श्रीरामपूर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील (IPS) २०१६ तुकडीचे कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. परभणी, नागपूर आणि चंद्रपूर येथे त्यांनी केलेल्या कडक कारवाईमुळे अवैध धंद्यांवर लगाम बसल्याची उदाहरणे आहेत. मात्र, श्रीरामपूर शहरातील सध्याची परिस्थिती पाहता, येथील अवैध साम्राज्याला वेसण घालणे हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आणि कसोटी ठरणार असल्याचे चित्र आहे.

​श्रीरामपूर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसायाच्या आडून वाहनांची बेकायदेशीर कत्तल (स्क्रॅपिंग) केली जात आहे. परिवहन विभागाची (RTO) कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हा काळा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. केंद्र शासनाने जुनी आणि भंगार वाहने मोडीत काढण्यासाठी अधिकृत स्क्रॅप केंद्रे सुरू केली असताना, श्रीरामपुरातील हे अवैध व्यावसायिक सुट्या भागांच्या (Spare Parts) विक्रीसाठी आरटीओ कार्यालयाबद्दल चुकीची माहिती देऊन नागरिकांची उघड फसवणूक करत आहेत.

​त्याहून गंभीर बाब म्हणजे, या गाड्यांच्या पार्टसचा वापर करून दुसरीच बेकायदेशीर गाडी तयार केली जाते आणि ती विकली जाते. यामुळे गुन्हेगारांना पोलिसांपासून वाचणे सोपे जाते आणि गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांसमोर प्रचंड अडचणी निर्माण होतात.

​या अवैध स्क्रॅपिंग मार्केटमध्ये रात्रीच्या अंधारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. चांगल्या दर्जाची वाहने रात्रीतून भंगार करून, त्यांचे तुकडे करून गाड्या भरून रवाना केल्या जातात. यामध्ये अनेक गाड्या चोरीच्या, बँकांचे कर्ज बुडवून आणलेल्या किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या असण्याची दाट शक्यता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या प्रक्रियेतून थेट गुन्ह्यांचे पुरावेच नष्ट केले जात असल्याचा संशय नाकारता येत नाही.

​सर्वसामान्य नागरिकांना आणि डोळस जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसणारा हा ‘गुन्हेगारीचा कारखाना’ प्रशिक्षण घेऊन आलेल्या आणि कायदा शिकलेल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना का दिसत नाही? हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.

"स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक शहरात नेमके काय करायला येते?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

​हा व्यवसाय काही प्रभावशाली घटकांच्या छत्रछायेखाली आणि प्रशासनाच्या आर्थिक फायद्यापोटी वतत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे सुरू असल्याची चर्चा सध्या शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. पोलीसच गुन्हेगारांना 'माल पसार' करण्यास मदत करतात की काय, अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे.

नव्या सिंघम’कडून कारवाईची अपेक्षा!

​नवे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचा भूतकाळातील धडाका पाहता, ते श्रीरामपूरमधील या आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारीचे नेटवर्क मोडून काढणार का? स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर-तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या धाकाने तात्काळ ऍक्शन मोडमध्ये येणार की नेहमीप्रमाणे अर्थपूर्ण तडजोडी करून हे अवैध व्यवसाय असेच सर्रास सुरू राहणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

​धडाकेबाज एसपी मुम्मका सुदर्शन या 'भंगार माफियांच्या' मुसक्या आवळून श्रीरामपूरला गुन्हेगारीमुक्त करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.