Latest Post


शिर्डीतील हॉटेल व्यवहारात ‘भाडेकरार’च्या नावाखाली कोट्यवधींची सावली; नागपूर कनेक्शनमुळे प्रकरण तापले

शिर्डी येथील व्यावसायिक सुनील तोलानी यांच्या हॉटेलसंदर्भात उघड झालेल्या आर्थिक वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. नागपूर येथील एका व्यावसायिकाने हॉटेल भाड्याने घेतल्याचा आभास निर्माण करून काही नागरिकांकडून पैशांची उकळपट्टी केली, थकीत रक्कम न भरता पलायन केले आणि उलट हॉटेल मालकांवरच गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या घडामोडींमुळे शिर्डी–नागपूर व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

५ लाखांवरून ३ लाखांवर ठरलेली ठेव; कराराआधीच अटी बदलण्याचा खेळ

जानेवारी महिन्यात रेस्टॉरंट सुरू करण्याच्या तयारीदरम्यान संबंधित व्यावसायिकाने जागा भाड्याने घेण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला ५,००,००० रुपये ठेव व ६०,००० रुपये मासिक भाडे अशी स्पष्ट अट ठेवण्यात आली होती. मात्र मैत्रीच्या नात्याने आणि मदतीच्या भूमिकेतून अटी शिथिल करत ३,००,००० रुपये ठेव व ५०,००० रुपये मासिक भाडे असा तडजोडीचा निर्णय झाला.

कराराची तोंडी पुष्टी देत “मी सर्व जबाबदारी स्वीकारतो” असे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ठेवीपोटी केवळ ९८,००० रुपयेच अदा करण्यात आले. उर्वरित २,०२,००० रुपये तसेच तीन महिन्यांचे भाडे थकवण्यात आले. करार अंतिम होण्यापूर्वीच आर्थिक शिस्त ढासळल्याचे स्पष्ट झाले.

२४ जूनचा करार; ‘गाडीत पैसे आहेत’ म्हणत नागपूरला पलायन

२४ जून रोजी कोपरगाव येथे औपचारिक करार करण्यात आला. त्या वेळी २,५०,००० रुपये (२ लाख ठेव + ५० हजार भाडे) देणे अपेक्षित होते. करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर संबंधिताने “पैसे गाडीत आहेत” असे सांगून सर्वांना बाहेर बोलावले. काही क्षणातच विधान बदलत “पैसे शिर्डीत विसरलो” असे कारण देत तो थेट नागपूरला रवाना झाला.

या घटनेनंतर काही दिवसांनी तो परत आला आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र थकीत रक्कम भरल्याशिवाय परवानगी देणार नाही, अशी ठाम भूमिका तोलानी कुटुंबाने घेतली.

खोट्या नोटिसा, बनावट तक्रारी आणि दबावतंत्राचा आरोप

थकीत रक्कम न भरता उलट संबंधिताने लाईट मीटर नसल्याची खोटी नोटीस पाठवली. प्रत्यक्षात मीटर आधीच बसवलेला असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर बजाज नगर पोलिस ठाण्यात २५,००० रुपये उकळल्याची तक्रार दाखल केल्याचे समोर आले.

याचबरोबर “वन व्यापार” केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. सतत खोटे आरोप, बनावट एफआयआर आणि पोलिस तक्रारींच्या माध्यमातून मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप हॉटेल मालकांकडून करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्यांची तक्रार; रोहन तोलानी यांना अटक

दरम्यान, काही नागरिकांनी संबंधित व्यावसायिकावर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार केल्याचे सांगितले जाते. तो फरार झाल्यानंतर त्यांनी थेट हॉटेल मालकांवरच गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर राहुल तोलानी यांना नागपूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मूळ व्यवहार आणि तृतीय पक्षातील आर्थिक देवाणघेवाण याचा गुंता अधिकच वाढला आहे.

“सर्व पुरावे आमच्याकडे”; कायदेशीर लढाईसाठी सज्ज

पेमेंट रेकॉर्ड, बँक व्यवहार, करारपत्र, संदेश, सीसीटीव्ही फुटेज व कॉल लॉग असे सर्व ठोस पुरावे आपल्या ताब्यात असून आवश्यकतेनुसार न्यायालयात सादर करू, अशी भूमिका तोलानी कुटुंबाने स्पष्ट केली आहे. खोट्या तक्रारींविरोधात कायदेशीर पावले उचलण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे शिर्डी व नागपूर व्यापारी क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरे तथ्य तपासाअंतीच स्पष्ट होणार असले तरी ‘भाडेकरार’च्या नावाखाली सुरू झालेल्या या वादाने आता गुन्हेगारी स्वरूप धारण केल्याचे चित्र आहे. प्रशासनाने सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – गोवंश हत्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या धडक मोहिमेत मोठी कारवाई करत पोलिसांनी हद्दपार केलेल्या इसमाला पुन्हा शहरात आढळून आल्याने अटक केली आहे.

माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. फैजान जब्बार कुरेशी (वय २५, रा. कुरेशी मोहल्ला, ममदापूर ता.) यास यापूर्वीच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ (१) अन्वये आदेश क्रमांक हद्दपार/स्थानिक गुन्हे शाखा/मपोकाक ५५/५१७/२०२६, दिनांक ०५/०२/२०२६ नुसार लोणी परिसर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

दरम्यान, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित इसम हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून श्रीरामपूर शहरात मौलाना आझाद चौक परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ श्रीरामपूर शहर गुन्हे शोध पथकाने तपास करून हॉटेल मिरावली, मौलाना आझाद चौक येथे सापळा रचला.

कारवाईदरम्यान फैजान जब्बार कुरेशी उर्फ शेख यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.



बेलापूर ( प्रतिनिधी)-अहिल्यानगर  माहेश्वरी महीला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ अनुराधा राठी यांची तर जिल्हा सचिव पदी सौ रक्षा बुब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.                                       अहिल्या नगर जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या सन 2026 ते 2028 या कालावधीसाठी नविन कार्यकारिणी निवडण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली.या वेळी कोषाध्यक्ष म्हणून सौ अचला झंवर, संगठन मंत्री म्हणून सौ उषा मुंदडा, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सौ मिना मणियार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून खानदेश विभागाच्या सहसचिव राधा झंवर, रचना मालपाणी व राजश्री मिनीयार उपस्थित होत्या.या वेळी नुतन जिल्हाध्यक्ष अनुराधा राठी म्हणाल्या की संघटनेच्या माध्यमातून महीलांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु तसेच जिल्ह्यातील माहेश्वरी समाजातील महीलांना एकत्र आणून विविध उपक्रम राबविणार असल्याचा मानस सौ राठी यांनी व्यक्त केला.या वेळी माजी जिल्हाध्यक्ष सौ किरण डागा,  गठबंधन समितीच्या सह संयोजीका सौ मंजुश्री धुत, सौ राजश्री मणियार, सुनिता मुंदडा,सौ शोभा बाहेती ,सौ मधुमती धुत आदि प्रमुख महीला उपस्थित होत्या.

श्रीरामपूरःई.पी.एस ९५ योजनेतील सारूवजनिक व खाजगी क्षेञातील निवृत्तीधारकांच्या मगणीनुसार अर्थसंकल्पात निवृत्तीवेतन वाढिसाठी काहिच तरतूद केली नाही.याचे निषेधार्थ व निवृत्तीवेतन वाढिची मागणीकडे सरकारचे रक्ष वेधण्यासाठी आता ९ ते ११ मार्च दरम्यन दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात येणार असून निवृत्तीधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रिय संघर्ष समितीचे पश्चिम भारत प्रमुख सुभाष पोखरकर यांनी केले.          

          बाभळेश्वर येथील  यशवंतराव चव्हाण सभागृहात ईपीएस ९५ पेन्शन धारकांच्या मेळाव्यास संबोधित करताना श्री.पोखारकर बोलत होते.मेळाव्यास जिल्हाध्यक्ष श्री.संपत समिंदर, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती आशाताई शिंदे,नगर शहर कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख, शिर्डी अध्यक्ष श्री दशरथ पवार सर, संगमनेर अध्यक्ष श्री अशोक देशमुख यांनी संबोधित केले.चर्चेत श्री शिवाजी शितोळे, श्री राठोड श्री इनामदार श्री कडू यांनी सहभाग घेतला.

           पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी कमांडर  राऊत यांचे नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच अर्थसंकल्पात  तरतूद न झाल्याने दि.९ ते ११ मार्च २०२६ ला दिल्लीमध्ये जंतरमंतर वर होणा-या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.     

        यावेळी श्री. लक्ष्मण हासे, श्री. अरसुळे, श्री. अर्जुन जाधव, श्री. सुरेश कटारिया, श्री. रायभान तुपे , श्री. चेडे, श्री. खंडीझोड श्री. केशव वर्पे यांची विशेष उपस्थिती होती.प्रास्ताविक श्री चिंतामणी यांनी केले तर आभार श्री गोविंद जगताप यांनी मानले.

बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु असलेल्या घरकुल बांधकामास आसाम राज्याच्या शिष्टमंडळाने भेट दिली.कामाची पाहाणी केल्यानंतर सदर घरकुल वसाहतीबद्दल प्रशंसोदगार काढले.बेलापूरची घरकुल योजना हि पथदर्शक असून अशा पध्दतीचा पॕटर्न सर्वञ राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आसाम राज्याचे ग्रामविकास विभागाचे सहआयुक्त धृवज्योती नाथ यांनी केले.                                                                आसाम राज्याच्या शासकीय शिष्टमंडळाने बेलापूरच्या घरकुल वसाहतीस भेट दिली.सदरच्या शिष्टमंडळामध्ये श्री.धृबज्योती नाथ(सहआयुक्त, पंचायतराज व ग्रामविकास आयुक्तालय,आसाम)श्री. रणजीत दास(एस.पी.ई.पंतप्रधान ग्रामीण आवास योजना ,आसाम), श्री.निलोतनाथ मिश्रा(एस.पी.ई.पंतप्रधान ग्रामीण आवास योजना,आसाम) यांचेसह अहिल्यानगर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे श्री.किरण साळवे आदि सहभागी होते.          यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच सौ. मीनाताई साळवी, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी घरकुल कामाबाबत सविस्तर माहिती दिली. सदर प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर बेलापूरची घरकुल योजना पथदर्शक असून हा पॕटर्न सर्वञ अवलंबला जावा असे मत या प्रतिनिधींनी व्यक्त केले.                       यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे, इंजिनिअर विकास पगारे,हर्षल दांगट,गणेश गोरे, शरद त्रिभुवन,जालिंदर कुऱ्हे, भाऊसाहेब कुताळ,पुरुषोत्तम भराटे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,अँड.अरविंद साळवी,जाकीर हसन शेख,मोहसीन सय्यद,प्रभात कुऱ्हे,शफिक बागवान,जाकीर शेख,शफिक शेख,सौरभ बनकर,दादासाहेब कुताळ,बबन गायकवाड,विशाल सुरडकर, सुनिल हिवराळे,संतोष मगर,आकाश वाद्ये, अमजद शेख,ग्रामपंचायत कर्मचारी सचिन साळुंके,बाबासाहेब प्रधान आदी उपस्थित होते.*

बेबेलापूर (प्रतिनिधी)- कसलीही माहिती उपलब्ध नसताना मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेवुन बेलापूर पोलीसांनी त्या व्यक्तीस नातेवाईकांच्या ताब्यात दिले मनोरुग्ण मुलाला पहाताच आई व भावाला गहीवरुन आले . पोलीसातील माणूस आजही जिवंत असल्याची भावना आई अलका ससाणे यांनी व्यक्त केली.                             वाहेगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथील सोमनाथ नंदकुमार ससाणे हा मनोरुग्ण आहे .त्या अवस्थेत त्याने घर सोडले व भटकत भटकत तो उक्कलगाव येथे पोहोचला. येथील शिंदे वस्तीत गेल्यावर त्याने आरडाओरड सुरु केली अशोक शिंदे ,शुभम शिंदे,वैभव शिंदे, प्रमोद शिंदे यांनी तातडीने युवा नेतृत्व युवराज थोरात यांना माहिती दिली. युवराज थोरात पोलीस पाटील हिराबाई मोरे , इंद्रजित मुसमाडे ,मुकेश जगधने, दिपक पवार ,सोन्या खेमनर यांच्या सह शिंदे वस्तीवर पोहोचले त्यांना वाटले चोर असावा परंतु तो निरर्थक बडबड करीत होता. तो काहीही बोलू लागला. कुणाच्याही घरात जावु लागला रस्त्यावर बसुन लोळू लागला .युवराज थोरात व पोलीस पाटील हिराबाई मोरे यांनी तातडीने बेलापुर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संपत बडे यांना या बाबत माहिती दिली संपत बडे तातडीने तेथे आले त्यावेळेस योगेश ससाने याच्या खिशात काहीही आढळून आले नाही. त्याला माहिती विचारली असता तो केवळ ससाने इतकेच सांगत होता त्यामुळे काय करावे हा प्रश्न बडे यांना पडला त्यांनी त्याला खोदून खोदून विचारले परंतु त्याला काही नाव गाव पत्ता काहीच सांगता येत नव्हते व तो वेगळीच काहीतरी बडबड करीत होता. बडे यांनी गृहरक्षक दलाचे महेश थोरात, रणजीत थोरात,  व हर्षल इंगळे यांच्या सहकार्याने त्यास बेलापूर पोलीस स्टेशन येथे आणले. तेथे त्याला नाश्ता दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक वार तपासणी केली असता त्याच्या खिशात एक बारीक कागद सापडला त्यावर कुणाचा तरी नंबर होता पोलीस कॉन्स्टेबल बडे यांनी त्या नंबर वर संपर्क साधला असता त्यांनी देखील मी संबंधितास  ओळखत नाही माझ्या परिचयाचा नाही असे सांगितले परंतु बडे यांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला असता त्याने त्या गावातील एका व्यक्तीचा नंबर दिला. बडे यांनी संबंधित व्यक्तीच्या फोनवर फोन केला असता त्याने सदर इसम आमच्या गावातीलच असून तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले व त्याच्या भावाचा व आईचा नंबर दिला पोलिसांनी तातडीने त्याचा भाऊ योगेश याचेशी संपर्क साधला भाऊ मिळाल्याचे समजताच दोघांनाही अतिशय आनंद झाला ते तातडीने बेलापूर येथे येण्यास रवांना झाले तोपर्यंत त्याची काळजी घेण्याची विनंती देखील आईने पोलिसांना केली  पहाटे दोन वाजता त्याची आई अलका नंदकुमार ससाने व  भाऊ योगेश बेलापूर पोलीस स्टेशनला आले व भावाला ताब्यात घेतले त्यावेळी आईचा व भावाचा आनंद गगनात मावेना त्यांनी मुलाला शोधून दिल्याबद्दल पोलिसांना धन्यवाद दिले. पोलीस आपले कर्तव्य चूक बजावत असून आपल्या मनोरुग्ण मुलाला सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात दिल्याबद्दल आई अलका नंदकुमार ससाने हिने बेलापूर पोलिसांना धन्यवाद दिले ससाने कुटुंबीयाचे आनंदाश्रू पाहून पोलीस कॉन्स्टेबल बडे व होमगार्ड रणजीत थोरात महेश थोरात हर्षल इंगळे यांनाही गहिवरून आले

श्रीरामपूर (प्रतिनिधी):सेवा हीच खरी इबादत या विचाराने प्रेरित होऊन स्वर्गीय गुरुवर्य, वडीलधारी ‘मोठे बाबा’ आणि स्वर्गीय जुबेर भाई बिनसाद बाबा यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ‘दवा आणि दुवा’ ही समाजसेवेची चळवळ आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे. दोन्ही मार्गदर्शक आज हयात नसतानाही, त्यांच्या विचारांचा आणि सेवावृत्तीचा वारसा जपत हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आजही गोरगरिबांच्या आरोग्यासाठी भक्कमपणे उभी आहे.

याच परंपरेचा भाग म्हणून श्रीरामपूर शहरातील आझाद मैदान येथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आणि राहता येथील डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गरजू, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार हेमंत ओगले व नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या सेवाभावी परंपरेचे विशेष कौतुक करत, “अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकी जिवंत राहते,” अशी भावना व्यक्त केली.


गोरगरिबांसाठी आरोग्यसेवेचा आधार

या शिबिरामागील प्रमुख उद्देश म्हणजे गरिब, वंचित आणि उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांपर्यंत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचवणे हा आहे. याच भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून, दरवर्षी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात येते, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

तज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार

या शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, मूत्ररोग, किडनी, मेंदू, मणक्याचे विकार, कान-नाक-घसा (ENT), दंतशस्त्रक्रिया व मधुमेह अशा विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.


डॉ. रहमत दारूवाले आणि डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने सेवाभावाने या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर समाधान आणि आशेचे भाव दिसून आले.

सेवेची परंपरा पुढे नेणारे हात

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत होते. स्वर्गीय मार्गदर्शकांनी दिलेला सेवा, समर्पण आणि माणुसकीचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यामागे स्पष्टपणे जाणवत होता.

‘दवा आणि दुवा’ म्हणजे केवळ उपचार नाही, तर आधार

आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे उपचार खर्च परवडत नाही, तिथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम अनेक गरजूंसाठी आशेचा किरण ठरत आहे.

या स्तुत्य कार्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान आणि आशीर्वाद व्यक्त होत असून, “ही परंपरा अशीच अखंड सुरू राहो,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget