Articles by "क्रीडा"

 

१२ जुलैला रंगणार अंतिम स्पर्धा; विजेत्या संघाला ट्रॉफी व प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार..


कोपरगाव(गौरव डेंगळे): सोमैया विद्या विहारच्या श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित शारदा थ्रो बॉल लीग २०२५ साठी विद्यार्थ्यांची निवड चाचणी शनिवार, ५ जुलै रोजी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.


या लीगमध्ये प्रत्येक संघात

✅ इयत्ता ९ वी व १० वी मधील ४ मुले,

✅ इयत्ता ७ वी व ८ वी मधील ४ मुले,

✅ इयत्ता ८ वी ते १० वी मधील ४ मुलींचा समावेश असणार आहे.


स्पर्धेचे अंतिम सामने शनिवार, १२ जुलै रोजी रंगणार असून, विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात येईल. याच दिवशी सर्व संघांचे कर्णधार आणि अधिकृत संघांची घोषणा करण्यात येणार आहे.

या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्यात थ्रो बॉल खेळाचा प्रचार-प्रसार करणारे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. धनंजय देवकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.

नाव नोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी श्री. गणेश वाघ व श्री. गणेश मोरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या लीगमुळे विद्यार्थ्यांमध्ये थ्रो बॉल खेळाविषयी आवड निर्माण होऊन त्यांच्या अंगभूत कौशल्यांना व्यासपीठ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली ( गौरव डेंगळे): पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ (National Sports Policy 2025) ला मंजुरी दिली आहे. हे धोरण देशाच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. नव्या धोरणाद्वारे भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्याचा आणि २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताला सक्षम स्पर्धक म्हणून घडवण्याचा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे.

हे धोरण पूर्वीच्या २००१ मधील क्रीडा धोरणाला बदलून नव्या पिढीसाठी तयार करण्यात आले आहे. धोरण तयार करताना केंद्र सरकार,नीती आयोग,राज्य सरकारे,राष्ट्रीय क्रीडा महासंघ, खेळाडू,तज्ज्ञ,तसेच जनतेचा सहभाग घेण्यात आला.


राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ चे पाच प्रमुख स्तंभ:


१ . जागतिक पातळीवरील उत्कृष्टता..


® गवतापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू घडवण्याच्या योजना.


® ग्रामीण व शहरी भागात स्पर्धात्मक लीग व स्पर्धांचे आयोजन.


® जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रशिक्षक विकास.


® राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे व्यवस्थापन व क्षमतेत सुधारणा.


® क्रीडा विज्ञान, औषधोपचार व तंत्रज्ञानाचा उपयोग.


® प्रशिक्षक,अधिकारी,सहाय्यक कर्मचारी यांचे प्रशिक्षण.



२ . आर्थिक विकासासाठी क्रीडा.


® क्रीडा पर्यटनाला प्रोत्साहन व भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन.


® क्रीडा क्षेत्रातील उत्पादन व स्टार्टअप्सना चालना.


® खासगी क्षेत्र, CSR, PPP मॉडेलद्वारे गुंतवणूक आकर्षित करणे.


३ . सामाजिक विकासासाठी क्रीडा.


® महिलांसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, आदिवासी व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष योजना.


® पारंपरिक व स्थानिक खेळांना पुनरुज्जीवन.


® क्रीडा क्षेत्रात करिअरला प्रोत्साहन.


® भारतीय प्रवासी व परदेशस्थित भारतीयांना क्रीडा क्षेत्रात सहभागी करणे.


४ . क्रीडा जनआंदोलन म्हणून.


® देशभर क्रीडा व फिटनेस संस्कृती रुजवण्यासाठी अभियान.


® शाळा,महाविद्यालये, कार्यालयांसाठी फिटनेस इंडेक्स.


® सर्वांसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध करणे.


५ . शिक्षणाशी एकात्मता (NEP 2020 अनुकूल).


® शालेय अभ्यासक्रमात क्रीडांचा समावेश.


® शिक्षक व क्रीडा शिक्षकांना विशेष प्रशिक्षण.


® विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा जागृती वाढवणे.


६ . रणनीतिक आराखडा.


® क्रीडा क्षेत्रातील मजबूत कायदे व नियमन.


® तंत्रज्ञानाचा वापर – AI, डेटा विश्लेषणाद्वारे प्रगती मापन.


® ठोस उद्दिष्टे, KPI आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी.


® प्रत्येक राज्याने आपले धोरण या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत करणे.


® सर्व मंत्रालये व विभागांचा एकत्रित सहभाग.

येवला (प्रतिनिधी ): येथील एसएनडी सीबीएसई संघाविरुद्ध पार पडलेल्या दोन मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यांमध्ये क्रिकेट क्लब ऑफ शारदा कोपरगांव (CCS) च्या U-14 आणि U-17 संघांनी प्रभावी खेळ करत दुहेरी विजय मिळवला.दोन्ही संघांनी अनुक्रमे २८ धावांनी आणि ९ गडी राखून विजय मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

U-14 क्रिकेट सामना : शारदा संघाचा २८ धावांनी विजय..


U-14 गटातील सामन्यात एसएनडी सीबीएसई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शारदा संघाचे नेतृत्व जयदीप दरांगे यांनी केले.

प्रथम फलंदाजी करताना क्रिकेट क्लब ऑफ शारदा संघाने २० षटकांत ९५ धावा केल्या.

फलंदाजीत विहान कसलीवालने १९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.सार्थक जाधवने १४ धावा फटकावल्या. हर्षद फुकटेने १० धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत एसएनडी सीबीएसई संघाकडून पार्थ सोनवणे आणि ज्ञानेश्वर पवार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात एसएनडी सीबीएसई संघ १५.३ षटकांत केवळ ६७ धावांवर गारद झाला.यश पवारने १८ धावा केल्या,तर पार्थ सोनवणेने ११ धावांचे योगदान दिले.शारदा संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत सामना आपल्या बाजूने झुकवला. देवासिस मार्कड, हर्षद फुकटे,सार्थक जाधव यांनी प्रत्येकी २- २ गडी बाद केले.

सामना २८ धावांनी जिंकत शारदा संघाने जल्लोष केला.

सामनावीर म्हणून सार्थक जाधव याची निवड झाली,त्याने १४ धावा आणि २ गडी घेत सर्वांचे लक्ष वेधले.


U-17 क्रिकेट सामना : दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीचा दबदबा..


U-17 गटातील सामन्यात एसएनडी सीबीएसई येवला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामना एसएनडी सीबीएसई क्रिकेट ग्राउंड,येवला येथे खेळवण्यात आला.

शारदा संघाचे नेतृत्व जय ढाकणे याने केले.एसएनडी सीबीएसई 

 संघाने २० षटकांत १०४/८ अशी धावसंख्या उभारली.शुभम सातारकरने ३६ धावा फटकावल्या तर विजय चव्हाणने १५ धावांचे योगदान दिले.

शारदा संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.विराट घेगडमल व साईराम शेळके यांनी प्रत्येकी २- २ गडी बाद केले तर अर्णव थोरात १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात, क्रिकेट क्लब ऑफ शारदा संघाने केवळ १३.२ षटकांत १०५/१ धावा करत सामना ९ गडी राखून सहज जिंकला.प्रेम कसलीवालने ३८* नाबाद धावा करत संघाचा कणा मजबूत केला.ऋतेश सोनपसारेने ३८ धावांची धमाकेदार खेळी केली.साईराम शेळकेनेही १३* नाबाद धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली.

सामनावीर म्हणून ऋतेश सोनपसारे याची निवड झाली. त्याच्या प्रभावी खेळीमुळे शारदा संघाने हा विजय खेचून आणला.

नवी मुंबई ( गौरव डेंगळे): २७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा भाटपारा, छत्तीसगड येथे २६ ते ३० जून २०२५ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड प्रक्रिया टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने व नवी मुंबई टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयोजनातून, कोपरखैरणे येथील क्राईस्ट अकॅडमी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे यशस्वीरित्या पार पडली.

या निवड चाचणीला नवी मुंबई, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, परभणी, हिंगोली, पुणे, नाशिक, अमरावती आदी जिल्ह्यांमधून आलेल्या ज्युनिअर व सब-ज्युनिअर गटातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक व्यंकटेश वांगवाड यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले, तर क्राईस्ट अकॅडमी स्कूलचे संचालक फादर जेसन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावले.

या निवड प्रक्रियेला महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनचे राज्य सचिव गणेश माळवे, राज्य उपाध्यक्ष कोरडे, राज्य कोषाध्यक्ष डॉ. दिनेश शिगारम, बालभारती तज्ञ प्रगती भावसार मॅडम, नवी मुंबई सचिव वैभव शिंदे, तसेच अशोक शिंदे, आशिष ओबेरॉय, सचिन भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.


राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडलेला महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे :


➡️ ज्युनिअर मुले :

कृष्णा अहिरे, विवेक साळुंखे, प्रसाद महाले, मयूर बोरसे, प्रताप पौळ, अनंत धापसे


➡️ सब-ज्युनिअर मुले :

ईश्वर मोरे, दिव्यांशु चांद, वेदांत महामाने, गौरव चौधरी, मयूर निकम, विर पाटील


➡️ ज्युनिअर मुली :

वेदिका बेंद्रे, मृणाली सरवदे, श्रेया सिंग, सृष्टी शिंदे, मान्यता जैन, अंकिता सरगर


➡️ सब-ज्युनिअर मिश्र दुहेरी :

राजवीर भोसले, सोनाक्षी कदम


➡️ ज्युनिअर मिश्र दुहेरी :

शिवम कदम, श्रेया धावन


प्रशिक्षक : उज्वला शिंदे, शिवदास खुपसे, गणेश आम्ले

संघ व्यवस्थापक : निलेश माळवे

कोपरगांव (गौरव डेंगळे):दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात. ही जागतिक घटना योगाच्या प्राचीन भारतीय पद्धतीला आणि त्याचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक कल्याणावर खोल परिणाम करतात.

योग हा शब्द संस्कृत शब्द "युज" वरून आला आहे, ज्याचा अर्थ "सामील होणे" किंवा "एकत्रित होणे" आहे आणि मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.


त्याचेच औचित्य साधत सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथे पतंजली योग पिठाचे योगाचार्य उदय वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ४५० विध्यार्थी आणि शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी एकत्रित योग साधना केली.

२०२५ सालच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती – “Yoga for Self and Society” (स्वतःसाठी आणि समाजासाठी योग).

ही संकल्पना फक्त स्वतःच्या आरोग्यापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करते.


योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा असून, ती नव्या पिढीला निरोगी आणि सशक्त ठेवण्यास उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळेच संपूर्ण जग या दिवशी योग साधनेसाठी एकत्र येते.

कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, हायस्कूल पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे, प्राथमिक पर्यवेक्षिका सौ. पल्लवी ससाणे, प्री-प्रायमरी पर्यवेक्षिका सौ. नाथलीन फर्नांडिस तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांसोबत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

खंडाळा(गौरव डेंगळे):श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात आज एक ऐतिहासिक व प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला, जेव्हा समाजसेवेत अग्रणी आणि युवकांसाठी प्रेरणास्थान असलेले वसंत हंकारे सर यांनी गावाला भेट दिली.

या भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रीय श्रीराम संघ,खंडाळा आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हंकारे सर यांचा भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी गावातील नागरिक,ज्येष्ठ मंडळी आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या वेळी हंकारे सर यांनी खंडाळ्यातील युवकांच्या उत्साहाचे आणि सामाजिक भानाचे कौतुक करत सांगितले की,

"प्रत्येक गावात भगवा ध्वज फडकायला हवा.भगवा हा केवळ ध्वज नाही,तो जनतेच्या रक्षणाचा प्रतीक आहे."

त्यांच्या या प्रेरणादायी उद्गारांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची आणि समाजसेवेची भावना अधिक तीव्र झाली.हंकारे सर यांनी गावात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व ५१ फूट उंच भगव्या ध्वजाचे दर्शन घेऊन त्याच्या निर्मितीमागील संघटित प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.या ध्वजस्थळाने गावातील युवकांमध्ये अभिमान व नवचेतना निर्माण केली आहे.

सरांनी युवकांशी संवाद साधत संघटन,शिस्त,शिक्षण आणि स्वाभिमान या मूल्यांवर भर देत त्यांना समाजासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.खंडाळा गावातील युवकांच्या राष्ट्रनिष्ठ वृत्तीमुळे महाराष्ट्राच्या मातीत नवसंस्कार निर्माण होत आहेत," असे गौरवोद्गार हंकारे सरांनी काढले.कार्यक्रमाची सांगता सर्वांच्या मनात प्रेरणादायी ठसा उमटवत झाली.गावासाठी ही भेट एक अभिमानाचा क्षण ठरली असून, युवकांच्या कार्याला यातून नवी दिशा मिळाली आहे.


पुणे/१७ जून/ गौरव डेंगळे:आलोक तोडकरने महाराष्ट्राचा आणि भारताचा मान अभिमानाने उंचावला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. हे करताना तो महाराष्ट्रातून ही कामगिरी करणारा पहिलाच व्हॉलीबॉलपटू ठरला आहे.

भारताचे प्रतिनिधित्व करताना आलोकने अपार कौशल्य, प्रबळ निर्धार आणि उत्कृष्ट संघभावना यांचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्याच्या असामान्य योगदानामुळे भारताला या स्पर्धेत मानाचे तिसरे स्थान मिळविता आले आणि यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.


आलोकची ही कर्तृत्वगाथा महाराष्ट्रातील असंख्य युवकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे. त्याच्या या यशामुळे तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती साकार करण्यासाठी जिद्द व चिकाटीने प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय व्हॉलीबॉलची उभरती ताकद आणि क्षमता आलोकच्या या विजयामुळे अधोरेखित झाली आहे. या ऐतिहासिक यशामुळे अधिकाधिक भारतीय खेळाडूंना जागतिक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा मार्ग खुला होतो आहे आणि योग्य प्रशिक्षण, समर्थन आणि जिद्द यांच्या जोरावर भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर उत्तुंग भरारी घेऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ही कामगिरी महाराष्ट्रातील वाढत्या क्रीडा संस्कृतीचा आणि भारतातील दर्जेदार खेळाडू घडविण्याच्या बांधिलकीचा उत्तम प्रत्यय आहे. आलोक तोडकरचे नाव महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे आणि त्याने भावी पिढ्यांसाठी नवे मार्ग खुले केले आहेत.

अलोकचे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सीईओ मा.पार्थ दोशी, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रतीक पाटील,सचिव श्री.विरल शहा,प्राचार्य डॉ. स्वप्नील विधाते,श्री.शिवाजी कोळी, उपाध्यक्ष भास्कर बुचडे,रेल्वे संघाचे प्रशिक्षक अमेय कुलकर्णी आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.अलोकच्या यशामागे फाउंडेशनचे प्रशिक्षक डॉ. संतोष पवार, रोहित मालेगावकर,संदीप भोसले,तसेच संस्थेचे आधारस्तंभ मा.अप्पासाहेब रेणुसे व अमोल बुचडे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले.

नवी दिल्ली(गौरव डेंगळे): भारतीय शालेय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल अशी ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. School Games Federation of India (SGFI) च्या या ऐतिहासिक सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे श्रीरामपूर (महाराष्ट्र) येथील सुपुत्र पार्थ दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ही सभा यशस्वी झाली. आपल्या कार्यकुशलतेने व दूरदृष्टीने पार्थ दोशी यांनी महाराष्ट्राचा व देशाचा गौरव उंचावला आहे.


महाराष्ट्राचा सुपुत्र राष्ट्रीय पातळीवर चमकला!!!



सुमारे आठ महिन्यांपूर्वी पार्थ दोशी यांची SGFI च्या कार्यकारी अधिकारी (Executive Officer) पदावर निवड झाली. केवळ अल्पावधीतच त्यांनी महासंघाच्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवत महासंघाला नव्या यशशिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या नेतृत्वात SGFI ने शालेय क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि खेळाडू केंद्रित धोरणे राबवली आहेत.


ऐतिहासिक सामंजस्य करार — निधी संकलनास नवे वळण!!!


SGFI च्या अध्यक्ष श्री. दीपक कुमार (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पार्थ दोशी यांच्या सक्रिय सहभागातून महासंघाने निधी संकलनासाठी शशक्त डेव्हलपमेंट अँड एम्पावरमेंट फाउंडेशन बरोबर ऐतिहासिक MoU केला आहे. या करारामुळे देशातील नामांकित कंपन्यांच्या CSR प्रकल्पांमधून आणि विविध प्रायोजकांकडून महासंघाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या करारानंतर प्रतिकात्मक स्वरूपात ₹१० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला, जो महासंघाच्या शाश्वत विकासाचा नवा अध्याय ठरला आहे.


डिजिटायझेशनद्वारे कार्यपद्धतीत क्रांती!!!


पार्थ दोशी यांच्या नेतृत्वाखाली महासंघाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नोंदणी व पात्रता तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता आणली आहे. आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक ओळख प्रणालीमुळे खेळाडूंची खरी पात्रता सहज निश्चित होणार असून अपात्रतेला पूर्णविराम मिळणार आहे. यामुळे महासंघाच्या कामकाजात विश्वासार्हता, गती आणि सुरक्षितता यामध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.


राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना अधिक सुविधा!!!


राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळाडूंना दर्जेदार सुविधा व उत्तम वातावरण मिळावे यासाठी महासंघाने आयोजकांना वित्तीय सहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. चांगली निवास व्यवस्था, दर्जेदार आहार, उत्तम मैदान व अन्य सुविधा या सहाय्यामुळे उपलब्ध होतील. यामुळे स्पर्धकांच्या कामगिरीत निश्चितच सकारात्मक बदल दिसून येतील.


पार्थ दोशी यांची दूरदृष्टी आणि कार्यतत्परता कौतुकास्पद!!!


पार्थ दोशी यांनी केवळ महासंघाच्या यशासाठीच नव्हे तर देशातील लाखो शालेय खेळाडूंना दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध प्रयत्न सुरू ठेवले आहेत. देशाच्या क्रीडा क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या तरुण नेतृत्वाने महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे.


"शालेय पातळीवरूनच खेळाडूंना योग्य दिशा, सुविधा व प्रोत्साहन मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. शाळा हीच भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारी पहिली प्रयोगशाळा आहे," असे पार्थ दोशी यांनी आपल्या भाषणात नमूद केले.


महाराष्ट्राचा अभिमान — श्रीरामपूरचे भूषण!!!


पार्थ दोशी यांच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः श्रीरामपूरमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांच्या यशाची दखल विविध क्रीडा संघटना, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते व नागरिकांकडून घेतली जात आहे. युवकांनी पार्थ दोशी यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन अनेकांनी केले आहे.


🌟 "पार्थ दोशी यांच्यासारख्या तळमळीच्या नेतृत्वामुळेच भारत शालेय क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडवू शकतो."

गौरव डेंगळे/ पुणे/ ८ जून: सेंट्रल एशियन व्हॉलिबॉल चॅम्पियनशिप २०२५ (उजबेगिस्तान) या स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील भारतीय पुरुष व्हॉलिबॉल संघात पुण्याचा अलोक मनोज तोडकर याची निवड झाली आहे. केवळ १६ वर्षांचा असलेला अलोक पुरुष गटात लिब्रो म्हणून निवड होणारा महाराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरला आहे, ही बाब महाराष्ट्रासाठी आणि पुण्यासाठी अत्यंत गौरवाची आहे.

अलोकने यापूर्वी दोन वेळा भारतीय संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले होते,मात्र अंतिम संघात निवड होणे हुकले होते.परंतु त्या अपयशाला न जुमानता त्याने सातत्यपूर्ण मेहनत,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या वर्षी वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात प्रभावी कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

अलोक वयाच्या चौथ्या वर्षापासून पैलवान अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन येथे नियमित सराव करत आहे.लहानपणापासून त्याने या क्लबच्या वरिष्ठ खेळाडूंना भारतीय संघाच्या सराव शिबिरात स्थान मिळवताना पाहिले आणि त्याच प्रेरणेतून तोही भारतीय संघात स्थान मिळवण्याचा निर्धार करत सरावात गुंतला.

या यशामागे फाउंडेशनचे प्रशिक्षक डॉ. संतोष पवार, रोहित मालेगावकर,संदीप भोसले,तसेच संस्थेचे आधारस्तंभ मा.अप्पासाहेब रेणुसे व अमोल बुचडे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले.अलोकच्या घडणीत प्रीतम जाधव,योगेश कुत्रेह, सुयश पवार,गौरव ब्रम्हे, आदित्य कुडपणे,केशव गायकवाड या वरिष्ठ खेळाडूंचाही मोलाचा वाटा आहे.

अलोकच्या या अभूतपूर्व निवडीबद्दल त्याला शुभेच्छा देण्यासाठी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सीईओ मा. पार्थ दोशी,MVA सचिव विरल शाह,

प्राचार्य डॉ. स्वप्नील विधाते, श्री. शिवाजी कोळी, उपाध्यक्ष भास्कर बुचडे,रेल्वे संघाचे प्रशिक्षक अमेय कुलकर्णी,राष्ट्रीय प्रशिक्षक कुलदीप कोंडे,शिवाजी जाधव आदी मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.

श्रीरामपूर(गौरव डेंगळे): टाकळीभान येथील आझाद क्रीडा मंडळाचे प्रमुख प्रशिक्षक रवी गाढे आणि नामवंत कबड्डीपटू महेश कोल्हे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, बेंगळुरू येथे आयोजित सहा आठवड्यांचा कबड्डी सर्टिफिकेट कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

या कोर्समध्ये आधुनिक प्रशिक्षण तंत्र, खेळातील रणनीती, शारीरिक तंदुरुस्ती,आहार नियोजन, मानसिक तयारी तसेच खेळाडू व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.देशभरातील अनेक प्रशिक्षक आणि खेळाडू या अभ्यासक्रमात सहभागी झाले होते.

रवी गाढे आणि महेश कोल्हे यांनी या कोर्समध्ये विशेष कामगिरी केली असून, दोघांनाही संस्थेच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अर्जुन पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक भास्करन सर यांचे दोघांनाही मार्गदर्शन लाभले.

रवी गाढे हे आझाद क्रीडा मंडळ, टाकळीभान येथून कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कबड्डीपटूंनी प्रो कबड्डी लीगमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना संधी देण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.


महेश कोल्हे हे देखील याच मंडळाशी संबंधित असून, प्रशिक्षक म्हणून त्यांची वाटचाल अधिक बळकट होत आहे. त्यांच्या यशाबद्दल श्रीरामपूर तालुका क्रीडा समिती,सहकारी, मित्रपरिवार व चाहत्यांकडून दोघांचेही अभिनंदन केले जात आहे.

श्रीरामपूर/गौरव डेंगळे/१९/५: सोमैया विद्या विहार विद्यापीठ, मुंबई आयोजित राज्यस्तरीय समर कॅम्पमध्ये श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव येथील १०४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिनांक ५ मे ते १७ मे २०२५ दरम्यान पार पडलेल्या या विशेष शिबिरात ८६ मुले व १८ मुली सहभागी झाल्या.लक्ष्मीवाडी, साखरवाडी, नरेशवाडी व शारदा शाळेतून एकूण २०० विद्यार्थ्यांचा सहभाग हा ग्रामीण भागातील शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने उचललेला महत्वपूर्ण पाऊल ठरला.

१३ दिवस घरापासून दूर राहून विद्यार्थ्यांनी नवे अनुभव घेत खेळ, शिस्त, स्वावलंबन व सहकार्य यांचे महत्त्व आत्मसात केले. या काळात क्रिकेट, बॅडमिंटन, स्क्वॉश, बास्केटबॉल, पोहणे, दोरी चढणे, फुटबॉल, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स, जुडो, कराटे, टेबल टेनिस, फिटनेस ट्रेनिंग व पिकलबॉल अशा विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी जोमाने भाग घेतला.खेळांसोबतच विद्यार्थ्यांनी VTI (व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) मध्ये प्लंबिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर, एसी रिपेअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या उपयुक्त व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले.

शिबिरात विद्यार्थ्यांनी सोमैय्या कॅम्पसवरील विविध महाविद्यालयांना भेटी देत उच्च शिक्षणाच्या संधी व करिअरचे विविध पर्याय जाणून घेतले. विशेष आकर्षण ठरले भारताचे माजी क्रिकेटपटू धवल कुलकर्णी यांच्याशी झालेली थेट भेट आणि प्रेरणादायी संवाद.

समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि संचालन स्वतः हाती घेतले. त्यांच्या नेतृत्वगुणांचे व संघटनकौशल्याचे सर्वांनी कौतुक केले.समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना सोमय्या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री समीर सोमैया सर म्हणाले, “प्रत्येकाने नेहमी सत्य बोलले पाहिजे आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला पाहिजे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी प्रामाणिकपणा, सहकार्य आणि करुणा ही अत्यंत आवश्यक मूल्ये आहेत.”ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ यशाकडे धाव घेत न बसता, चांगला नागरिक होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अपयशातून शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इथे मिळालेला अनुभव तुमच्या आयुष्यभरासाठी प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्वास आहे.”या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून, त्यांनी प्रत्येक सत्रात मन:पूर्वक आणि उत्साहाने सहभाग घेतला.श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्यातर्फे सोमैया ट्रस्टचे माननीय अध्यक्ष श्री समीर सोमैया सर यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले,की त्यांनी विद्यार्थ्यांना असा संस्मरणीय व अनुभवसमृद्ध शिबीर अनुभवायला दिला.हे शिबीर विद्यार्थ्यांसाठी केवळ एक शिबीर न राहता,एक जीवनमूल्य शिकवणारी शाळा ठरली.

क्रीडा/गौरव डेंगळे/श्रीरामपूर:  ना गॉडफादर, ना राजकीय पाठिंबा — फक्त निखळ क्रीडाप्रेम!


भारतीय क्रीडा क्षेत्रात अनेक जण आपापल्या मार्गाने प्रगती करत असतात, पण पार्थ दोशी यांची कहाणी खास आहे. एक ग्रामीण मुलगा, ज्याच्याकडे ना मोठ्या ओळखी होत्या, ना कुणाची पाठराखण — पण ज्याच्या मनात खेळासाठी "काहीही" करण्याची मानसिकता होती, तो आज School Games Federation of India (SGFI) चा CEO बनला आहे

👉 टिळकनगर गावातून सुरू झालेला प्रवास!

पार्थ दोशी यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील टिळकनगर गावात झाला. आई मुख्याध्यापिका आणि वडील इंजिनिअर — साधं, मध्यमवर्गीय कुटुंब. शाळेपासूनच बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांमध्ये त्यांचा ओढा होता. बालवयातच त्यांनी मैदानावर स्वप्न बघायला सुरुवात केली.

👉 "माझं स्वप्न थांबवू शकत नाही!"


खेळासाठी मैदान नसेल, तर ते तयार करायचं; साहित्य नसेल, तर स्वतःच्या खिशातून विकत घ्यायचं — ही पार्थची जिद्द होती. कोणतीही सुविधा नसतानाही त्याने कधी तक्रार केली नाही. त्याचं एकच तत्व होतं — खेळासाठी काहीही

👉शिक्षण आणि अनुभव — दोन्ही हातात हात घालून!

खेळात उत्कर्ष मिळवतानाच पार्थने क्रीडा व्यवस्थापनाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. देशविदेशात विविध स्तरांवर अनुभव घेत, त्यांनी स्वतःला तयार केलं. कोणत्याही शिफारशीचा आधार न घेता, फक्त प्रामाणिक कष्टाच्या जोरावर ते पुढे सरकत गेले.

👉 महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे सर्वात तरुण अध्यक्ष!

पार्थ दोशी हे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्षपद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले. त्यांच्या नेतृत्वात संघटनेत नवा जोश आणि पारदर्शकता आली. ग्रामीण खेळाडूंना संधी, चांगल्या सुविधा आणि खुली निवड प्रक्रिया — यामुळे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेला नवसंजीवनी मिळाली.

👉 नगर जिल्ह्यात तीन राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन — एक क्रांतिकारी पाऊल!

पार्थ यांच्या पुढाकारामुळे नगर जिल्ह्यात तब्बल तीन राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. यामुळे जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय खेळाडूंशी संपर्क साधण्याची संधी मिळाली, स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधा वाढल्या आणि जिल्ह्याचं नाव देशभर झळकू लागलं.

👉 SGFI चा CEO — स्वप्नपूर्ती आणि जबाबदारी!

शालेय क्रीडा क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या School Games Federation of Indiaच्या CEO पदावर पार्थ यांची निवड झाली. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ही संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते. पार्थ यांच्या नियुक्तीमुळे व्यवस्थापनात पारदर्शकता, गुणवत्ता आणि खेळाडू केंद्रित दृष्टिकोन येण्याची अपेक्षा वाढली.

👉 नव्या योजना आणि दूरदृष्टी

CEO म्हणून पार्थने ग्रामीण भागात अधिक स्पर्धा, गुणवत्ता-आधारित निवड प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना आणि पारदर्शकता यावर विशेष भर दिला. खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून काम करणं, ही त्यांची खरी ओळख ठरली आहे.

👉 भारताचं आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व — ISF जनरल असेंब्ली,सर्बिया!

८ एप्रिल २०२५ रोजी पार्थ दोशी यांनी झ्लातिबोर, सर्बिया येथे पार पडलेल्या International School Sport Federation (ISF) च्या जनरल असेंब्लीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. विविध देशांतील प्रतिनिधींसोबत संवाद साधत त्यांनी भारतातील क्रीडा क्षेत्रातील बदल, योजना आणि दृष्टीकोन मांडला.

त्यांनी ISF अध्यक्ष श्री. झेल्ज्को टॅनास्कोविच यांच्या सत्कार समारंभात देखील सहभाग घेतला. हा अनुभव भारताच्या शालेय क्रीडा विकासात मोलाची भर घालणारा ठरला.

👉 पार्थ दोशी यांचा संदेश:

माझं स्वप्न मोठं होतं, आणि माझं ध्येय स्पष्ट होतं — मग साधनं असोत की नसोत, मी मागे हटलो नाही.

👉 उद्या लाखो मुलांना प्रेरणा देणारा चेहरा!

पार्थ दोशी यांची वाटचाल ही केवळ त्यांच्या व्यक्तिगत यशाची कहाणी नाही, तर ती संघर्षातून घडलेल्या यशस्वी नेतृत्वाची प्रेरणादायक गाथा आहे. त्यांनी हे सिद्ध केलं की नुसती इच्छा नाही, तर जिद्द, प्रामाणिकपणा आणि स्पष्ट दृष्टिकोन असेल, तर कुठलाही टप्पा दूर नाही.

पटणा (बिहार)/ गौरव डेंगळे/१५ मे २०२५:बिहारमध्ये पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ मध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत एकूण १५८ पदकांची कमाई केली आणि देशभरात आपला पहिला क्रमांक पक्का केला. या स्पर्धेत राज्याने ५८ सुवर्ण,४७ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांची भरघोस कमाई केली आहे.#महाराष्ट्राच्या_खेळाडूंची_बहारदार_कामगिरी!या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत राज्याचं नाव उंचावलं. अ‍ॅथलेटिक्स, कुस्ती, जलतरण, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी आणि जिम्नॅस्टिकसारख्या खेळांमध्ये महाराष्ट्राने वर्चस्व प्रस्थापित केलं.#हरियाणा_व_राजस्थान_मागे_राहिले!महाराष्ट्राच्या पाठोपाठ हरियाणाने दुसरं स्थान पटकावत ११७ पदकं जिंकली. त्यानंतर राजस्थानने ६० पदकांसह तिसरे स्थान मिळवले.दिल्ली,कर्नाटक आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांनाही महाराष्ट्राच्या तुलनेत कमी पदकं मिळाले.#प्रशासनाची_भूमिका_आणि_पुढील_योजना!राज्य सरकारने खेळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षकांची नियुक्ती, आर्थिक सहाय्य आणि आधुनिक प्रशिक्षण केंद्रांची उभारणी यांमध्ये भरीव योगदान दिले आहे. याशिवाय शालेय व महाविद्यालयीन स्तरावरून खेळाडूंना निवडून पुढे घेऊन जाण्याची मजबूत यंत्रणा यशस्वी ठरली आहे.

#क्रीडामंत्री_यांचे_वक्तव्य:

ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.आमच्या खेळाडूंनी संपूर्ण देशात सर्वोत्तम कामगिरी केली.आम्ही पुढेही त्यांना हवे ते सहकार्य देत राहू.


#महाराष्ट्रासाठी_पुढील_पाऊल – #आंतरराष्ट्रीय_यशया कामगिरीमुळे अनेक खेळाडू आता राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं प्रशिक्षण, फिजिओथेरपी, पोषण आहार, आणि मानसिक तयारी यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जातील.


कोपरगाव (गौरव डेंगळे) – ट्रॅडिशनल शोतोकन कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने दरवर्षी आयोजित होणारी वार्षिक ब्लॅक बेल्ट परीक्षा आणि प्रशिक्षण शिबिर यंदा दिनांक ४ मे ते ६ मे २०२५ दरम्यान कोपरगाव येथे यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरात व परीक्षेत राज्यभरातून एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथून ७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

या शाळेतील आपेक्षा भगत,साईशा जोरी आणि भार्वी थोरात यांनी उत्तम कामगिरी करत प्रथमच ब्लॅक बेल्ट प्राप्त केला. तर हर्ष लंगोटे याने दुसऱ्या डिग्रीचा ब्लॅक बेल्ट (2nd Dan) मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सरस ठोळे,आदर्श भगत, धनश्री सोनवणे, अनन्या पुनकर व शिवकन्या घोरपडे यांनी ब्लॅक बेल्ट कॅम्पमध्ये सहभागी होऊन प्रात्यक्षिकांद्वारे कराटेच्या तंत्रांची प्रगती साधली.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षिका वर्षा देठे यांचा 'बेस्ट इन्स्ट्रक्टर' म्हणून सन्मान करण्यात आला.त्यांनी दीर्घ काळापासून शिस्तबद्ध प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,नेतृत्वगुण आणि आत्मसंरक्षण कौशल्य विकसित केले आहे.त्यांच्या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे  शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, शिक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाने, नथाली फर्नांडिस यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या परीक्षा व शिबिराचे आयोजन शिहान सुदर्शन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कराटेचे शारीरिक व मानसिक महत्व पटवून दिले. शिबिरात काता (तांत्रिक हालचाली), कुमिटे (लढाईचे तंत्र), ब्रेकिंग टेक्निक्स, डिसिप्लिन, शारीरिक तंदुरुस्ती आणि कराटेचे मूलभूत तत्त्वज्ञान यावर विशेष भर देण्यात आला.

या यशामुळे श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचा गौरव वाढला असून,पालक व शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षिकेचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

पाटणा, ५ मे २०२५(गौरव डेंगळे)– बिहारमध्ये सुरू झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ स्पर्धेला आज भव्य सुरुवात झाली. देशभरातील युवा खेळाडूंनी आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करत स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ऊर्जा आणि उत्साहाची नोंद केली.

पटण्याच्या पाटलिपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, सर्व राज्यांच्या खेळाडूंची मिरवणूक आणि प्रमुख नेत्यांचे प्रेरणादायी भाषण झाले. बिहारचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत खेळांना अधिकृत सुरुवात झाली.


पहिल्या दिवसाचे ठळक घडामोडी:


अॅथलेटिक्स (धावण्याचे प्रकार): धावण्याच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या धावपटूंनी सुरुवातीलाच चांगली कामगिरी केली. हरियाणा आणि केरळच्या खेळाडूंनी मध्यम अंतराच्या शर्यतींमध्ये वर्चस्व दाखवले.


कुस्ती: हरियाणाने अपेक्षेप्रमाणे कुस्तीत वर्चस्व राखत मुलांच्या ६० किलो फ्रीस्टाईल प्रकारात पहिले सुवर्णपदक पटकावले.


नेमबाजी आणि तिरंदाजी: पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या नेमबाजांनी अचूकतेचं दर्शन घडवलं. ईशान्य भारतातील तिरंदाजांनी उत्कृष्ट स्थैर्य व नियंत्रण दाखवलं.


जलतरण: कर्नाटकच्या जलतरणपटूंनी पहिल्याच दिवशी दोन विक्रम मोडून स्पर्धेची रंगत वाढवली. मुलांच्या १०० मीटर फ्रीस्टाईल आणि मुलींच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात नवे विक्रम नोंदले गेले.



पहिल्या दिवशी खेळाडूंनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धेची उंची अधिकच वाढली आहे. पुढील काही दिवसांत ५००० हून अधिक खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली चमक दाखवणार असून, नवे तारे उदयास येतील अशी अपेक्षा आहे.

बेलापूर ( प्रतिनिधी)-एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर येथील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी चिरंजीव साईश रामेश्वर ढोकणे याने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपन्न केले असून त्यांनी केलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.                             चिरंजीव साईश ढोकणे एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत आहे.त्याने आय एम विनर या परीक्षेत दोनशे पैकी 180 गुण मिळवून राज्यात पाचवा जिल्ह्यात दुसरा व तालुक्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवला. त्याचबरोबर बीटीएस परीक्षेत राज्यामध्ये सहावा जिल्ह्यातील तिसरा तर तालुक्यात पहिला येण्याचा बहुमान मिळविला तसेच एन एस सी परीक्षेत राज्यात सातवा येण्याचा बहुमान मिळवला तसेच मंथन या परीक्षेत राज्यांमध्ये नववा जिल्ह्यात चौथा व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तसेच ऑलिंपियाड या परीक्षेत राज्यात नववा जिल्ह्यात सहावा क्रमांक व तालुक्यात प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला तसेच लक्षवेध परीक्षेत राज्यांमध्ये तेरावा जिल्ह्यात आठवा येण्याचा बहुमान मिळवला तसेच महात्मा फुले जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. या सर्व स्पर्धेमध्ये चिरंजीव साईश यांने कमी वयात हा बहुमान मिळवला आहे. त्याला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पैठणी मॅडम व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या वर्ग शिक्षिका श्रीमती मेघा पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले साईश ढोकणे हा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव आहेत

येवला,एसएनडी मैदान – येथील एसएनडी मैदानावर पार पडलेल्या रोमहर्षक सामन्यात नंदुरबारने श्री शारदा संघावर ३ गड्यांनी विजय मिळवला.


कमी धावसंख्येच्या या सामन्यात श्री शारदा संघाला केवळ ७५ धावांत गुंडाळण्यात नंदुरबारच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने यश मिळवले. जय शिंदे आणि सैराम शेलके हे दोनच फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले, त्यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या.


नंदुरबारकडून दुर्व तपस्वीने भेदक गोलंदाजी करत ३ महत्त्वाचे बळी घेतले. त्याला हंसराज आणि तनयने प्रत्येकी २ बळी घेऊन उत्तम साथ दिली आणि शारदा संघाचा डाव लवकर संपवला.


७६ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना नंदुरबारच्या संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी लवकरच गडी गमावले, मात्र संयम राखत त्यांनी फक्त ८ षटकांत ७ गडी गमावून विजय मिळवला.


इशी गावितने नाबाद २५ धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली, तर जॉननेही २१ धावांची उपयुक्त खेळी केली. श्री शारदाकडून विहान कसलीवालने जबरदस्त गोलंदाजी करत ४ बळी घेतले, तर विराट घेगडमलनेही ३ बळी घेतले आणि पुनरागमनाची आशा निर्माण केली होती.

लखनौ (गौरव डेंगळे):SGFI ने ही पद्धत लागू केली कारण अनेक वेळा खेळाडूंना शाळा संपल्यानंतर किंवा इतर कारणांमुळे खेळात सातत्य ठेवता येत नाही,पण त्यांनी पूर्वी दिलेला परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो.त्यामुळे मागील दोन वर्षांतील अधिकृत सहभागाचे सर्टिफिकेट खेळाडूच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाते.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने डिजीलॉकर इंटिग्रेशनसह डिजिटल परिवर्तन स्वीकारले आहे.लखनौ क्रीडा प्रशासनातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून,भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, भारतीय स्कूल गेम्स फेडरेशन (SGFI) ने त्यांची सर्व क्रीडा प्रमाणपत्रे डीजीलॉकर सह यशस्वीरित्या एकत्रित केली आहेत.यासह,संपूर्ण भारतातील तरुण खेळाडूंसाठी अखंड आणि सुरक्षित प्रवेश सुनिश्चित करून, डीजी लॉकर द्वारे प्रमाणपत्रांचे पूर्ण-प्रमाणात डिजिटल वितरण कार्यान्वित करणारी SGFI ही पहिली राष्ट्रीय महासंघ बनली आहे.

यावेळी डॉ. मनसुख मांडविया केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, यांनी SGFI च्या उपक्रमाचे कौतुक केले,ते म्हणाल की डिजिलॉकरद्वारे क्रीडा प्रमाणपत्रांचे डिजिटायझेशन हे क्रीडा प्रशासनातील एक क्रांतिकारी पाऊल आहे.यामुळे आमच्या युवा खेळाडूंना सक्षम बनवेल आणि प्रणाली अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल."

रक्षा खडसे,युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री, म्हणाल्या की या डिजिटल परिवर्तनाचा भारतातील लाखो तरुण खेळाडूंना फायदा होईल. आमच्या भावी चॅम्पियन्सना समर्थन देणारी आणि त्यांचे पालनपोषण करणारी एक मजबूत डिजिटल स्पोर्ट्स इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

तंत्रज्ञान हे आता केवळ सक्षम करणारे नाही, तर ते विकासाचा आधार आहे. आम्ही एक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली तयार करत आहोत जी प्रामाणिक आणि पारदर्शक आहे.मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांपैकी एक असलेल्या SGFL ने या डिजिटल परिवर्तनाची अंमलबजावणी करण्यासाठी एक अग्रगण्य पाऊल उचलले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने,आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की भारतीय शालेय खेळ महासंघाने डिजीलॉकर प्रणालीवर आधीच अपलोड केले आहे.

68 व्या राष्ट्रीय शालेय खेळ (2024-25): 59,637 प्रमाणपत्रे 67 व्या राष्ट्रीय शालेय खेळ (2023-24): 60,385 प्रमाणपत्रे


हे डिजीलॉकर प्लॅटफॉर्मवर प्रकाशित 1,20,000 हून अधिक प्रमाणपत्रे (सहभाग आणि गुणवत्ता) एकत्रित उपलब्ध आहे.आम्हाला विश्वास आहे की दोन पूर्ण वर्षांचा डेटा कव्हर करणारी एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रमाणपत्रांचे योगदान देणारे आम्ही पहिले राष्ट्रीय क्रीडा महासंघ असणार आहे असे माहिती माननीय श्री दीपक कुमार (SGFI चे JAS अध्यक्ष) तसेच SGFI च्या सन्माननीय कार्यकारी समिती सदस्यांसह,हा उपक्रम प्रत्यक्षात अमलात आणण्याचा मोलाचा वाटा आहे.

68 व्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप (2024-2025) आणि 67 व्या राष्ट्रीय स्पर्धेतील (2023-24) सर्व प्रमाणपत्रे आता उपलब्ध आहेत.

गौरव डेंगळे/श्रीरामपूर:खेलो इंडिया युथ गेम्सच्या ७ व्या आवृत्तीत कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पढेगावकर वीरेंद्र मुंडलिकची निवड झाली आहे. ४ मे ते १५ मे २०२५ दरम्यान बिहारमध्ये या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या राज्य चाचण्यांमध्ये वीरेंद्रने अपवादात्मक कौशल्ये दाखवली,ज्यामुळे त्याला राज्य संघात स्थान मिळाले.त्याला राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक, NSNIS कोच महेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले आहे,ज्यांच्या मार्गदर्शनाने वीरेंद्रच्या निवडीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वीरेंद्र हा यशवंत विद्यालय पढेगावचा विद्यार्थी आहे.

या तरुण खेळाडूचा संघात समावेश केल्याने त्याचे समर्पण आणि प्रतिभा अधोरेखित होते आणि तो आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जोरदार प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे.राज्य संघात निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष शिरोळे सर, काका चौधरी,नितीन बलराज, संभाजी ढेरे,अजित कदम तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

तेलंगणा (गौरव डेंगळे) ःपी जे आर स्टेडियम,तेलंगणा येथे झालेल्या पहिल्या 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप स्पर्धेत कर्णधार श्रिया गोठोस्कर नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने यजमान संघाला  सरळ दोन सेटमध्ये हरवून सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांमध्ये महाराष्ट्र संघाला कांस्यपदक समाधान मानावे लागले.तेलंगणा येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील आठ राज्य पात्र ठरले होते.अंतिम सामन्याच्या सुरुवातीला यजमान तेलंगाना संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवत पहिल्या सेटमध्ये ४ गुणांची आघाडी घेतली.श्रिया गोठोस्कर,संजना गोठोस्कर, अरमान भावे यांनी आपला खेळ उंचावत महाराष्ट्र संघाला आघाडी मिळवून दिली.पहिला सेट मध्ये महाराष्ट्राने १९- १९ बरोबरी सादत पहिला सेट २१- १९ ने पटकावला. दुसऱ्या सेटमध्ये देखील महाराष्ट्राच्या मुलींनी सुरेख खेळण्याचा प्रदर्शन करत दुसरा सेट २१- १७ ने जिंकत पहिल्या फेडरेशन कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राची कर्णधार श्रिया गोठोस्कर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.उमा सायगावकर,अरमान भावे,उपन्या कार्ले, संजना गोठोस्कर व अनुष्का बनकर यांनी देखील स्पर्धेमध्ये सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.प्रशिक्षक नितीन बलराज यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र मुलींचा संघाने स्पर्धेत एकही सेट गमावला नाही.सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र मुलीच्या संघाचे गोदावरी बायोरिफायनरीचे (साखरवाडी)अध्यक्ष श्री सुहास गाडगे, प्राचार्य श्री के एल वाकचौरे,संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल हरेगावच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती गजभिव,3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री मारुती हजारे,3A साईड महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष श्री स्वामीराज कुलथे आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.



अंतिम निकाल:

मुली:

सुवर्णपदक: महाराष्ट्र

रोप्यपदक : तेलंगाना

कांस्यपदक: हरियाणा


मुले:

सुवर्णपदक: तेलंगणा 

रोप्यपदक : पंजाब 

कांस्यपदक: महाराष्ट्र



कोट: प्रत्येक खेळामध्ये मुला- मुलींनी चिकाटीने सराव केला तर निश्चितच आगामी काही वर्षांमध्ये भारत विश्व क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल असेल. तेलंगणामध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी मोठ्या गटात खेळताना सुरेख खेळ करत विजेतेपद पटकावले.युवा खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे.


( श्री गौरव डेंगळे श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव)

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget