Articles by "क्रीडा"


कोपरगाव (गौरव डेंगळे) – ट्रॅडिशनल शोतोकन कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने दरवर्षी आयोजित होणारी वार्षिक ब्लॅक बेल्ट परीक्षा आणि प्रशिक्षण शिबिर यंदा दिनांक ४ मे ते ६ मे २०२५ दरम्यान कोपरगाव येथे यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरात व परीक्षेत राज्यभरातून एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथून ७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

या शाळेतील आपेक्षा भगत,साईशा जोरी आणि भार्वी थोरात यांनी उत्तम कामगिरी करत प्रथमच ब्लॅक बेल्ट प्राप्त केला. तर हर्ष लंगोटे याने दुसऱ्या डिग्रीचा ब्लॅक बेल्ट (2nd Dan) मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सरस ठोळे,आदर्श भगत, धनश्री सोनवणे, अनन्या पुनकर व शिवकन्या घोरपडे यांनी ब्लॅक बेल्ट कॅम्पमध्ये सहभागी होऊन प्रात्यक्षिकांद्वारे कराटेच्या तंत्रांची प्रगती साधली.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षिका वर्षा देठे यांचा 'बेस्ट इन्स्ट्रक्टर' म्हणून सन्मान करण्यात आला.त्यांनी दीर्घ काळापासून शिस्तबद्ध प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,नेतृत्वगुण आणि आत्मसंरक्षण कौशल्य विकसित केले आहे.त्यांच्या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे  शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, शिक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाने, नथाली फर्नांडिस यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या परीक्षा व शिबिराचे आयोजन शिहान सुदर्शन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कराटेचे शारीरिक व मानसिक महत्व पटवून दिले. शिबिरात काता (तांत्रिक हालचाली), कुमिटे (लढाईचे तंत्र), ब्रेकिंग टेक्निक्स, डिसिप्लिन, शारीरिक तंदुरुस्ती आणि कराटेचे मूलभूत तत्त्वज्ञान यावर विशेष भर देण्यात आला.

या यशामुळे श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचा गौरव वाढला असून,पालक व शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षिकेचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

पाटणा, ५ मे २०२५(गौरव डेंगळे)– बिहारमध्ये सुरू झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ स्पर्धेला आज भव्य सुरुवात झाली. देशभरातील युवा खेळाडूंनी आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करत स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ऊर्जा आणि उत्साहाची नोंद केली.

पटण्याच्या पाटलिपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, सर्व राज्यांच्या खेळाडूंची मिरवणूक आणि प्रमुख नेत्यांचे प्रेरणादायी भाषण झाले. बिहारचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत खेळांना अधिकृत सुरुवात झाली.


पहिल्या दिवसाचे ठळक घडामोडी:


अॅथलेटिक्स (धावण्याचे प्रकार): धावण्याच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या धावपटूंनी सुरुवातीलाच चांगली कामगिरी केली. हरियाणा आणि केरळच्या खेळाडूंनी मध्यम अंतराच्या शर्यतींमध्ये वर्चस्व दाखवले.


कुस्ती: हरियाणाने अपेक्षेप्रमाणे कुस्तीत वर्चस्व राखत मुलांच्या ६० किलो फ्रीस्टाईल प्रकारात पहिले सुवर्णपदक पटकावले.


नेमबाजी आणि तिरंदाजी: पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या नेमबाजांनी अचूकतेचं दर्शन घडवलं. ईशान्य भारतातील तिरंदाजांनी उत्कृष्ट स्थैर्य व नियंत्रण दाखवलं.


जलतरण: कर्नाटकच्या जलतरणपटूंनी पहिल्याच दिवशी दोन विक्रम मोडून स्पर्धेची रंगत वाढवली. मुलांच्या १०० मीटर फ्रीस्टाईल आणि मुलींच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात नवे विक्रम नोंदले गेले.



पहिल्या दिवशी खेळाडूंनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धेची उंची अधिकच वाढली आहे. पुढील काही दिवसांत ५००० हून अधिक खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली चमक दाखवणार असून, नवे तारे उदयास येतील अशी अपेक्षा आहे.

बेलापूर ( प्रतिनिधी)-एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर येथील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी चिरंजीव साईश रामेश्वर ढोकणे याने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपन्न केले असून त्यांनी केलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.                             चिरंजीव साईश ढोकणे एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत आहे.त्याने आय एम विनर या परीक्षेत दोनशे पैकी 180 गुण मिळवून राज्यात पाचवा जिल्ह्यात दुसरा व तालुक्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवला. त्याचबरोबर बीटीएस परीक्षेत राज्यामध्ये सहावा जिल्ह्यातील तिसरा तर तालुक्यात पहिला येण्याचा बहुमान मिळविला तसेच एन एस सी परीक्षेत राज्यात सातवा येण्याचा बहुमान मिळवला तसेच मंथन या परीक्षेत राज्यांमध्ये नववा जिल्ह्यात चौथा व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तसेच ऑलिंपियाड या परीक्षेत राज्यात नववा जिल्ह्यात सहावा क्रमांक व तालुक्यात प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला तसेच लक्षवेध परीक्षेत राज्यांमध्ये तेरावा जिल्ह्यात आठवा येण्याचा बहुमान मिळवला तसेच महात्मा फुले जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. या सर्व स्पर्धेमध्ये चिरंजीव साईश यांने कमी वयात हा बहुमान मिळवला आहे. त्याला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पैठणी मॅडम व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या वर्ग शिक्षिका श्रीमती मेघा पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले साईश ढोकणे हा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव आहेत

येवला,एसएनडी मैदान – येथील एसएनडी मैदानावर पार पडलेल्या रोमहर्षक सामन्यात नंदुरबारने श्री शारदा संघावर ३ गड्यांनी विजय मिळवला.


कमी धावसंख्येच्या या सामन्यात श्री शारदा संघाला केवळ ७५ धावांत गुंडाळण्यात नंदुरबारच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने यश मिळवले. जय शिंदे आणि सैराम शेलके हे दोनच फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले, त्यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या.


नंदुरबारकडून दुर्व तपस्वीने भेदक गोलंदाजी करत ३ महत्त्वाचे बळी घेतले. त्याला हंसराज आणि तनयने प्रत्येकी २ बळी घेऊन उत्तम साथ दिली आणि शारदा संघाचा डाव लवकर संपवला.


७६ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना नंदुरबारच्या संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी लवकरच गडी गमावले, मात्र संयम राखत त्यांनी फक्त ८ षटकांत ७ गडी गमावून विजय मिळवला.


इशी गावितने नाबाद २५ धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली, तर जॉननेही २१ धावांची उपयुक्त खेळी केली. श्री शारदाकडून विहान कसलीवालने जबरदस्त गोलंदाजी करत ४ बळी घेतले, तर विराट घेगडमलनेही ३ बळी घेतले आणि पुनरागमनाची आशा निर्माण केली होती.

लखनौ (गौरव डेंगळे):SGFI ने ही पद्धत लागू केली कारण अनेक वेळा खेळाडूंना शाळा संपल्यानंतर किंवा इतर कारणांमुळे खेळात सातत्य ठेवता येत नाही,पण त्यांनी पूर्वी दिलेला परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो.त्यामुळे मागील दोन वर्षांतील अधिकृत सहभागाचे सर्टिफिकेट खेळाडूच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाते.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने डिजीलॉकर इंटिग्रेशनसह डिजिटल परिवर्तन स्वीकारले आहे.लखनौ क्रीडा प्रशासनातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून,भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, भारतीय स्कूल गेम्स फेडरेशन (SGFI) ने त्यांची सर्व क्रीडा प्रमाणपत्रे डीजीलॉकर सह यशस्वीरित्या एकत्रित केली आहेत.यासह,संपूर्ण भारतातील तरुण खेळाडूंसाठी अखंड आणि सुरक्षित प्रवेश सुनिश्चित करून, डीजी लॉकर द्वारे प्रमाणपत्रांचे पूर्ण-प्रमाणात डिजिटल वितरण कार्यान्वित करणारी SGFI ही पहिली राष्ट्रीय महासंघ बनली आहे.

यावेळी डॉ. मनसुख मांडविया केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, यांनी SGFI च्या उपक्रमाचे कौतुक केले,ते म्हणाल की डिजिलॉकरद्वारे क्रीडा प्रमाणपत्रांचे डिजिटायझेशन हे क्रीडा प्रशासनातील एक क्रांतिकारी पाऊल आहे.यामुळे आमच्या युवा खेळाडूंना सक्षम बनवेल आणि प्रणाली अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल."

रक्षा खडसे,युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री, म्हणाल्या की या डिजिटल परिवर्तनाचा भारतातील लाखो तरुण खेळाडूंना फायदा होईल. आमच्या भावी चॅम्पियन्सना समर्थन देणारी आणि त्यांचे पालनपोषण करणारी एक मजबूत डिजिटल स्पोर्ट्स इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

तंत्रज्ञान हे आता केवळ सक्षम करणारे नाही, तर ते विकासाचा आधार आहे. आम्ही एक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली तयार करत आहोत जी प्रामाणिक आणि पारदर्शक आहे.मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांपैकी एक असलेल्या SGFL ने या डिजिटल परिवर्तनाची अंमलबजावणी करण्यासाठी एक अग्रगण्य पाऊल उचलले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने,आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की भारतीय शालेय खेळ महासंघाने डिजीलॉकर प्रणालीवर आधीच अपलोड केले आहे.

68 व्या राष्ट्रीय शालेय खेळ (2024-25): 59,637 प्रमाणपत्रे 67 व्या राष्ट्रीय शालेय खेळ (2023-24): 60,385 प्रमाणपत्रे


हे डिजीलॉकर प्लॅटफॉर्मवर प्रकाशित 1,20,000 हून अधिक प्रमाणपत्रे (सहभाग आणि गुणवत्ता) एकत्रित उपलब्ध आहे.आम्हाला विश्वास आहे की दोन पूर्ण वर्षांचा डेटा कव्हर करणारी एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रमाणपत्रांचे योगदान देणारे आम्ही पहिले राष्ट्रीय क्रीडा महासंघ असणार आहे असे माहिती माननीय श्री दीपक कुमार (SGFI चे JAS अध्यक्ष) तसेच SGFI च्या सन्माननीय कार्यकारी समिती सदस्यांसह,हा उपक्रम प्रत्यक्षात अमलात आणण्याचा मोलाचा वाटा आहे.

68 व्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप (2024-2025) आणि 67 व्या राष्ट्रीय स्पर्धेतील (2023-24) सर्व प्रमाणपत्रे आता उपलब्ध आहेत.

गौरव डेंगळे/श्रीरामपूर:खेलो इंडिया युथ गेम्सच्या ७ व्या आवृत्तीत कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पढेगावकर वीरेंद्र मुंडलिकची निवड झाली आहे. ४ मे ते १५ मे २०२५ दरम्यान बिहारमध्ये या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या राज्य चाचण्यांमध्ये वीरेंद्रने अपवादात्मक कौशल्ये दाखवली,ज्यामुळे त्याला राज्य संघात स्थान मिळाले.त्याला राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक, NSNIS कोच महेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले आहे,ज्यांच्या मार्गदर्शनाने वीरेंद्रच्या निवडीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वीरेंद्र हा यशवंत विद्यालय पढेगावचा विद्यार्थी आहे.

या तरुण खेळाडूचा संघात समावेश केल्याने त्याचे समर्पण आणि प्रतिभा अधोरेखित होते आणि तो आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जोरदार प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे.राज्य संघात निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष शिरोळे सर, काका चौधरी,नितीन बलराज, संभाजी ढेरे,अजित कदम तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

तेलंगणा (गौरव डेंगळे) ःपी जे आर स्टेडियम,तेलंगणा येथे झालेल्या पहिल्या 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप स्पर्धेत कर्णधार श्रिया गोठोस्कर नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने यजमान संघाला  सरळ दोन सेटमध्ये हरवून सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांमध्ये महाराष्ट्र संघाला कांस्यपदक समाधान मानावे लागले.तेलंगणा येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील आठ राज्य पात्र ठरले होते.अंतिम सामन्याच्या सुरुवातीला यजमान तेलंगाना संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवत पहिल्या सेटमध्ये ४ गुणांची आघाडी घेतली.श्रिया गोठोस्कर,संजना गोठोस्कर, अरमान भावे यांनी आपला खेळ उंचावत महाराष्ट्र संघाला आघाडी मिळवून दिली.पहिला सेट मध्ये महाराष्ट्राने १९- १९ बरोबरी सादत पहिला सेट २१- १९ ने पटकावला. दुसऱ्या सेटमध्ये देखील महाराष्ट्राच्या मुलींनी सुरेख खेळण्याचा प्रदर्शन करत दुसरा सेट २१- १७ ने जिंकत पहिल्या फेडरेशन कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राची कर्णधार श्रिया गोठोस्कर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.उमा सायगावकर,अरमान भावे,उपन्या कार्ले, संजना गोठोस्कर व अनुष्का बनकर यांनी देखील स्पर्धेमध्ये सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.प्रशिक्षक नितीन बलराज यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र मुलींचा संघाने स्पर्धेत एकही सेट गमावला नाही.सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र मुलीच्या संघाचे गोदावरी बायोरिफायनरीचे (साखरवाडी)अध्यक्ष श्री सुहास गाडगे, प्राचार्य श्री के एल वाकचौरे,संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल हरेगावच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती गजभिव,3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री मारुती हजारे,3A साईड महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष श्री स्वामीराज कुलथे आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.



अंतिम निकाल:

मुली:

सुवर्णपदक: महाराष्ट्र

रोप्यपदक : तेलंगाना

कांस्यपदक: हरियाणा


मुले:

सुवर्णपदक: तेलंगणा 

रोप्यपदक : पंजाब 

कांस्यपदक: महाराष्ट्र



कोट: प्रत्येक खेळामध्ये मुला- मुलींनी चिकाटीने सराव केला तर निश्चितच आगामी काही वर्षांमध्ये भारत विश्व क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल असेल. तेलंगणामध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी मोठ्या गटात खेळताना सुरेख खेळ करत विजेतेपद पटकावले.युवा खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे.


( श्री गौरव डेंगळे श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव)

चदानगर,तेलंगणा (गौरव डेंगळे) : पीजेआर क्रीडा संकुल चंदानगर तेलंगणा येथे सुरू असलेल्या पहिल्या 3A साईड फेडरेशन कप स्पर्धेमध्ये साखळीतील तिसऱ्या सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्कर,उमा सायगावकर,अरमान भावे, उपन्या कार्ले, संजना गोठोस्कर व अनुष्का बनकर यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर देवधमन संघावर २१- ०७ व २१-१४ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत साखळीतील  सर्वसामान्य जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.महाराष्ट्र महिला संघाचा उपांत्य फेरीचा सामना रंगला तो हरियाणा संघाबरोबर.पहिल्या सेटमध्ये कर्णधार श्रीया, उमा व आरमान यांनी लयबद्ध खेळ करत हरियाणा संघावर पहिल्या सर्विस पासून वर्चस्व प्रस्थापित केले.श्रिया व उमाने उत्कृष्ट अशी अटॅकिंग करत पहिला सेट २१-१२ ने पटकावला.अरमान कडून सुरेख सेटिंग बघायला मिळाली.दुसऱ्या सेट मध्ये देखील संजना व उपन्या यांनी सुरेख सर्विस व अटॅकिंग करत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या आक्रमक खेळापुढे हरियाणा संघ हतबल झाला व उपांत्य फेरीचा सामना महाराष्ट्राने २१ - १२ व २१ - १२ फरकाने जिंकत अंतिम फेरी प्रवेश केला. महाराष्ट्र मुलींचा अंतिम सामना रंगेल तो यजमान तेलंगाना संघाबरोबर आज सायंकाळी ६:०० वाजता.अंतिम सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्कर कडून आक्रमक खेळाची अपेक्षा असून महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यासाठी तिच्यावर भिस्त असणार आहे.




कोट: महाराष्ट्र मुलींचा संघ लयबद्ध खेळ करत असून स्पर्धेतील सर्व ४ सामने जिंकून संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.आम्हाला आशा आहे की अंतिम सामना जिंकून फेडरेशन  कप जिंकू.

( श्री नितीन बलराज,महाराष्ट्र महिला संघ प्रशिक्षक)

चंदानगर,तेलंगणा (गौरव डेंगळे) : पीजेआर क्रीडा संकुल चंदानगर तेलंगणा येथे आजपासून सुरू झालेल्या पहिल्या 3A साईड फेडरेशन कप स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्करच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर महाराष्ट्राचा छत्तीसगडवर २१- ०७ व २१-१९  अशा सरळ सेटमध्ये पराभव करत साखळीतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

पहिल्या सेटमध्ये कर्णधार श्रीया, उमा व आरमान यांनी लयबद्ध खेळ करत छत्तीसगड संघावर पहिल्या सर्विस पासून वर्चस्व प्रस्थापित केले.श्रिया व उमाने उत्कृष्ट अशी अटॅकिंग करत पहिला सेट २१-०७ ने पटकावला.अरमान कडून सुरेखाची सेटिंग बघायला मिळाली.दुसऱ्या सेटमध्ये चंदीगड संघाकडून अप्रतिम खेळ बघायला मिळाला.१५ गुणांपर्यंत सामना बरोबरीत सुरू होता. त्यानंतर छत्तीसगड संघाने सलग ४ गुण घेऊन ४ गुणांची आघाडी घेतली.१५- १९ ने पिछाडीवर असताना महाराष्ट्राने आपला खेळ उंचावत १९-१९ अशी बरोबरी साधली.कर्णधार श्रिया ने शेवटचे २ गुण मिळवत सामना २१-१९ गुणांनी जिंकला. साखळीतील दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघावर २१-१३ व २३-२१ ने मात करून उपांत्य फेरी प्रवेश केला.साखळीतील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राची गाठ पडेल ती दिव दमन या संघाबरोबर.

२२ संघांचा सहभाग,दोन दिवस स्पर्धा,आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन मुलींचा सन्मान!!!धनकवडी(गौरव डेंगळे): जागतिक महिला दिनाचे औचित साधून धनकवडी येथील प्रियदर्शनी विद्या मंदिरच्या भव्य प्रांगणात ए बी एस फ स्पोर्ट क्लब व ऐश्वर्या स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या निमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात ए बी एस एफ तर मुलींच्या गटात मिलेनियम स्कूलने चिंतामणी चषक पटकावला, 

स्पर्धेत मुलांमध्ये निमंत्रित १२ संघ व मुलीं मध्ये निमंत्रित १० संघां नी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन प्रियदर्शिनी विद्यालया च्या मुख्याध्यापिका राजश्री दिघे व रूपाली मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आले, लिघ स्वरूपाच्या स्पर्धेत दोन दिवसांमध्ये ४८ सामने झाले झाले. 

मुलांच्या गटात फुरसुंगी येथील शिवमुद्रा संघ व धनकवडीतील एबीएसएफ संघात अंतिम सामना झाला या सामन्यांमध्ये एबीएसएफ हा संघ २-० असा सरळ सेट मध्ये विजय मिळवला तर मुलींच्या संघामध्ये मिलेनियम संघाने २-० नी सामना जिंकला 

या स्पर्धेमध्ये वेदांत म्हमाणे, राजवीर भोसले तर मुलींमध्ये अकोला कोंडे, सिद्धी सनस, अमृता सिंग उत्कृष्ट खेळ करून वैयक्तिक पारितोषिक प्राप्त केले. गौरव येरावार सर्वोत्तम खेळाडू तर मुलींमध्ये देवकी राऊत हिने सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळविला. 

आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले, सोबत अप्पा रेणूसे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते भाऊ मोरे, पुणे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष उदय कड, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सेंट्रल रेल्वे प्रशिक्षक अभय कुलकर्णी, इन्कमटॅक्स प्रशिक्षक अनुराग नाईक, प्रा. निलेश जगताप, विलास घोगरे, नगरसेवक युवराज रेणुसे, दिनेश जगताप, विलासराव भणगे,गौरव डेंगळे, मयूर संचेती उपस्थित होते.

स्पर्धेचे बक्षीस वितरण ए बी एस एफ क्लबचे मार्गदर्शक रुस्तम हिंद.महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे व  भारती विद्यापीठचे क्रीडा संचालक डॉ. नेताजी जाधव यांचे हस्ते पार पडला. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी ए बी एस फ क्लबचे मार्गदर्शक डॉ संतोष पवार, मनोज तोडकर, संदीप भोसले, रोहित मालगावकर व ए बी एस एफ क्लब चे सर्व आजी-माजी राष्ट्रीय खेळाडू यांनी नियोजन केले.



*चौकट* - जागतिक महिला दिनानिमित्त तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू सलोनी जाधव, श्रुती गोडसे, श्रेया बोरस्कर यांचा चिंतामणी ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष आप्पा रेणुसे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

गौरव डेंगळे/उत्तराखंड :उत्तराखंड राज्याला ३८ व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद मिळाले.उत्तराखंड हे यजमानपद भूषवणारे १२ वे राज्य बनले आहे.उत्तराखंडमध्ये झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये खेळाडूंनी ५८ नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. यापैकी नऊ राष्ट्रीय विक्रम आहेत आणि ४९ राष्ट्रीय खेळांचे विक्रम आहेत.विक्रम करण्यात धनुर्विद्या आघाडीवर आहे,त्यात २२ नवीन विक्रम झाले.अॅथलेटिक्स १६ विक्रमांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय ऑलिंपिक असोसिएशनकडून मिळालेल्या माहितीनुसार,राष्ट्रीय पातळीवर अ‍ॅथलेटिक्समध्ये एक,पोहण्यात दोन आणि वेटलिफ्टिंगमध्ये सहा विक्रम झाले आहेत.तर राष्ट्रीय खेळांच्या विक्रमांमध्ये, धनुर्विद्यामध्ये २२, अॅथलेटिक्समध्ये १५, पोहणे आणि वेटलिफ्टिंगमध्ये प्रत्येकी ०६ विक्रम आहेत.

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सर्वाधिक २२ विक्रम झाले. झारखंडच्या ऑलिंपियन दीपिका कुमारीने चार राष्ट्रीय खेळांमध्ये विक्रम प्रस्थापित केले.तिने ७० मीटर, २x७० मीटर, महिला संघ आणि मिश्र संघात हा विक्रम केला आहे. या राष्ट्रीय खेळांमध्ये तिरंदाजीमध्ये उत्तराखंडने फक्त एकच विक्रम केला आहे. उत्तराखंडच्या आदर्श पनवारने भारतीय फेरीत दोन राष्ट्रीय खेळांचे विक्रम मोडले.


राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणारे उत्तराखंड हे १२ वे राज्य बनले!!!


स्थापनेच्या २५ व्या वर्षाच्या सुरुवातीला, उत्तराखंडने राष्ट्रीय खेळांचे आयोजन करून देशभरात क्रीडाभूमी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्तराखंड हे राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणारे देशातील १२ वे राज्य बनले आहे.

१९२४ मध्ये देशात भारतीय ऑलिंपिक खेळ सुरू झाले. मग शहरांना यजमानपद देण्यात आले. १९३८ पर्यंतच्या ८ आवृत्त्यांपैकी ३ स्पर्धा लाहोरमध्ये झाल्या.त्यानंतर, १९४० पासून त्याचे नाव बदलून राष्ट्रीय खेळ असे करण्यात आले. १९४० ते १९७९ पर्यंत, १७ आवृत्त्या शहरांनी आयोजित केल्या होत्या.

कटक, मद्रास आणि लाहोर येथे खेळ दोनदा आयोजित करण्यात आले होते.परंतु १९८५ मध्ये,२६ व्या राष्ट्रीय खेळांपासून,त्याचे स्वरूप बदलण्यात आले आणि ते ऑलिंपिक स्वरूपाच्या धर्तीवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये राज्यांना खेळांचे आयोजन देण्यात येऊ लागले.१९८५ मध्ये दिल्ली पहिले यजमान बनले.

तेव्हापासून,२०२५ पर्यंत १३ आवृत्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत आणि उत्तराखंडला ३८ व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद मिळाले. उत्तराखंड हे यजमानपद भूषवणारे १२ वे राज्य बनले आहे. तर केरळमध्ये दोनदा खेळ आयोजित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्य आजपर्यंत राष्ट्रीय खेळांचे आयोजन करू शकलेले नाही.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - पुण्याहून जम्मूतावीला जाणारी व जम्मूतावीहून  पुण्याला येणारी झेलम एक्सप्रेस ही गाडी १६ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पत्रकार देण्यात आली आहे.

जम्मू येथे रेल्वे यार्ड चे मोठे काम सुरू  असल्याने सुमारे ३७ दिवसांसाठी वेगवेगळ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये पुण्याहून जम्मूतावीला जाणारी 11077 क्रमांकाची गाडी १७ फेब्रुवारी ते ४ मार्च पर्यंत रद्द करण्यात आली आहे तर जम्मूतावीहून पुण्याला येणारी 11078 क्रमांकाची गाडी २१ फेब्रुवारी ते ८ मार्च पर्यंत बेलापूर म्हणजे श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवर येणार नाही.त्यामुळे सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रवासी संघटनेने केले आहे.

दरम्यान मध्ये रेल्वेने झेलम रेल्वे १६ दिवस रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नगर व श्रीरामपूर मधील प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या भागातून मोठ्या संख्येने प्रवासी वैष्णोदेवीसाठी या गाडीने जम्मूतावी ला जातात तसेच दिल्ली आणि पंजाब मधील अनेक गावांना जाण्यासाठी ही थेट गाडी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे खात्याने ही गाडी पूर्णपणे रद्द न करता किमान नवी दिल्लीपर्यंत सुरू ठेवायला पाहिजे होती अशी अपेक्षा बंटी गुरुवाडा,सलीमखान पठाण,अशोक उपाध्ये,राजेंद्र सोनवणे, अयाज तांबोळी यांनी व्यक्त केली.रेल्वेच्या या तुघलकी निर्णयाने प्रवाशांना अनेक गैरसोयीना सामोरे जावे लागणार आहे.सध्या लग्नसराई व परीक्षेचा कालावधी सुरू असल्याने या काळात होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज नवले याचे चिरंजीव यश याची आशियाई पाॅवरलिफ्टिंग चम्पियनशीप २०२५ स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धेत त्याने घवघवीत यश संपादित करुन द्वितीय क्रमांक पटकावला होता त्यामुळे ही निवड करण्यात आली आहे.                       आशियाई स्पर्धा  २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धा गुजरात राज्यात संपन्न होणार आहे या स्पर्धेकरिता श्रीरामपूर येथील यश मनोज नवले यांची निवड  करण्यात आलेली आहे आहे. यश नवले याने  अमरावती येथे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या विषयात डिग्री व पदवी मिळवीलेली आहे.  हनुमान प्रसारक महाविद्यालय अमरावती येथे आपल्या खेळाचा सातत्याने सराव त्याने केला असून सध्या श्रीरामपूर येथील क्रीडा प्रशिक्षक माॅंटी साळवे , अविनाश राऊत तसेच मनोज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली २५० किलो वजन उचलण्याचा सराव करत आहे. प्रसिद्ध नॅशनल बॉडी बिल्डर तसेच मानाचा गणपती वर्ष ७५ , सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,  आझाद मैदान श्रीरामपूर , या मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले पाटील यांचे ते  चिरंजीव आहेत. यश नवले याने यापूर्वी देखील २०१३ मध्ये झालेल्या श्रीलंका येथे कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावून विजेतेपद मिळविले होते. या निवडीबद्दल राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील , राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते श्री. अविनाश आदिक , महाराष्ट्र पावर लिफ्टिंग असोसीएनचे अध्यक्ष  सचिन टापरे, श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक , अहिल्यानगर जिल्हा पावर लिफ्टिंगचे अध्यक्ष  मनोज गायकवाड, प्रख्यात उद्योजक आशिषदादा बोरावके, माळी शुगर कारखान्याचे संचालक यश बोरावके, किशोर मल्टिप्लेक्स चे मालक कुणाल बोरावके गणगोत परिवार सोशल फाउंडेशन चे प्रदेशाध्यक्ष देविदास देसाई प्रदेश सचिव राहुल क्षीरसागर सहसचिव कचरू वाघ उदय जगताप राजेंद्र गवळी ठकुनाथ भगत सुनील बडसल रवींद्र शिंदे माणिक देसाई रामदास गवळी अजिंक्य जगताप राजेंद्र जगताप प्रभाकर पराड इंद्रजीत पाटील खराद यांनी अभिनंदन केले आहे.

खंडाळा (गौरव डेंगळे): एकात्मिक बालविकास सेवा योजना,श्रीरामपुर शिरसगाव गट अंतर्गत खंडाळा येथील सांस्कृतिक भवन मध्ये आरंभ धमाल बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी एकात्मिक बा.वि.से.यो प्रकल्प श्रीरामपूर प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे,शिरसगाव बीट सुपरवायझर कल्पना फासाटे,तपर्यवेशिका आशा खेडकर, शांता गव्हाणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ छाया बर्डे यांच्यासह उपसरपंच भारती वाघमारे, सदस्या मंजुषा ढोकचौळे,अनिता मोरे,सोनाली विद्यावे, लहानबाई रजपूत,श्री ताराचंद अलगुंडे,संगिता ढोकचौळे,आरोग्य विभागाच्या डॉ मोक्षदा पटेल,खंडाळा दत्तनगर,शिरसंगाव,दिघी,गोंडेगावच्या आशा सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. यावेळी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते.बालकाचे बाल अवस्थेतील वय वर्ष ० ते ६ वर्ष हा काळ किती महत्त्वाचा असतो याची माहिती या स्टॉल द्वारे पालकांना देण्यात आली. प्रत्येक बालकाचा वाढत्या वयाप्रमाणे कशाप्रकारे विकास होतो याची देखील माहिती देण्यात आली.सर्व कार्यक्रमाची माहिती सौ फासाटे यांनी उपस्थित पालकांना दिली. कार्यक्रमासाठी मंडपाची व्यवस्था खंडाळा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली होती.

गौरव डेंगळे/उत्तराखंड: सव्र्हिसेसने राष्ट्रीय खेळांमध्ये आपला दबदबा कायम ठेवत उत्तराखंडमधील ३८ व्या आवृत्तीत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.सव्र्हिसेसने गुरुवारी आणखी नऊ पदके जिंकली,ज्यात तीन सुवर्ण पदके आहेत,एकूण १२१ (६८ सुवर्ण, २६ रौप्य, २७ कांस्य). गोव्यात २०२३ च्या आवृत्तीत ते महाराष्ट्राच्या मागे दुसऱ्या स्थानावर होते.

त्याआधी,सलग चार राष्ट्रीय खेळांमध्ये (२००७,२०११, २०१५ आणि २०२२) पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते.महाराष्ट्राने १९८ (५४ सुवर्ण,७१ रौप्य,७३ कांस्य) सह सर्व्हिसेसपेक्षा अधिक पदके जिंकली परंतु सुवर्ण संख्या कमी म्हणजे ते दुसऱ्या स्थानावर राहिले.हरियाणाने १५३ (४८ सुवर्ण,४७ रौप्य,५८ कांस्य) मिळवून सर्व्हिसेसपेक्षा अधिक पदके मिळवली पण तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.कर्नाटक (३४ सुवर्ण,१८ रौप्य,२८ कांस्य) आणि मध्य प्रदेश (३३ सुवर्ण,२६ रौप्य,२३ कांस्य) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिले.

तामिळनाडू (२७ सुवर्ण,३० रौप्य,३४ कांस्य),उत्तराखंड (२४ सुवर्ण,३५ रौप्य,४३ कांस्य), पश्चिम बंगाल (१६ सुवर्ण,१३ रौप्य,१८ कांस्य),पंजाब (१५ सुवर्ण,२० रौप्य,३१ कांस्य) आणि दिल्ली (१५ सुवर्ण,१८ रौप्य,२० कांस्य).२८ जानेवारीपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय खेळांच्या ३८ व्या आवृत्तीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी हल्दवानी येथे समारोप समारंभ झाला.

हरिद्वार येथे झालेल्या हॉकी स्पर्धांमध्ये, हरियाणाने गेल्या आवृत्तीतील पराभवाचा बदला घेत त्यांनी अंतिम फेरीत मध्य प्रदेशचा ४-१ असा पराभव करून महिला सुवर्णपदक जिंकले.

झारखंडने महाराष्ट्राचा २-१ असा पराभव करत कांस्यपदक पटकावले.

गोव्यातील २०२३ च्या राष्ट्रीय खेळांमध्ये, नियमन वेळेत दोन्ही बाजूंनी गोलशून्य बरोबरी साधल्यानंतर मध्य प्रदेशने हरियाणाला शूटआऊटमध्ये ३-० ने पराभूत केले होते.

पुरुषांच्या स्पर्धेत कर्नाटकने उत्तर प्रदेशवर ३-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राने पंजाबवर १-० अशी मात करत कांस्यपदक पटकावले.

डेहराडूनमध्ये जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम दिवशी पश्चिम बंगाल आणि हरियाणा यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

सहा दिवस चाललेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने मात्र १२ सुवर्णांसह २४ पदकांसह जिम्नॅस्टिक पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.पश्चिम बंगाल ५ सुवर्णांसह १२ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

हरियाणाच्या योगेश्वर सिंगने पुरुषांच्या कलात्मक व्हॉल्टिंग टेबल इव्हेंट आणि हॉरिझॉन्टल बारमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली. त्याने व्हॉल्टिंग टेबल स्पर्धेत १३.५०० गुण मिळवले, तर क्षैतिज बारमध्ये त्याने १२.३६७ गुण मिळवले.

पश्चिम बंगालच्या रितू दासने महिलांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्स बॅलन्स बीम स्पर्धेत ११.३६७ गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर संघसहकारी प्रणती दासने महिलांच्या मजल्यावरील व्यायाम स्पर्धेत अव्वल पारितोषिक पटकावले.

ओडिशाची टोकियो ऑलिंपियन प्रणती नायक हिला बॅलन्स बीम प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्राच्या परिना राहुल मदनपोत्रा ​​हिने रिदमिक जिम्नॅस्टिक्स क्लब स्पर्धेत २५.६० गुणांसह सुवर्णपदक मिळवले. रिदमिक जिम्नॅस्टिक्स रिबन स्पर्धेत जम्मू आणि काश्मीरच्या मुस्कान राणा आणि महाराष्ट्राच्या संयुक्ता प्रसेन काळे यांनी २५.५५० गुणांसह सुवर्णपदक मिळवले.

समांतर बार स्पर्धेत,ओडिशाचा राकेश कुमार पात्रा १२.६०० गुणांसह विजयी ठरला.

टेबल टेनिसमध्ये,महाराष्ट्राच्या जयश अमित मोदीने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकण्यासाठी तामिळनाडूच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या साथियान ज्ञानसेकरनवर अपसेट विजय (७-११,६-११,११-७,११-८ १४-१२,६-११,११-६) नोंदवला.

महिला एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या सेलेना दीप्ती सेल्वाकुमारने महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोषला ११-७, ११-२, ६-११, ७-११, ८-११, ११-७, ११-९ असे पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरले.

मिश्र दुहेरीत पश्चिम बंगालच्या अनिर्बन घोष आणि अहिका मुखर्जी यांनी महाराष्ट्राच्या चिन्मय सोमय्या आणि रीथ रिश्या टेनिसन यांना १०-१२, ६-११, ११-७, ११-८, ११-२ असे पराभूत करून विजेतेपदावर कब्जा केला.

टिहरी लेक येथे आयोजित कयाकिंग आणि कॅनोइंग स्प्रिंट स्पर्धेच्या अंतिम दिवशी, श्रुती चौगुले, ओइनम बिद्या देवी, ओइनम बिनिता चानू आणि खवैरकपम धनमंजुरी देवी यांचा समावेश असलेल्या ओडिशाच्या संघाने ०१:४६.९५ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले.

उत्तराखंडच्या फेरेनबान सोनिया देवीने महिलांच्या K-1 ५०० मीटर स्पर्धेत ०२:०६.९३५ सेकंदांसह सुवर्णपदक जिंकले, तर पुरुषांच्या K-4 ५०० मीटर स्पर्धेत सनी कुमार, वरिंदर सिंग, गोली रमेश आणि अजित सिंग यांच्या सर्व्हिसेस संघाला सुवर्णपदक मिळाले ज्यांनी ०१:२८.३२० सेकंदात शर्यत पूर्ण केली.

स्कीट मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत हरियाणाच्या शान सिंग लिब्रा आणि रयझा धिल्लन यांनी पंजाबच्या गनेमत सेखॉन आणि भावतेघ सिंग गिल यांचा ४१-३९ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

गौरव डेंगळे/उत्तराखंड:मेघालय फेब्रुवारी किंवा मार्च २०२७ मध्ये राष्ट्रीय खेळांच्या आगामी आवृत्तीचे आयोजन करेल,भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मंगळवारी (११ फेब्रुवारी) मेघालयच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पुष्टी केली.१४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये ३८ व्या राष्ट्रीय खेळ २०२५ च्या समारोप समारंभात भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज मेघालयकडे सुपूर्द केला जाईल.मेघालयातील राष्ट्रीय खेळांची आगामी आवृत्ती ही स्पर्धेची ३९ वी आवृत्ती असेल.

राष्ट्रीय खेळ २०१५ मेडल टॅली: मेघालय क्रमवारीत कुठे आहे?

मेघालय २०२५ च्या राष्ट्रीय खेळांच्या पदकतालिकेत एक सुवर्ण,२ रौप्य आणि २ कांस्य पदकांसह पाच पदकांसह ३० व्या स्थानावर आहे.त्यांनी कॅनोइंग आणि कायाकिंगमध्ये चार पदके जिंकली, एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. ईशान्येकडील राज्याने रोईंगमध्ये कांस्यपदक जिंकले.

किरण देवी आणि बी आनंदी यांनी रोईंगमधील महिलांच्या लाइटवेट डबल स्कल स्पर्धेत मेघालयसाठी कांस्यपदक जिंकले. दरम्यान,स्लॅलम पुरुषांच्या K1 स्पर्धेत पिनश्नगेन कुर्बाहने कांस्यपदक पटकावले.

स्लॅलम पुरुषांच्या C1 स्पर्धेत इंद्रा शर्माने रौप्यपदक पटकावले. विकास राणाने कयाक क्रॉस पुरुषांमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर एलिझाबेथ व्हिन्सेंटने ३८ व्या राष्ट्रीय खेळ २०२५ मध्ये कयाक क्रॉस महिलांमध्ये रौप्यपदक जिंकले.

उत्तराखंड / गौरव डेंगळे / ८/२/२०२५: गोलापूर येथील मानसखंड तरांतल येथे ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देसिंघूने ५७.३८ सेकंदाच्या विक्रमी वेळेसह महिलांची १०० मीटर फ्री स्टाईल स्पर्धा जिंकली.यापूर्वी गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने ५७.८७ सेकंद या वेळेत १०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धा जिंकली होती.धिनिधी देसिंघूने नंतर नायशा शेट्टी, विदित शंकर आणि सहकारी ऑलिम्पियन श्रीहरी नटराज यांच्यासोबत संघ करून कर्नाटकला ४ मिनिटे आणि ३.९१ सेकंदांच्या वेळेसह मिश्र ४x१०० मीटर मेडले जिंकण्यात मदत केली. देशसिंघूचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ९ सुवर्ण ठरले.देसिंघूने पूलमधील तिची वर्चस्व मोहीम सुरू ठेवण्यासाठी महिलांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

१४ वर्षांच्या मुलीने ४:२४.६० अशी वेळ नोंदवली आणि गतवर्षी वरिष्ठ नागरिकांमध्ये हशिका रामचंद्रने स्थापित केलेला ४:२४.७० चा राष्ट्रीय जलतरण विक्रम मोडीत काढला.तिने यापूर्वी दिल्लीच्या भव्य सचदेवाने ४:२७.९३ च्या रचलेला रेकॉर्ड देखील मोडला.त्यानंतर देसिंघूने श्रीहरी नटराज, आकाश मणी आणि नीना व्यंकटेश यांच्यासोबत मिश्र ४x१०० मीटर फ्रीस्टाइल रिलेमध्ये ३:४१.०३ वेळ घेत सुवर्णपदक पटकावले.तिने एका दिवसात तीन सुवर्ण जिंकले – २०० मीटर फ्रीस्टाईल (२:०३.२४), १०० मीटर बटरफ्लाय (१:०३.६२), आणि महिला ४x१०० मीटर फ्रीस्टाईल रिले (४:०१.५८).तिने २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये स्वतःचा राष्ट्रीय विक्रमही पुन्हा मोडला.४x१०० मीटर फ्रीस्टाईल रिले संघात नीना व्यंकटेश,शालिनी आर दीक्षित आणि लतीशा मंदाना यांचा समावेश होता.शिरीन,शालिनी दीक्षित आणि मीनाक्षी मेनन यांच्यासमवेत ५० मीटर फ्रीस्टाईल (२६.९६) आणि महिलांच्या ४x२०० मीटर फ्रीस्टाईल रिले (८:५४.८७) मध्ये देसिंघूची सुवर्ण कामगिरी सुरूच राहिली.तिने ५० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य आणि ४x१०० मीटर मेडले रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले.श्रीहरी नटराजनेही ९ सुवर्णांसह आपली राष्ट्रीय खेळ मोहीम पूर्ण केली परंतु त्याची एकूण संख्या फक्त १० आहे,धिनिधी देसिंघूपेक्षा एक कमी.

गौरव डेंगळे/नवी दिल्ली/१७/१/२०२५ भारतीय महिला खो खो संघाने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा धुव्वा उडवला.यासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.भारताचं वर्ल्डकप जेतेपद फक्त दोन विजय दूर आहे. भारताने चौथ्या सामन्यात १०० गुणांचा आकडा पार केला आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जबरदस्त खेळी केली. भारतीय कर्णधार प्रियांका इंगळे हीने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम अटॅक करण्याचा निर्णय केला.पहिल्या डावात भारताने एकही ड्रीम रन दिला नाही.त्यामुळे पहिल्या डावात भारताने ५०-० अशी आघाडी मिळवली होती.ही आघाडी कमी करण्याचं मोठं आव्हान बांगलादेशपुढे होतं.पण बांगलादेशने हा फरक कमी करण्याऐवजी ६ ड्रिम पॉईंट्स दिले.तर अटॅक करताना फक्त ८ गुण मिळवले.म्हणजेच दुसऱ्या डावात बांगलादेशकडे फक्त २ गुण होते.तर भारताकडे ४८ गुणांची आघाडी होती.तिसऱ्या डावात अटॅक करताना भारताने आक्रमक अटॅक केला.एका पाठोपाठ एक बॅच तंबूत पाठवत होते.त्यामुळे भारताच्या पारड्यात एका पाठोपाठ एक गुण मिळत होते. तिसऱ्या डावात भारताकडे १०६ गुण होते. त्यामुळे तिसऱ्या डावातच भारताचा विजय पक्का झाला होता. कारण ९८ धावांची आघाडी भारताकडे होती. त्यामुळे चौथ्या डावात अटॅक करून ९८ धावांचा फरक कमी करणं कठीण होतं.त्यात भारताने चौथ्या डावातही ड्रीम रनही मिळवला.भारताने हा सामना १०९-१६ गुणांनी जिंकला.


उपांत्यपूर्व फेरीचे निकाल:

पहिला उपांत्यपूर्व सामना: युगांडाचा न्यूझीलंडवर ७१-२६ ने विजय. 

दुसरा उपांत्यपूर्व सामना: दक्षिण आफ्रिकेचा केनियावर ५१-४६ ने विजय. 

तिसरा उपांत्यपूर्व सामना: नेपाळचा इराणवर १०३-०८ ने विजय. 

चौथा उपांत्यपूर्व सामना: भारताचा बांगलादेशवर १०९-१६ ने विजय.

गौरव डेंगळे (नवी दिल्ली) १३/१/२०२५ खो खो विश्वचषक २०२५ मध्ये उद्घाटन सामना भारत विरुद्ध नेपाळ सामना नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर पार पडला.खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सलामी दिली.भारताचा पहिलाच सामना नेपाळशी रंगला होता.या सामन्यात भारताने पहिल्या डावातच मोठी आघाडी घेतली होती.भारताला अटॅक करण्याची संधी मिळाली होती.भारताने पहिल्या डावात २४ गुण मिळवले.त्यानंतर दुसऱ्या डावात जेव्हा नेपाळ संघ अटॅक करण्यासाठी आला. तेव्हा भारताने जबरदस्त पद्धतीने झुंजवलं. नेपाळने आपल्या डावात २० जणांना बाद करण्यात यश मिळवलं. पण भारताने ४ गुणांची आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या डावात बचावत्मक पवित्र्यात असलेल्या नेपाळने कमबॅक केलं. टीम इंडियाला फक्त १८ जणांना बाद करता आलं.तर नेपाळला चांगल्या डिफेंससाठी एक गुण मिळाला. तिसऱ्या डावानंतर भारताकडे २१ गुण होते. नेपाळला हा सामना जिंकायचा तर २२ जणांना बाद करणं आवश्यक होतं. पण चौथ्या डावात टीम इंडियाचे खेळाडू भारी पडले. दुसऱ्या बॅचने नेपाळला चांगलंच झुंजवलं. त्यामुळे एकीकडे वेळ कापरासारखा उडत होता. दुसरीकडे नेपाळचे खेळाडू एक एक खेळाडू बाद करण्यासाठी प्रयत्न करत होता. अखेर नेपाळला फक्त १६ गुण मिळता आले. एकूण भारताचे ४२ आणि नेपाळचे ३७ गुण होते.भारताने हा सामना पाच गुणांनी जिंकला.भारताच्या शिव पोथीर रेड्डी याला बेस्ट अटॅकिंगसाठी पुरस्कार देण्यात आला. तर नेपाळच्या रोहितकुमार वर्माला सर्वोत्तम डिफेंसाठी सामन्यानंतर गौरविण्यात आलं आहे. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला आदित्य गणपुले याने.. त्याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार होता. पण व्हिसाच्या समस्येमुळे पाकिस्तान संघ भारतात पोहोचू शकला नाही. त्यामुळे भारताचा सामना नेपाळसोबत आयोजित केला गेला. अ गटात नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतान भारतासोबत असून प्रत्येकी एक सामना खेळतील. उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी अव्वल दोन स्थान मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

कोपरगाव(गौरव डेंगळे)१३/१:सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे "पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया" राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे सहाव्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रखर देशभक्त स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथे दि ११ जानेवारी २०२५ रोजी राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये निपून वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा,त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची कला अवगत व्हावी,त्यांच्यातील भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील अहिल्यानगर,मालेगाव, संभाजीनगर,कोपरगाव,वैजापूर, श्रीरामपूर,राहता,लोणी,शिर्डी येथून २२ शाळेतील ४४ उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व सादर करून स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.या इंग्रजी वकृत्व स्पर्धेचा प्रथम क्रमांक श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलने पटकावला.दानिश शेख व कनिका सावंत यांनी वकृत्व स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केले.स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण माननीय सुहास गोडगे(अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती व गोदावरी बायोरिफायनरीज, साखरवाडी),कल्याणी व्यास,शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी ससाणे,सौ नाथलीन फर्नांडिस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून गणेश डांगे,नानासाहेब वाघ व नेहा पहाडे यांनी काम पाहिले.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच पारितोषिक प्राप्त शाळेंना मानचिन्ह व बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली.यशस्वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विभागाचे शिक्षक यास्मिन पठाण,मोनिका भांडगे,शिल्पा खांडेकर,तरणुम शेख,स्मिता परिमल,हेमा कडू,स्मिता लोखंडे, वैजंती कुटे,स्वप्निल पाटील,साईनाथ चाबुकस्वार,गणेश मलिक, विशाल आल्हाट व महेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.




👉 स्पर्धेचा अंतिम निकाल!

👉 *प्रथम क्रमांक* 

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव ₹ १०,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *द्वितीय क्रमांक*

ऑक्झोलिअम कॉन्व्हेंट स्कूल अहिल्यानगर ₹ ७०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *तृतीय क्रमांक* 

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज लोणी ₹ ५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

संत विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल ₹ ३०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

संजीवनी सैनिकी स्कूल, कोपरगाव ₹ २,०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक*

 न्यू एरा इंग्लिश मीडियम स्कूल, मालेगाव.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक*

अशोक आयडियल स्कूल श्रीरामपूर.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ पाचवे पारितोषिक*

श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल, कोराळे ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सहावे पारितोषिक*

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,श्रीरामपूर ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. 

👉 *उत्तेजनार्थ सातवे पारितोषिक*

न्याती समता इंटरनॅशनल स्कूल, श्रीरामपूर ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget