Latest Post

लोणी खुर्द (प्रतिनिधी):राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे गट नंबर 60 मधील शेतकऱ्यांना शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे. रस्ता बंद झाल्याने शेतीकाम तसेच दैनंदिन हालचालींमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गट नंबर 60 परिसरातील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू असताना अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईदरम्यान शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा जुना रस्ता काढून टाकण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. हा रस्ता लहानपणापासून तसेच त्यांच्या आजोबांच्या काळापासून वापरात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी शेतकऱ्यांनी जनसेवा कार्यालयात तक्रार केल्यानंतर 17 जानेवारी 2026 रोजी जलसंधारण अधिकारी, सर्कल अधिकारी, तलाठी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. त्यावेळी लवकरच रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान गट नंबर 61, 62, 65, 66, 67, 68, 69, 70 व 71 या शेतकऱ्यांसाठी ओढ्यातील रस्त्याचा काही भाग कायम ठेवण्यात आला असून गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता मात्र अर्धवट काढून टाकण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.

सध्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना शेजारील शेतातील मका पिकातून जावे लागत आहे. दूध काढण्यासाठी पहाटे व रात्रीही त्याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे जीवितास धोका असल्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर गणेश रमेश काळवाघे, शुभम दत्तात्रेय आहेर आणि निखिल अनिल आहेर यांनी 7 मार्च 2026 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता उपलब्ध करून दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


बेलापूर ( प्रतिनिधी)-देव अंगात संचारला असे भासवून काही भोंदू बाबा आलेल्या भक्तांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण करत असल्याच्या बेलापूर व परिसरात चर्चा सुरू असुन अशा प्रकारे भोंदूगिरी करणाऱ्या बाबा संदर्भात काही तक्रारी असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन अंनिसच्या  राज्य सचिव एडवोकेट रंजनाताई गवांदे, बाबा आरगडे ,देविदास देसाई यांनी केले आहे.       या बाबत अंनिसच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात गवांदे, आरगडे ,देसाई यांनी पुढे म्हटले आहे की बेलापूरातील एका भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने काही महीलांचे लैंगिक शोषण केल्याची परिसरात चर्चा असुन बाबांच्या भितीपोटी व इज्जतीमुळे महीला तक्रार देण्यास पुढे येत नाही.ज्या महीलांची आर्थिक शारीरिक फसवणूक झाली असेल अशा महीलांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी अथवा पोलीस 

स्टेशनमध्ये संपर्क साधावा त्या भोंदू बाबाची भोंदूगिरी समाजासमोर उघड करुन त्याचेवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल . संबंधित भोंदू बाबा विरुद्ध कारवाई करण्याच्या दृष्टीने अंनिसने पावले उचलली असुन त्या भोंदू बाबाने आलेल्या भक्तांकडून मोठ्या रकमा वसुल केल्या असल्याची ही परिसरात चर्चा असुन या बाबाकडे येणाऱ्या मध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांचा भरणा आहे.  राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाखाली हा बाबा महीलांचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती अंनिसच्या कार्यकर्त्यांना मिळाली असुन त्या भोंदू बाबांचे कारनामे दडपण्यासाठी मदत करणाऱ्या पुढाऱ्यांची नावे देखील उघड केली जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर अंनिसच्या राज्य सचिव अँड रंजना ताई गवांदे ,बाबा आरगडे, देविदास देसाई ,छायाताई बंगाळ आदिच्या सह्या आहेत.


शिर्डी : शिर्डीतील एका हॉटेलच्या भाडेकरार वादप्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हॉटेल मालक सुनील तोलानी यांच्या मुलास नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांकडून प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही दिवसापूर्वी नागपूर पोलिसांची टीम शिर्डीत दाखल होऊन संबंधित कारवाई केल्याचे समजते.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आर्थिक व्यवहार आणि दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. भाडेकरारातील अटी, आर्थिक देवाणघेवाण तसेच तृतीय पक्षाशी झालेले व्यवहार याबाबत सध्या सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, नागपूर येथील बजाज नगर परिसरातील पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संबंधितास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.

अधिकृत निवेदन अद्याप जाहीर झाले नसले तरी या घडामोडीमुळे संबंधित प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेनुसार न्यायालयीन निर्णयानंतरच संपूर्ण प्रकरणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.


बेलापूरच्या 'सत्यमेव जयते' ग्रुपची पाणी देण्याची आग्रही मागणी!

बेलापूर (प्रतिनिधी):

बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याच्या दुभाजकामध्ये लावलेली तसेच दुतर्फा लावलेली झाडे वेळेवर पाणी न दिल्यामुळे  जळून चालली आहेत.त्याचबरोबर  झाडांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळया देखील गायब झालेल्या आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने झाडांचे संगोपन होईल अशी व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी बेलापूर येथील 'सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुप' च्या वतीने पत्रकार देविदास देसाई यांनी केली आहे.

सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की पर्यावरणाचे संतुलन रहावे त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस समोरुन येणाऱ्या वाहनांच्या प्रखर लाईटच्या प्रभाव पडू नये या करीता कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता दुभाथकामध्ये ही झाडे लावण्यात आली होती. सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असून झाडांना वेळेवर पाणी न दिल्यामुळे झाडे वाळत चालली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावुन त्यां झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराला देण्यात आली होती.पावसाळ्यात संबंधीत ठेकेदाराने झाडे लावली पण नंतर त्या झाडाकडे ढुंकूनही पाहीले नाही. लावलेल्या झाडापैकी केवळ पाच दहा टक्केच झाडे कशीबशी तग धरुन आहे. अनेक झाडे पूर्णपणे वाळली असून, काही शेवटच्या घटका मोजत आहेत. शासनाचा पैसा खर्च करून लावलेली ही झाडे जगविणे  संबधीत ठेकेदाराची जबाबदारी आहे.

या संदर्भात 'सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुप' च्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या झाडांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि त्यांची योग्य निगा ठेवावी, असे आवाहन केले आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर सर्व झाडे नष्ट होतील, व केलेला खर्च वाया जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पर्यावरण रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या या ग्रुपने प्रशासनाला तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला झाडाला पाणी देण्याबाबत आदेश करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.या निवेदनावर देविदास देसाई सह अभिषेक खंडागळे ,राधेश्याम अंबिलवादे, संजय भोंडगे, हाजी इस्माईल शेख ,इरफान शेख, किरण गागरे, दिपक क्षत्रिय,सचिन वाघ,विष्णुपंत डावरे ,किरण शेलार,दिलीप अमोलिक, भगीरथ मुंडलीक ,विलास नागले,प्रा निजाम शेख,सचिन देवरे,सचिन कणसे, पुंजाहरी सुपेकर,महेश कुऱ्हे, सोमनाथ जावरे, बाबुलाल पठाण, जाकीर शेख, रवींद्र करपे, विशाल आंबेकर, महेश ओहोळ, गोपी दाणी, दिलीप दुधाळ,बाबासाहेब काळे,अर्जुन डूकरे आदिंसह सदस्यांनी केले आहे

बेलापूर(प्रतिनिधी ): येथील छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा मंडळाचे १९वे वर्ष असून शिवजयंती निमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.                                                       शुक्रवार (६मार्च) रोजी स.१० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन तसेच संध्याकाळी ६वा.महाआरती  व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे शनिवार (७मार्च) रोजी संध्याकाळी ६वा. प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.संग्रामबापू भंडारे यांचे जाहीर हरी किर्तन होणार आहे.सदरचे  कार्यक्रम वीर सावरकर चौक,नगररोड, बेलापूर बु|| याठिकाणी होणार आहेत.तरी याप्रसंगी शिवप्रेमी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन छञपती तरुण मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी केले आहे.


शिर्डीतील हॉटेल व्यवहारात ‘भाडेकरार’च्या नावाखाली कोट्यवधींची सावली; नागपूर कनेक्शनमुळे प्रकरण तापले

शिर्डी येथील व्यावसायिक सुनील तोलानी यांच्या हॉटेलसंदर्भात उघड झालेल्या आर्थिक वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. नागपूर येथील एका व्यावसायिकाने हॉटेल भाड्याने घेतल्याचा आभास निर्माण करून काही नागरिकांकडून पैशांची उकळपट्टी केली, थकीत रक्कम न भरता पलायन केले आणि उलट हॉटेल मालकांवरच गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या घडामोडींमुळे शिर्डी–नागपूर व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

५ लाखांवरून ३ लाखांवर ठरलेली ठेव; कराराआधीच अटी बदलण्याचा खेळ

जानेवारी महिन्यात रेस्टॉरंट सुरू करण्याच्या तयारीदरम्यान संबंधित व्यावसायिकाने जागा भाड्याने घेण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला ५,००,००० रुपये ठेव व ६०,००० रुपये मासिक भाडे अशी स्पष्ट अट ठेवण्यात आली होती. मात्र मैत्रीच्या नात्याने आणि मदतीच्या भूमिकेतून अटी शिथिल करत ३,००,००० रुपये ठेव व ५०,००० रुपये मासिक भाडे असा तडजोडीचा निर्णय झाला.

कराराची तोंडी पुष्टी देत “मी सर्व जबाबदारी स्वीकारतो” असे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ठेवीपोटी केवळ ९८,००० रुपयेच अदा करण्यात आले. उर्वरित २,०२,००० रुपये तसेच तीन महिन्यांचे भाडे थकवण्यात आले. करार अंतिम होण्यापूर्वीच आर्थिक शिस्त ढासळल्याचे स्पष्ट झाले.

२४ जूनचा करार; ‘गाडीत पैसे आहेत’ म्हणत नागपूरला पलायन

२४ जून रोजी कोपरगाव येथे औपचारिक करार करण्यात आला. त्या वेळी २,५०,००० रुपये (२ लाख ठेव + ५० हजार भाडे) देणे अपेक्षित होते. करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर संबंधिताने “पैसे गाडीत आहेत” असे सांगून सर्वांना बाहेर बोलावले. काही क्षणातच विधान बदलत “पैसे शिर्डीत विसरलो” असे कारण देत तो थेट नागपूरला रवाना झाला.

या घटनेनंतर काही दिवसांनी तो परत आला आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र थकीत रक्कम भरल्याशिवाय परवानगी देणार नाही, अशी ठाम भूमिका तोलानी कुटुंबाने घेतली.

खोट्या नोटिसा, बनावट तक्रारी आणि दबावतंत्राचा आरोप

थकीत रक्कम न भरता उलट संबंधिताने लाईट मीटर नसल्याची खोटी नोटीस पाठवली. प्रत्यक्षात मीटर आधीच बसवलेला असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर बजाज नगर पोलिस ठाण्यात २५,००० रुपये उकळल्याची तक्रार दाखल केल्याचे समोर आले.

याचबरोबर “वन व्यापार” केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. सतत खोटे आरोप, बनावट एफआयआर आणि पोलिस तक्रारींच्या माध्यमातून मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप हॉटेल मालकांकडून करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्यांची तक्रार; रोहन तोलानी यांना अटक

दरम्यान, काही नागरिकांनी संबंधित व्यावसायिकावर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार केल्याचे सांगितले जाते. तो फरार झाल्यानंतर त्यांनी थेट हॉटेल मालकांवरच गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर राहुल तोलानी यांना नागपूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मूळ व्यवहार आणि तृतीय पक्षातील आर्थिक देवाणघेवाण याचा गुंता अधिकच वाढला आहे.

“सर्व पुरावे आमच्याकडे”; कायदेशीर लढाईसाठी सज्ज

पेमेंट रेकॉर्ड, बँक व्यवहार, करारपत्र, संदेश, सीसीटीव्ही फुटेज व कॉल लॉग असे सर्व ठोस पुरावे आपल्या ताब्यात असून आवश्यकतेनुसार न्यायालयात सादर करू, अशी भूमिका तोलानी कुटुंबाने स्पष्ट केली आहे. खोट्या तक्रारींविरोधात कायदेशीर पावले उचलण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे शिर्डी व नागपूर व्यापारी क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरे तथ्य तपासाअंतीच स्पष्ट होणार असले तरी ‘भाडेकरार’च्या नावाखाली सुरू झालेल्या या वादाने आता गुन्हेगारी स्वरूप धारण केल्याचे चित्र आहे. प्रशासनाने सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – गोवंश हत्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या धडक मोहिमेत मोठी कारवाई करत पोलिसांनी हद्दपार केलेल्या इसमाला पुन्हा शहरात आढळून आल्याने अटक केली आहे.

माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. फैजान जब्बार कुरेशी (वय २५, रा. कुरेशी मोहल्ला, ममदापूर ता.) यास यापूर्वीच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ (१) अन्वये आदेश क्रमांक हद्दपार/स्थानिक गुन्हे शाखा/मपोकाक ५५/५१७/२०२६, दिनांक ०५/०२/२०२६ नुसार लोणी परिसर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

दरम्यान, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित इसम हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून श्रीरामपूर शहरात मौलाना आझाद चौक परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ श्रीरामपूर शहर गुन्हे शोध पथकाने तपास करून हॉटेल मिरावली, मौलाना आझाद चौक येथे सापळा रचला.

कारवाईदरम्यान फैजान जब्बार कुरेशी उर्फ शेख यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget