रिडास इंडीया कंपनीने गुतंवणूकदारास साडे अकरा लखाने गंडवले,बुलडाणा शहर ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल.
बँगलोरच्या रिडास इंडीया कंपनीने बुलडाणा येथील एका गुंतवणूकदाराकडून तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून घेत मूळ परतावा व नफा न दिल्याच्या तक्रारीवरून आज 27 ऑक्टोंबर रोजी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात कंपनीमालक व इतर एका विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील इकबाल नगर, टिपू सुलतान चौकात राहाणाऱ्या फिर्यादी मो. साजीद अब्दुल हसन देशमूख यांनी 7 मार्च 2017 ते 28 सप्टेंबर 2018 दरम्यान स्वतः व कुटुंबातील आई,वडील, भाऊ,पत्नी यांचे एनएफटी व आरटीजीएस मार्फत 11 लाख 50 हजार रुपयांची बँगलोर येथील रिदास इंडिया कंपनीत गुंतवणूक केली. त्यांना कंपनी मालक तथा डायरेक्टर मो. अय्यूब हुसेन व मो. अनिस आयमन दोघे रा. बँगलोर यांनी गुंतवणूकीच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात नफ्याचा परतावा व मूळ रक्कम परत देण्याचे आमिष दिले होते. मात्र कंपनीकडून कोणतीच रक्कम देण्यात न आल्याची व इतरही नागरीकांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्यादीने आज 27 ऑक्टोंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चौकशी केली असता फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबातील सदस्यांना आमिष देऊन 11 लाख 50 हजार रुपयांनी त्यांना गंडविल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान कंपनी मालक तथा डायरेक्टर मो. अयुब हुसेन व मो. अनिस आयमन या दोघांविरुद्ध भांदवी कलम 420,406,409,34 सह महाराष्ट्र ठेवी वित्तीय संरक्षण अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदकिशोर काळे करीत आहे.