Latest Post

शिर्डी जितेश लोकचंदानी कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेले तसेच कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचे निदर्शनाला आल्याने संशयित असे कोरोना रुग्णांना शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या फेज २ या धर्मशाळेत स्वतंत्र विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते, अश्या एकूण 60 रुग्णांपैकी काल 23 व आज 32 रुग्णांना ठीक झाल्यानंतर आपापल्या घरी सोडून देण्यात आले आहे,
   राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, तसेच या सापडलेल्या कोरोना च्या रुग्णांच्या संपर्कात आलेले अनेक जण आहेत ,अशांना नगर व विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, काही  होम कॉंरटाईन करण्यात आले आहे,तर शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान च्या साई आश्रम फेज टू या धर्म शाळेतील हॉलमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करून येथे असे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले व संशयित एकूण 60 रुग्णांना गेल्या पंधरा दिवसा पूर्वी ठेवण्यात आले होते, चौदा दिवस येथे या रुग्णांना ठेवून त्यांच्यावर राहता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय गायकवाड,  ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गोकुळ घोगरे, डॉक्टर स्वाती मस्के व त्यांच्या वैद्यकीय पथकाने, साईबाबा संस्थान च्या वैद्यकीय पथकाने विविध औषध उपचार केले तसेच साई संस्थान मार्फत त्यांना जेवण ,नाश्ता ,चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती ,या साठ रुग्णांपैकी 23 रुग्ण पूर्ण बरे होऊन त्यांना काल सोडण्यात आले ,तर त्यानंतर आज 32 रुग्णांना या विलगीकरण कक्षातून पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले, काल आणि आज मिळून एकूण पंचावन्न संशयित रुग्ण पूर्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले,
 या लोकांनी या काळात  प्रशासनाने आमची सर्व व्यवस्था उत्तम ठेवली, याबद्दल आभार मानले ,या सर्व  रूग्णांवर व उपचार ,तेथील व्यवस्था यावर राहता तहसीलदार कुंदन हिरे हे विशेष लक्ष ठेवून होते,
 शिर्डी नगरपंचायत ,श्री साईबाबा संस्थान, पंचायत समिती राहता चे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनीही प्रशासनाला यासाठी मोठे सहकार्य केले ,असे तहसीलदार कुंदन हिरे यांनी यावेळी सांगितले.

शिर्डी जितेश लोकचंदानी- सध्या कोरनामुळे   लॉकडाऊन सुरू असून या काळात सर्वसामान्य गरीब व मोलमजुरी करणारेचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा गरजू  व गोरगरीब  व्यक्तींना  निवारा व भोजन यांची व्यवस्था  प्रशासन ठिक ठिकाणी  करत असून  शिर्डी व परिसरासाठी  तसेच राहाता तालुक्यातील  परराज्यातील मजुरांसाठी  शिर्डी जवळील  श्री साई पालखी निवारा मध्ये  विशेष  कक्ष उभारण्यात आला आहे , लॉक डाऊन चे नियम पाळत  व सर्व दक्षता घेत  येथे या  कक्षामध्ये  काही व्यक्तींना तसेच रुग्णांना शिर्डी जवळील निघोज येथील  ठेवण्यात आले असून त्यांना येथे आरोग्य व सर्व सुविधा प्रशासन देत आहे ,
 साई पालखी निवारा येथे 30 मार्च 20 20 पासून एकूण 142 लोक येथे ठेवण्यात आले असून यामध्ये 30 परराज्यातील आहे व 112 महाराष्ट्रातील आहे ,त्यामध्ये बारा महिला व दोन मुले असून या सर्वांची देखभाल व्यवस्थित करण्यात येत असल्याची माहिती राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली,
   सध्या राज्यात कोरोनाने हाहाकार माजला असून जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, त्या अनुषंगाने जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे, सर्वत्र काम धंदा बंद आहे, या मुळे सर्व गोरगरीब, मजदूर यांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होत , राहता तालुक्यातील अशा गरजू व  परराज्यातील मजूर लोकांना अडचण भासू नये किंवा त्यांची राहण्याची ,जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून शिर्डी जवळील साई पालखी निवारा येथे विशेष कक्ष उभारण्यात आला आहे, या कक्षामध्ये गरजू गोरगरीब व संशयित काही  रुग्ण असे एकूण 142 लोकांची येथे व्यवस्था करण्यात आली आहे ,30 मार्च पासून येथे हे लोक ठेवण्यात आले असून 112लोक राज्यातील आहे व 30 हे परराज्यातील आहे ,यामध्ये बारा महिला व दोन मुले आहेत ,या सर्व लोकांना सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गागरे व त्यांचे सर्व वैद्यकीय पथक, आरोग्यसेविका दररोज तपासणी व औषध उपचार करत आहेत, त्याच प्रमाणे निमगाव ,निघोज शिर्डी चे कामगार तलाठी  येथे देखरेख व व्यवस्था ठेवत आहेत, श्री साईबाबा संस्थान तर्फे या लोकांना सकाळ व संध्याकाळ दोन टाईम जेवण देण्यात येत आहे ,त्याचप्रमाणे इतर सामाजिक संस्थांकडून नाष्टा, दोन वेळेस चहा देण्यात येत आहे, तसेच या लोकांना टी-शर्ट, साबण, टूथपेस्ट ,व इतर आवश्यक सामान देण्यात आले आहे, या लोकांची सर्व व्यवस्था प्रशासन उत्तम रीतीने करत असून या सर्व लोकांना या लॉकडाऊन काळात येथेच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राहता चे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली, शिर्डीचे तलाठि अनिल मांढरे नोडल अधिकारी व  महसूलचे  कर्मचारी दिलीप मते यांच्या देखरेखीत उत्तम प्रकारे सेवा सुरू आहे. सध्या देशात राज्यात व जिल्ह्यात कोरोना मुळे लॉक डाऊन सुरू आहे ,त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सर्व तो प्रयत्न करीत आहे, अशावेळी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, विनाकारण घराबाहेर नागरिकांनी पडू नये, आपल्या घरातच राहावे ,तोंडाला मास्क लावावे ,लॉक डाऊन चे नियम पाळावेत, असे आवाहन राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

(जबरदस्त व्हायरल होत असलेलं एका लेटरची 'स्टोरी' खास आमच्या वाचकांसाठी)
प्रिय सत्यजीत दादा..,
नमस्कार.
आज तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यातल्या सुसंस्कार आणि माणुसकीने राहातेकरांना जिंकलं.. आठ महिन्याच्या आजारी 'शिवांश'साठी या लॉकडाऊन मधे आज प्रचंड झटलात व शिवांशच्या अत्यावश्यक वैद्यकीय प्रवासासाठी पोलीस महासंचालक मुंबई यांचे पत्र मिळाले याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत..
राहाता येथील आमचे मित्र राजेंद्र विष्णू सोमवंशी यांच्या आठ महिन्याच्या बाळाचे (चि.शिवांश) उपचारासाठी हैदराबाद येथे 'प्री-अपॉइंटमेंट' असल्याने  वैद्यकीय उपचार घेण्यासाठी वेळेत जाणे आवश्यक होते. परंतु राहाता पोलीस, शिर्डी डी.वाय.एस.पी., अहमदनगर जिल्हा एस.पी. यांचेकडून वारंवार विनंती करुनही हैदराबाद येथे जाण्यासाठी प्रवासी परवानगी मिळत नव्हती, चालढकल सुरु होती.  संचारबंदी व लॉकडाऊन चा भोकाडी यामध्ये मानवी मुल्यांनाही 'कोरोना' डसल्याचा भास आमचे मित्र तथा शिवांशचे वडील राजेंद्र सोमवंशी यांना झाला.
पोलिसांकडे अर्ज, कागदपत्रांची पूर्तता करूनही राजेंद्र यांच्या पदरी निराशा आली. हताश राजेंद्र माझ्या घरी आल्यावर मी प्रयत्न सुरु केले. अनेक पोलीस अधिकारी तथा महसूल विभागातील अधिकारी मित्रांनी या अवघड परवानगी पत्रासाठी मुंबईकडे बोट केले.
पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील माझ्या काही मित्रांना याबाबत सांगितले पण कोरोनाच्या महामारीने या सर्वांना मर्यादा आल्या असल्याचे मला स्पष्ट जाणवले.
वेळ कमी आणि त्यात लॉकडाऊन यामुळे अधिकचा वेळ वाया घालवणे परवडणारे नव्हते. मग थेट युवा नेते तथा महाराष्ट्र प्रदेश युवक  कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांच्या कानावर घडलेला प्रकार सांगितला.
सत्यजीतदादांची कार्यालयीन यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली. दर तासाला फॉलोअप, संवाद आणि धीर देणारे शब्द.. यामुळे आमच्याही जीवात जीव आला. मुंबईच्या पोलीस महासंचालक कार्यालयातून दोन तासातच संपूर्ण पूर्तता करुन फोन करण्यात आला. सत्यजीतदादांचे कार्यालयात असणारे  योगेश दिवाणे यांनी समन्वय करुन रात्री 11 वाजता शिवांश आणि त्याच्या आई-वडिलांना  राहाता ते हैदराबाद प्रवासासाठी परवानगीचे पत्र मिळाले.
आणि सोमवंशी कुटुंबातील सदस्यांचे डोळे पानावले.
सोमवंशी कुटुंबियांची कोणतीही ओळख, परिचय नसताना या अतिशय अवघड परिस्थितीत राहाता तालुक्यातील 'शिवांश'ला आज मदत मिळाली. सत्यजीतदादांच्या या माणुसकीला सलाम..🙏जगतगुरू संत तुकाराम महाराजांनी अभंगा म्हटलंय  "शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।। मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी ।।" याचाच प्रत्यय आम्हाला आज आला.
 ... 'शिवांश'ची ही 'हैदराबाद मेडिकल जर्नी'  निर्विघ्न होण्यासाठी सत्यजीतदादांनी एक इमर्जन्सी फोन नंबरही सोमवंशी कुटुंबाला दिला आहे.  धन्यवाद दादा.🙏
Get well soon Dear Shivansh❤️
       
 - --प्रा. जयंत गायकवाड, राहाता
(शिर्डी विधानसभा मतदारसंघ)
विशेष- हे सर्व घडत असतानाच शिवांशचे वडील राजेंद्र यांनी इतरही मोठ्या प्रस्थापित पुढाऱ्यांकडे मदतीसाठी प्रयत्न करून पाहिले परंतु काही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी मला मुंबई D.G.कार्यालयाचे परवानगी पत्र मिळाल्यावर समजले.

अहमदनगर- केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन काळात ज्या उद्योग आणि औद्योगिक प्रकल्पांना ते सुरू करण्याबाबत सवलत दिली आहे, अशा औद्योगिक प्रकल्‍प / उद्योगांना उत्‍पादन चालु करण्यासाठी किंवा उत्पादन क्रिया चालू ठेवण्यासाठी कोणत्याही लेखी वा इलेक्ट्रॉनिक पूर्वपरवानगीची आवश्यकता नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यात विविध जीवनावश्यक वस्तु शेतीशी निगडित उत्पादनांचा समावेश आहे.राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग प्रतिबंधात्‍मक आदेशानुसार, जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्‍तुंचे उत्‍पादन करणारे प्रकल्‍प ज्‍यात अन्न व संबंधित वस्तू, साखर, दुग्धशाळा, पशुखाद्य आणि चारा युनिट, फार्मास्युटिकल्स उत्पादन आणि त्यांचा व्‍यापार करणारे व्यापारी आणि त्यांची वाहतूक, लस, सॅनिटायझर्स, साबण आणि डिटर्जंट्स, मास्‍क, यांचे उत्पादन आणि वितरण करण्यात गुंतलेले लोक यासह जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनांचे युनिट वैद्यकीय उपकरणे, त्यांची उपकरणे व सहाय्यक सेवा आदींचा समावेश आहे.तसेच, ज्यांना सतत प्रक्रियेची आवश्यकता असते असे उत्‍पादन प्रकल्‍प (मात्र एमआयडीसी कडून तसे प्रमाणपत्र प्राप्‍त करुन जिल्‍हादंडाधिकारी यांची परवानगी घेतल्‍यानंतर) यांचाही यात समावेश आहे.सर्व शेती / बागायती उत्पादनांशी संबंधित प्रक्रिया, पॅकेजिंग व वाहतूक. खते, कीटकनाशके व बियाण्याचे उत्पादन व पॅकेजिंग युनिट आदिंचाही यात समावेश असणार आहे.कोळसा आणि खनिज उत्पादन, वाहतूक, स्फोटकांचा पुरवठा आणि खाणकामांशी संबंधित प्रक्रीया. खाद्यपदार्थ, ड्रग्ज, फार्मास्युटिकल आणि वैद्यकीय उपकरणांसाठी पॅकेजिंग मटेरियलचे उत्पादन करणारे प्रकल्‍प / उद्योग. गव्हाचे पीठ, कडधान्‍य आणि खाद्यतेल इत्यादीसारख्या अत्यावश्यक उपक्रमांच्या निर्मितीमध्ये गुंतलेली सुक्ष्‍म, मध्‍यम व लघु उद्योग यांनाही कोणत्याही लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक परवानगीची गरज असणार नाही, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.या प्रकल्‍प / उद्यो्गांनी कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शतीर्चे पालन करणे बंधनकारक असणार आहे. केंद्र सरकारने माल वाहतुकीस परवानगी दिली असल्याने, सर्व वस्तूंच्या वाहतुकीस (वेअरहाऊस स्टॉकिस्ट - घाऊक - किरकोळ विक्रेता) यांना परवानगीची आवश्यकता नाही. त्‍यासाठी वाहनावरील स्वयंघोषणापत्र (स्टिकर्स) हे पुरेसे मानले जाईल.प्रकल्‍प / उद्योगांनी किमान कर्मचार्‍यांवर काम केले पाहिजे आणि अंतर्गत स्वच्छता, सामाजिक अंतर,आरोग्य देखरेख आदीबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्‍यक राहील. औद्योगिक प्रकल्‍प / उद्योग यांना आवश्यक असणारी पॅकेजिंग युनिट चालविण्यास परवानगी राहील. या आदेशानुसार सर्व औद्योगिक प्रकल्‍प / उद्योगांना कच्च्या मालाची अखंडित पुरवठा साखळी सुनिश्चित करण्यासाठी, कच्च्या मालाचे उत्पादन करणार्‍या सर्व युनिट्सला आपरेट करण्याची परवानगी आहे. मात्र कच्च्या मालाचा पुरवठादार या आदेशाच्‍या तारखेपूर्वी संबंधित उत्पादकांच्या / पुरवठादारांच्या यादीमध्ये असणे आवश्‍यक आहे. उपरोक्‍त आदेशाचे उल्‍लंघन करणा-या कच्‍चामाल पुरवठादारांचा परवाना रद्द करणेबाबतची कार्यवाही करण्‍यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.कोणतीही व्‍यक्‍ती / संस्‍था / संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते  दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

शिर्डी राजेंद्र गडकरी /जय शर्मा । विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्यावतीने शिर्डी येथे, या लॉकंडाऊन काळात गरजूंना किरांणाचे वाटप करण्यात आले,
  विराट प्रतिष्ठान म.रा. या सामाजिक संस्थेचे राज्यभर मोठे जाळे असून विविध संकटसमयी या संघटनेच्या वतीने देशहीत लक्षात घेऊन नेहमी मदतीचा हात पुढे केला जातो ,अशातच  सध्या सुरू असलेल्या कोरोना माहामारी मुळे देशात व राज्यात मोठे संकट निर्माण झाले आहे ,देशभर सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे शिर्डी सुद्धा बंद आहे ,अशा परिस्थितीत शिर्डीतील गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबे दररोज हातावर पोट भरणारे मजूर मोठ्या प्रमाणात आहेत ,मात्र काही कामधंदे नसल्यामुळे व घरात बसून असल्यामुळे  शाखेच्यावतीने शिर्डीतील उपनगरांमधील अनेक गरजवंत व गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबाला, महिलांना घरोघरी जाऊन  201 पाकिटे तय्यार करुण किराणा सामानाचे नुकतेच वाटप करण्यात आले, सौ,जयाताई सुनीलराव सरोदे यांच्या हस्ते शिर्डी उपनगरातील अनेक भागात हे किराणा किटचे वाटप महिलांना  करण्यातआले, याप्रसंगी विराट महिला प्रतिष्ठानच्या काही महिलाही उपस्थित होत्या ,मात्र हे किराणा वाटप करताना लॉक डाऊन चे सर्व नियम व सोशल डिस्टंंन्स पाळत ,तोंडाला मास्क लावून हे किराणा वाटप करण्यात आले, तसेच कोणताही गाजावाजा करण्यात आला नाही, या अगोदरही विराट प्रतिष्ठानने नवरात्रीमध्ये गरजू महिलांना साड्या वाटप, मुलांना विद्यार्थ्यांना पुस्तके ,वह्या, शालेय वस्तूंचे वाटप ,दिव्यांगांना वेगवेगळ्या प्रकारांनी मदत तसेच राज्यातही विविध आपत्ती काळात विविध स्वरूपात मदत करण्यात आली आहे , सध्याच्या संकटसमयी गरजूंना किराणा कीट वाटल्याबद्दल विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्या चे शिर्डी व परिसरातून कौतुक होत आहे.


राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरू करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि ताप सर्दीसारखी लक्षणे दिसली तर लगेच फिव्हर क्लिनिकमध्ये दाखवावे असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यासाठी स्वतंत्र सीएसआर खाते उघडले असल्याचीही माहिती दिली.बऱ्याचवेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दुर्देवाने काही जणांचे मृत्यू झालेले आहेत, अशांसाठी आपण इच्छा असून काही करू शकत नाही अशी खंत व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्दी, ताप आणि खोकला यासारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार करुन घेतले तर रुग्ण मोठ्यासंख्येने बरे होऊन घरी जात असल्याचेही स्पष्ट केले.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योगांना माफक मुभा.
कोरोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने उद्यापासून काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यत शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच होती. परंतू अर्थचक्र सुरु करतांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जे उद्योजक-कारखानदार त्यांच्या कामगारांची काळजी घेतील, त्यांची तिथचे राहण्याची व्यवस्था करतील त्यांना उद्यापासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरु करायची आहे, व्हायरसची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका स्विकारायचा नाही असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत त्याचे तंतोतंत पालन केले जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यांच्या सीमा बंदच.
जिल्ह्यांच्या सीमा आपण उघडलेल्या नाहीत हे अधोरेखित करून मुख्यमंत्री म्हणाले की एका जिल्ह्यातील माणसे दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास अजूनही परवानगी नाही. राज्यातील नागरिकांसाठी हा लॉकडाऊन संपलेला नाही. 3 मे पर्यंत त्यांनी आहे तसेच घरी राहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे. राज्यात अँटी कोरोना पोलीस ही उत्तम सेवा देतांना दिसत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

वडाळा महादेव (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात वाशीम येथील 34 व परप्रांतीय 34 असे एकूण 68 मजूर वर्ग आपल्या घरी जात असताना प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांना दोन निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे.वडाळा महादेव येथील बस स्टँड परिसरात मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातील काही नागरिक तसेच मध्यप्रदेश येथील
बुऱ्हाणपूर येथील नागरिक लहान मुला बाळासह पायी प्रवास करत होते. यावेळी  काही स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती प्रशासनास दिली. तात्काळ तहसीलदार प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत, सदर व्यक्तींची चौकशी केली. त्यावर त्यांनी वाशिम जिल्ह्यातून कामानिमित्त तसेच मध्य प्रदेशमधून कामानिमित्त आलो असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. याच परिसरातील दोन कार्यालयांमध्ये निवारा केंद्र
तयार करून त्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली आहे. काल दुपारी तालुका वैद्यकीय अधिकारी  डॉ. मोहन शिंदे तसेच त्यांच्या पथकाने या मजुरांची वैद्यकीय तपासणी केली.सदर दोन्ही ठिकाणी ३४-३४  लहान-मोठे व्यक्ती ठेवण्यात आले आहे. सदर व्यक्तींची श्रीरामपूर येथील गुरुद्वारा येथून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या सांगितल्यानुसार श्रीरामपूर येथील अनेकांनी सदर नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी वडाळा महादेव ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget