Latest Post

श्रीरामपूर : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या व्यवस्थापन व कामकाजाच्या दृष्टीने नव्याने जिल्हा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- जिल्हाधिकारी अहिल्यानगर,उपाध्यक्ष- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर,सदस्य- जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर,सदस्य- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अहिल्यानगर. सदस्य- डॉ.अभिजीत दिवटे प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर,श्री. संजय साळवे वैद्यकीय सामाजिक अधिकारी रोटरी मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर अशासकीय सदस्य,श्री.बबन मस्के अशासकीय सदस्य,श्री. रत्नाकर ठाणगे अशासकीय सदस्य,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अहिल्यानगर सदस्य सचिव ही कमिटी दिव्यांगांच्या पुनर्वसनात्मक कामकाजाच्या दृष्टीने भविष्यात कामकाज पाहणार आहे.

      संजय साळवे यांनी अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर आणि आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र तसेच मूकबधिर विद्यालय संचलित दिव्यांग कल्याण मार्गदर्शन व पुनर्वसन केंद्र मार्फत दिव्यांगांच्या सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक, व सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय मौल्यवान योगदान दिलेले आहे. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत 58 दिव्यांग व्यक्तींना बीज भांडवल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे.     त्याचबरोबर जिल्हा परिषद 5% सेस फंडातून 38 दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली आहे.

       मागील पंचवीस वर्षापासून दरवर्षी राज्यस्तरीय दिव्यांग वधु वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून आजगायत 288 दिव्यांग व्यक्तींचे विवाह मोफत संपन्न करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत आत्तापर्यंत 14 दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवरील सायकल उपलब्ध करून दिले आहे.तसेच अनेक दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर,कुबडी व इतर कृत्रिम साहित्य उपलब्ध करून देऊन दिव्यांगांच्या जीवनात नवी पहाट निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.

     त्याचबरोबर विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करून दिव्यांग बांधवांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे

      दरवर्षी दिव्यांग महिला सन्मान सोहळा,संजय गांधी निराधार योजना,अंत्योदय  योजना,स्वतंत्र रेशन कार्ड, याचा लाभ दिव्यांगांना मिळवून दिला आहे. अलीमको नवी दिल्ली, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर मार्फत मोफत हातपाय मोजमाप व कॅलिपर्स  मोजमाप तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन करून 112 दिव्यांगांना याचा लाभ मिळवून दिला आहे.

     त्यांच्या या कार्याची पावती म्हणूनच त्यांची निवड जिल्हा व्यवस्थापन समितीवर करण्यात आली आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा समन्वयक डॉ.दीपक अनाप, दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी):श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हा दिवस भारतरत्न, महान अभियंता, दूरदृष्टी असलेले अर्थतज्ज्ञ तसेच आधुनिक भारताच्या विकासात मोलाचा वाटा उचलणारे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात उप प्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अभियंत्यांचे समाजातील व राष्ट्राच्या विकासातील योगदान अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “अभियंते केवळ इमारती, रस्ते वा प्रकल्प उभारणारे नसून ते समाजाच्या गरजा ओळखून विकासाचे दिशा-दर्शक ठरतात. विश्वेश्वरय्या यांचे कर्तृत्व व कार्यपद्धती हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही संदीप निमसे यांनी भूषविले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या प्रसंगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अभियंता दिनानिमित्त अभियंता समाजाला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर / प्रतिनिधी :श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गेल्या काही दिवसांपासून कामकाज ठप्प झाल्याने वाहन चालक व मालक वर्गाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.जुने अधिकारी बदलून गेल्यानंतर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्यासाठी काही काळ लागला. या काळात वाहन चालविण्याचे लायसन, वाहन हस्तांतरण (टी.ओ), वाहनावरील बोजा चढवणे-कमी करणे, वाहन पासिंग आदी महत्त्वाची कामे प्रलंबित राहिली. परिणामी अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले.हातावर पोट असलेले वाहनचालक, काहीजण उसनवारी करून वाहने घेऊन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र कागदपत्रे वेळेत मिळाली नाहीत तर त्यांचे स्वप्न धुळीस मिळते. विशेषतः वाहन परवाना मंजुरीला सहा सहा महिने लागल्याने, नोकरीच्या संधी गमावणारे तरुण मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे असून, प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिल्यानगर श्री. विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर श्री. अनंता जोशी व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर श्री. संदीप निमसे यांनी स्वतः लक्ष घालून कामकाज सुरळीत करावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.


श्रीरामपूर (प्रतिनिधी)-स्वस्त धान्य दुकानाच्या इ पॉज मशिनवर   मराठीमध्ये फीडिंग झालेल्या शिधापत्रिका धारकांचे बिलच होत नसल्यामुळे गोरगरिबांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली असून  या बाबत तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .                      माहे सप्टेंबर महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून उशिरा धान्य वाटप सुरू झालेले आहे त्यातच इ- पॉज मशीन वर मराठी भाषेत फीडिंग केलेल्या ऑनलाईन रेशन कार्डचे धान्याचे बिलच निघत नसल्यामुळे अनेक ठिकाणी वितरणव्यवस्थेचा गोंधळ उडालेला पहावयास मिळत आहे . कार्डधारक आणि दुकानदार यांच्यामध्ये विनाकारण वादावादी होत आहेत इंग्रजी डाटा फीडींग असलेल्या  कार्डधारकाचे  बिल निघत आहे. त्यामुळे दुकानदार त्यांना धान्य देतात. परंतु मराठी भाषेत कार्डधारकांंची नावे भरलेली असलेल्या लाभधारकांचे बिलच निघत नसल्यामुळे त्यांना धान्य देता येत नाही त्यामुळे अनेक कार्डधारक धान्यापासून वंचित राहू शकतात . पॉज मशीन मध्ये झालेल्या या बदलामुळे कार्डधारकही वैतागले आहेत मागील महिन्यात धान्य मिळाले मग आत्ताच का देत नाही असाही सवाल लाभधारकांकडून विचारला जात आहे.त्यामुळे शासनाने तातडीने  पाज मशीन मध्ये दुरुस्ती करावी जेणेकरून सर्वांना सुरळीत धान्य मिळेल. याबाबत विशेष माहिती घेतली असता असे समजले की महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात ओयासिस कंपनीचे ई पॉज मशीन आहे त्याच मशीनला ही समस्या निर्माण झालेली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने त्यात दुरुस्ती करावी अशी कार्डधारकांची मागणी आहे याबाबत ऑल महाराष्ट्र फेर प्राईस शॉप किपर फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांचे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याबाबत मंत्रालयातील संगणक कक्ष अधिकारी प्रज्ञा पटेल यांच्याशी संपर्क केला असून दोन दिवसात ही समस्या सुटेल असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आल्याचे डोळसे पाटील यांनी सांगितले. अहिल्या नगर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपात आलेले अडचण तातडीने दूर करावे अशी मागणी दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सतीश हिरडे व उत्तर नगर जिल्हाध्यक्ष काशिनाथ आरगडे यांनी केली आहे

संगमनेर: ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक केवळ धार्मिक उत्साहापुरती मर्यादित न राहता, यावर्षी सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवणारी ठरली. पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणुकीनुसार शांतता, स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देत विविध गटांनी इथे मिलादुन्नबी, पैगंबर जयंतीदरम्यान महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले.

यात ​एका स्वयंसेवक गटाने मिरवणूक ज्या मार्गाने गेली, त्या मार्गाची तात्काळ स्वच्छता केली. त्यांच्या या कृतीतून 'स्वच्छता हाच धर्म' असा संदेश देण्यात आला. या तरुणांनी मिरवणुकीचा उत्साह कायम राखत सामाजिक भान जपले, ज्यामुळे नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.तर एका गटाने महा​आरोग्य शिबिराचे आयोजन ते देखील मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचार व औषधे अश्या शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार दिला गेला. धार्मिक उत्सवादरम्यान आरोग्यसेवेसारख्या उपक्रमामुळे लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश पोहोचला.​काही गटांनी पैगंबर मोहम्मद यांच्या मानवतावादी आणि शांततेच्या शिकवणुकीचा प्रसार केला. त्यांनी त्यांच्या विचारांचे फलक तसेच ऐतिहासिक आठवणीतल्या पुरातन काळातील वस्तू आणि माहितीपत्रके घेऊन लोकांना सर्वधर्म समभाव, सलोखा आणि एकता या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.


​एकंदरीत, यावर्षीची ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक धार्मिक उत्साहासह सामाजिक कार्याचा एक आदर्श बनली आहे. या उपक्रमांनी पैगंबरांच्या शिकवणुकीला केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतूनही लोकांपर्यंत पोहोचवले. याचीच दखल घेत ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार आणि न्यूज एन एम पी परिवाराने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले असून, पुरस्कार जाहीर केलेली नावे पुढीलप्रमाणे एकता नगर सोशल ग्रुप, ह्युमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशन, एन आर सी सी ग्रुप आणि मंत्री फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्टी, गवंडीपुरा मस्जिद ट्रस्टी अशा एकूण पाच संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, येत्या  शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3=00 वाजता  विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सय्यद बाबा चौक या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष वसीम उर्फ गुड्डूभाई सय्यद अहिल्यानगर  महिला जिल्हाध्यक्ष बानोबी शेख, महासचिव जमीर शेख, यांनी दिली आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आटवाडी, एकलहरे येथे मोठी कारवाई करून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ६ हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मुख्य आरोपी अमजद नौशाद सय्यद (वय ३०, रा. आटवाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर) हा सध्या फरार आहे.


गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सपोनि जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. आरोपी अमजद सय्यद याच्या घराच्या पोर्चमध्ये विमल ब्रॅण्डचा केसरयुक्त पान मसाला व तंबाखू असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आढळून आला.

तसेच घरामध्येही प्रतिबंधित मुद्देमाल असल्याचा संशय आल्याने आरोपीचा भाऊ हमीद सय्यद यांच्या उपस्थितीत घराचे कुलूप उघडण्यात आले. घराची झडती घेतली असता तेथेही मोठ्या प्रमाणात सुगंधी पान मसाला व तंबाखू सापडला. सर्व मुद्देमाल पंचांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमालाची एकूण किंमत ₹२,०६,१८४/- एवढी असून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी राजेश बडे यांना तातडीने कळविण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत गुन्हा दाखल करण्याची तजवीज करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की, राज्य सरकारने गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांवर घातलेला बंदी आदेश काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. नागरिकांनीही अशा अवैध व्यापाराविषयी माहिती पोलिसांना दिल्यास तातडीने कडक कारवाई केली जाईल.

बेलापूर (प्रतिनिधी)--अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टार नंबर 917/25  कलम 64(1) Bns 

सह 4,8,12 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार लॉज मालक,वय 27 वर्ष रा शिगवे नाईक याने  यातील आरोपी हा पीडित मुलीस लॉज वर घेऊन गेल्यानंतर सदर इसमाने पीडित हिचे वयाची कोणतेही कागदपत्रे पाहणी ना करता रूम उपलब्ध करून दिल्याने कलम 55 Bns सह कलम 17 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम वाढ करून त्यास अटक केली असून. न्यायालयाने  आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे.

     यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने आरोपीने गुन्ह्यास मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपीस गुन्हा करण्यास मदत केली म्हणून सदर लॉजच्या मालकास या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे 

    

    बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 नुसार आरोपीला  आजन्म करावासाची अर्थात त्याच्या नैसर्गिक उर्वरित आयुष्याच्या सश्रम  कारावासाची शिक्षा व द्रव्य दंड अशी शिक्षा नमूद करण्यात आली आहे.

     जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने दाखल सर्वच गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. गुन्ह्यामध्ये तपासादरम्यान लॉज /हॉटेल चालक, मालक यांचा निष्काळजीपणा व अप्रत्यक्ष /प्रत्यक्ष सहभाग दिसन आल्यास  वरील प्रमाणेच हॉटेल मालक लॉज मालक कॅफे रेस्टॉरंट यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे हॉटेल लॉज कॅफे मालकांनी याची खबरदारी घ्यावी की आपण रूम देताना अल्पवयीन मुला-मुलींना तर रूम देत नाही ना वयाची पडताळणी करूनच आपला व्यवसाय करावा अन्यथा चुकीचे काम केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget