटप करुन देणे आवश्यक होते परंतु तसे न करता मनमानी पद्धतीने घरकुल वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर कॉलनी बांधण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाभार्थ्याकडून पैसे उकळण्यात येत आहेत .या कामाचा ठेका खाजगी व्यक्तीला देण्यात आला असुन त्या व्यक्तीची नेमणूक कशी केली त्याच दर्जाच्या व्यक्ती गावात नव्हत्या का? संबंधित व्यक्ती लाभधारकाकडून १३५०००रुपये वसलं करत आहेत त्याना वसुलीचे अधिकार कुणी दिले.लाभधारकाकडून सक्तीने संमतीपत्र कुणी लिहून घेतले त्यामुळे ही वसुली पुर्ण पुणे बेकायदेशीर आहे तसेच या घरकुल योजनेची लेआउट मंजूर नाही घरकुल योजने करीता आवश्यक त्या विभागाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही बेलापूर ग्रामपंचायतीने सर्व कायदेशीर प्रक्रियां डावलून खाजगी ठेकेदाराची नेमणूक करून सरपंच उपसरपंच व सत्ताधारी यांनी संगनमताने व चुकीच्या पद्धतीने घरकुल योजना राबवून लाभार्थ्यांचे फसवणूक सुरू केलेली आहे त्यामुळे हे लाभार्थी पैसे देऊनही घरकुला पासून वंचित राहू शकतात.लेआऊट मंजुरी शिवाय जागावाटप न करता बांधकाम सुरु राहील्यास लाभार्थ्यांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे या योजनेची निष्पक्ष चौकशी करावी व चुकीचे नियमाला डावलून काम करणारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यांनी केली आहे.

बेलापूरःराष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त काशी येथील मनकर्णिका घाट येथील नरसिंह मठ आयोजित श्रीमद कथेदरम्यान वैदिक विद्यार्थी महेश दायमा याचा विशेष गौरव करण्यात आला.            काशी येथील मनकर्णिका पिठाने श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे.याप्रसंगी आळःदी येथील तपोवनव्दारा आयोजित वैदिक परिक्षेत रामजन्मभुमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी यांचे हस्ते सुवर्णमुद्रिका प्राप्त आचार्य महेश दायमा यांस सन्मानित,करण्यात आले.सध्या महेश दायमा काशी येथे वैदिक शिक्षण घेत आहे.                             महेश दायमा हा पञकार दिलिप दायमा यांचा मुलगा आहे.त्याच्या या सन्मानाबद्दल पञकार भास्कर खंडागळे,मारुतीराव राशिनकर ,रणजीत श्रीगोड,अशोक गाडेकर,सुनिल मुथा,नवनाथ कुताळ,देविदास देसाई,ज्ञानेश गव्हले,सुनिल नवले,विष्णुपंत डावरे,सुहास शेलार,दिपक क्षञिय,गोविंद साळुंके ,आतिश देसर्डा,शरद पुजारी,शफिक बागवान,भारत थोरात आदिंनी अभिनंदन केले आहे.

बेलापूर ( प्रतिनिधी )-बेलापूर ग्रामपंचायत  हद्दीतील बेलापूर बुद्रुक व ऐनतपुर  येथील भरत अशोक साळुंके यांच्या मालकीच्या विविध गट नंबर मधील बांधकामाची माहिती नकाशे मिळावे तसेच बेलापूर बुद्रुक हद्दीतील संस्कृती मंगल कार्यालयाची व्यापारी दराने पट्टी आकारण्यात येऊन सन 2004 पासून त्याची वसुली करण्यात यावी या मागणीकरता मयूर प्रकाश खरात व सुरज रणनवरे हे बेलापूर ग्रामपंचायत उपोषण बसले असून आज बेलापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर एकाच वेळी दोन उपोषणे सुरू झालेले आहेत. बेलापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर आज दोन  मागण्याकरिता दोन ठिकाणी आमरण उपोषण सुरू झाले असून मयूर प्रकाश खरात व सुरज मायकल रणवरे यांनी आपल्याला विविध माहिती वेळेत न मिळाल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यांची मागणी अशी आहे की बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील भरत अशोक साळुंके यांच्या मालकीच्या गट नंबर 3/1/2 या गटामध्ये रहिवाशी प्रयोजनासाठी झालेल्या बिनशेती क्षेत्राचे मंजूर रेखांकन बांधकाम परवानगी तसेच सर्व कागदपत्राची सत्यप्रत मिळावी त्याचबरोबर बेलापूर बुद्रुक अंतर्गत साळुंखे यांच्या मालकीचे गट नंबर 44/2/16 या गटामध्ये वाणिज्य प्रयोजनासाठी झालेल्या बिन शेती क्षेत्राचे मंजूर रेखांकन नकाशे बांधकाम परवानगी तसेच सर्व संदर्भातील कागदपत्रे मिळावी त्याचबरोबर साळुंके यांच्या गट नंबर तीन ऑब्लिक एक ऑब्लिक दोन या गटातील रहिवासी प्रयोजनासाठी झालेल्या बिनशेती क्षेत्राचे मंजूर रेखांकन कसे मिळावे त्याचबरोबर साळुंखे यांच्या गट नंबर 153/2 मध्ये बेलापूर बुद्रुक हद्दीतील संस्कृती मंगल कार्यालय बांधलेले असून  मंगल कार्यालयात पट्टी ही व्यापारी दराने आकारण्यात यावी. समोर असलेल्या सद्गुरु मंगल कार्यालयाला 25000 पट्टी आहे मग संस्कृती मंगल कार्यालयाला 5000  पट्टीच का असा सवाल त्यांनी केला आहे त्याचबरोबर सन 2004 पासून नवीन व्यापारी दराने आकारणी करून त्याची वसुली करण्यात यावी या मागणी करतात घरात व रणवरे हे उपोषणास बसलेले आहेत गावात एकाच वेळी दोन उपोषण सुरू झाल्यामुळे नागरिकात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे

बेलापूर -(प्रतिनिधी)- बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत ने अकराशे घरकुलाचे बांधकाम सुरू केले असून घरकुलाची जागा कुणाचेही नावावर नसताना चुकीच्या पद्धतीने बांधकाम सुरू केले याबाबत वारंवार निवेदन देऊनही काहीच कारवाई झाली नाही त्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 21 जानेवारी पासून ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे .उपोषणाबाबत त्यांनी सर्व संबंधितांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की बेलापूर ग्रामपंचायत घरकुल रेखांकन व जागावाटप याबाबत गांभीर्याने घेणे टाळत आहेत. बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतने घरकुल बांधकाम सुरू करताना जो गाजावाजा केला तो केवळ दिखाऊ पणा होता. घरकुल कॉलनी बांधकाम करत असताना नियमानुसार काम केले नाही. आपण कोणाच्या आदेशाने हे काम चालू केले व चालू केलेले काम कोणाचे आहे हे सांगू शकत नाही. ग्रामपंचायतच्या 31 डिसेंबर रोजी झालेल्या मासीक बैठकीत सदस्य भरत साळुंके व रमेश अमोलीक यांनी लेआउट बाबत विषय मांडला होता ज्या अभियंतेकडून ले,आऊट केले आहे तो अभियंता व गावातील विविध अभियंते जे विषयात तज्ञ आहेत आणि त्यात काम करत आहेत तसेच नगररचना विभागातील अधिकारी यांची एकत्रित बैठक घ्यावयाचे ठरले होते.परंतु तसे केले नाही. ज्या लोकांना कॉलनीत घर बांधण्याची ऐपत नाही अशा लोकांना 500 चौरस फूट जागा वाटून देण्याचे ठरलेले असतानाही जागा वाटप करून न देता घरकुल कॉलनीचे काम जोरात सुरू केलेले आहे हे करत असताना सर्व नियम धाब्यावर बसवलेले आहे घरकुल वाटप करताना चिठ्ठ्या टाकून घरकुल वाटप केले पाहिजे होते . परंतु यातही वशिलेबाजी होताना दिसत असल्याचा आरोप अमोलीक यांनी केला आहे आपला स्वार्थ साधना करता सुमारे अकराशे घरकुल कुणाचे नावावर जागा नसतानाही त्या जागेवर घरकुलाचे बांधकाम सुरू केलेले आहे याबाबत वारंवार निवेदन देऊनही काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले घरकुलाचे काम थांबून अगोदर घरकुलाची जागा वाटप करून मगच बांधकाम केले जावे या मागणी करता त्या देशामुळे आजपासून बेलापूर ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे

लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी 'वृत्तपत्र' हा चौथा स्तंभ मानला जातो.  अनेकदा काहिजण कोणत्याही घटनेसाठी पत्रकाराला जबाबदार धरतात. त्यांच्यावर दबाव आणतात किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. आजही श्री.विक्रम नाईक यांनी पञकारावर अप्रस्तुत टिका केली आहे.पञकारांवर आरोप केले आहेत.याचा प्रथमतः बेलापूर प्रेस क्लब निषेध करीत आसून श्री.नाईक यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त करावी अशी मागणी करीत आहे.                     

आम्ही पत्रकार कुणाचे 'पगारी' नोकर नाही किंवा कोणाचे बाःधिल नाही. पञकाराने काय करावे हे शहाणपण कोणी शिकवायची गरज नाही.बेलापूर प्रेस क्लबचे  पत्रकार सदस्य समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून काम करत असतात.

बातमीची निवड हा पत्रकाराचा विशेष अधिकार आहे. कोणती बातमी प्रसिद्ध करावी आणि कोणती करू नये, हा सर्वस्वी त्या पत्रकारांचा आणि त्यांच्या संपादकांचा निर्णय असतो. बातमीचे महत्त्व, तिची सत्यता आणि समाजावर होणारा परिणाम तपासूनच बातमी लावली जाते. पत्रकारावर कोणत्याही बाह्य व्यक्तीने किंवा शक्तीने बातमीसाठी दबाव आणणे हे बेकायदेशीर आणि नैतिकतेच्या विरोधात आहे.

पत्रकार संरक्षण कायद्या सारखे पत्रकारांचे कायदेशीर कवच तरी काही अतिउत्साही व्यक्ती पत्रकारांना उद्देशून अपशब्द वापरतात किंवा टिकाटिपणी करतात.  महाराष्ट्र सरकारने 'पत्रकार संरक्षण कायदा' (२०१७) लागू केला असून त्यातील प्रमुख तरतुदीनुसार कलम ३ व ४: पत्रकारावर हिंसाचार करणे किंवा त्याच्या कामात अडथळा आणणे हा गंभीर गुन्हा आहे. कलम ५ नुसार सदर गुन्हे हे 'दखलपात्र  आहेत.                            तुमच्या राजकारणात पञकारांना आणू नका.पञकारांना राजकारणाशी काहिही घेणेदेणे नाही.दुसरे व्यक्ती वा नागरिक म्हणून पञकार स्वतंञ आहे.त्याची व्यक्ती म्हणून राजकीय विचारधारा असणे हा त्याचा नागरी अधिकार आहे.तेव्हा नागरीक म्हणून पञकाराने कोणी कोणाची  बाजू घ्यवी वा कोणाचे समर्थन करावे हा व्यक्तीगत प्रश्न आहे.त्याबाबत आक्षेप घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.यापुढे अशाप्रकारची टिका प्रेस क्लबचे पञकार  सहन करणार नाहित,याची दखल घ्यावी.   याविषयी अनेक पत्रकार संघटनांनी  जाहीर निषेध करत वरिष्ठ अधिकारी यांना भेट घेणार असल्याची माहिती देखील दिली आहे कोणीही पत्रकारावर राजकीय ताबा आणू नये पत्रकारांना त्यांचे काम करून द्यावे या पद्धतीचे लवकरच निवेदन संबंधित प्रशासनाकडे माहिती मिळत आहे यावेळी            भास्कर खंडागळे(अध्यक्ष), सुहास शेलार(उपाध्यक्ष),रणजित श्रीरामपूर (सचिव),सुनिल मुथा(कोषाध्यक्ष ),विष्णुपंत डावरे(सहसचिव),सदस्यःअशोक गाडेकर,ज्ञानेश्वर गव्हले,देवीदास देसाई,नवनाथ कुताळ,सुनिल नवले,दिपक क्षञिय,दिलिप दायमा,गणेश साळुंके,शरद पुजारी,आतिष देसर्डा

सत्ता, पैसा आणि संपूर्ण यंत्रणा विरोधात असतानाही केवळ ११ मतांच्या फरकाने झालेला पराभव हा साधा निकाल राहिलेला नाही, तर तो संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. समोर दोन वेळा आमदार राहिलेले, साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे वजनदार नेते होते. त्यांनी सगळी ताकद पणाला लावली, तरीही विरोधकाला संपवू शकले नाहीत, हेच या निकालाचे मोठे वास्तव आहे.

“मी ११ मतांनी हरलो आहे, पण भीतीने नाही, झुकून नाही, विकून नाही,” अशा ठाम शब्दांत उमेदवाराने आपली भूमिका मांडली. हा निकाल एकच गोष्ट स्पष्ट करतो — जुन्या राजकारणाची मक्तेदारी आता हादरली आहे. लोकांचा आवाज दबवता येत नाही, उलट तो अधिक बुलंद होत चालला आहे.

पराभव जरी स्वीकारावा लागला असला, तरी गावागावात एकच चर्चा — ‘११ मतांची हळहळ’ सुरू आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या उमेदवाराने थेट कारखानदारी आणि प्रस्थापित सत्तेला टक्कर दिली. पराभव असूनही जनतेच्या नजरेत ते ‘हिरो’ ठरले आहेत. “आज हरलो असेन, पण उद्याच्या लढाईसाठी अधिक ठाम, अधिक आक्रमक आणि अधिक सज्ज आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या निकालानंतर स्वीकृत नगरसेवक पदाच्या न्याय्य हक्काचा प्रश्नही चर्चेत आला आहे. “हा न्याय कोण देणार?” असा सवाल उपस्थित होत असून, विखे साहेब न्याय देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकूणच, हा पराभव नसून तो सामान्य माणसाच्या संघर्षाचा विजय मानला जात आहे. ही लढाई इथे थांबत नाही, तर खऱ्या अर्थाने आता सुरू झाली आहे, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - वृत्तपत्र क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारारा ज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर 'दर्पण पुरस्कार' येथील दैनिक स्नेहप्रकाशचे मुख्य संपादक प्रकाश बापूराव कुलथे यांना जाहीर झाला आहे. ६ जानेवारी पत्रकार दिनी सदरचा पुरस्कार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव असलेल्या कोकणातील पोंभुर्ले,ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग येथे स्मारक म्हणूनउभारलेल्या दर्पण सभागृहात समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या पत्रकारांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.राज्यातील अनेक नामवंत संपादक व ज्येष्ठ पत्रकारांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील महाराष्ट्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

श्री.प्रकाश कुलथे हे गेली ३५ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत.स्नेहप्रकाश प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असून आत्तापर्यंत शेकडो पुस्तके प्रकाशित करून लेखकांना प्रोत्साहित केले आहे.


श्री.प्रकाश बापुराव कुलथे यांनी आपल्या यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या सामाजिक वृत्तपत्रे क्षेत्रात अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते

 दैनिक स्नेहप्रकाश चे मुख्य संपादक असून साप्ताहिक वर्ल्ड सामना चे संस्थापक संपादक, वृत्तपत्र व प्रसार माध्यम राज्य अधीस्विकृती समिती, महाराष्ट्र शासन सदस्य,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी चे विश्वस्त,श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर लाड सुवर्णकार संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक चे उपाध्यक्ष,महाराष्ट्र संपादक परिषद,मुंबई चे कार्याध्यक्ष,

महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा श्रीरामपूर चे कार्याध्यक्ष, श्रीरामपूर पत्रकार संघाचे सचिव, हिंद सेवा मंडळाच्या क. जे. सोमैय्या हायस्कुल, श्रीरामपूर चे सदस्य म्हणून काम पाहत असून नुकतीच त्यांची इंडियन लँग्वेजेस न्युज पेपर असोसिएशन (इलना) या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

यापूर्वी पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार हा वृत्तपत्र क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देखील त्यांना आता जाहीर झाला आहे.श्रीरामपूर शहर तसेच जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने हा संपूर्ण श्रीरामपूरकरांचा सन्मान आहे असे मानले जात आहे.श्री कुलथे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील तील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –  तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घटना काल घडली. उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील शिव आरोग्य सेना प्रमुख म्हणून ओळख असलेले आणि सामाजिक उपक्रमांमुळे तालुक्यात विशेष लोकप्रियता मिळवलेले डॉ. महेश शिरसागर यांनी काल भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला हा प्रवेश सोहळा केवळ मोठ्या उत्साहातच नाही, तर भविष्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे संकेत देणारा ठरला.


 श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नामदार विखे पाटील हे श्रीरामपूर दौऱ्यावर असताना   हा पक्ष प्रवेश करण्यात आला  डॉ. महेश शिरसागर यांनी शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून तालुक्यात रुग्णसेवा, आरोग्य शिबिरे, रक्तदान, सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीतील  राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


यावेळी बोलताना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “श्रीरामपूरचा विकास, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांमध्ये हा प्रवेश निर्णायक ठरेल. युवकांना नेतृत्व मिळावे आणि सामाजिक कार्याला दिशा मिळावी, या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपच्या माध्यमातून श्रीरामपूरचा विकास अधिक वेगाने होईल.”


दरम्यान डॉ. शिरसागर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “ही केवळ राजकीय पायरी नाही तर समाजसेवेच्या कार्याला नवा आयाम देण्याचे पाऊल आहे. जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनेच मी प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात विविध चर्चांना चांगलीच उधाण आले आहे. आगामी निवडणुका, नगरपालिकेतील सत्ताकारण आणि विविध गट-तटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिरसागर यांचे पक्षप्रवेश हे प्रस्थापित राजकीय घटकांसाठी धक्का मानला जात आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर लगेचच शहरात चर्चा वाढली असून, “श्रीरामपूर आता नव्या राजकीय पर्वाकडे वाटचाल करत आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राजकीय वातावरणात बदलाचे संकेत देणाऱ्या या घटनाक्रमामुळे श्रीरामपूरचे राजकारण अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार हे निश्चित!

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget