Latest Post

अहमदनगर : कोपर्डी अत्याचार व हत्याकांड प्रकरणातील तीनही नराधमांना अहमदनगर न्यायालयाकडून फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर या फाशीच्या शिक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल पुष्टी (कन्फर्मेशन) याचिकेवर सुनावणी होऊन खटला मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग झाला आहे. १६ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश टी. व्ही. नलावडे व न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. आता मुंबई उच्च न्यायालयात या बहुप्रतिक्षित खटल्यावर लवकरात लवकर सुनावणी होऊन आरोपींवरील फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा सर्वचजण व्यक्त करत आहेत. पीडिता कुटुंबीयांच्या मागणीनुसार या महत्त्वपूर्ण खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उमेशचंद्र यादव काम पाहत आहेत.

नाशिक । प्रतिनिधी:राज्यात राष्ट्रपती राजवटीमुळे पालकमंत्री तथा मंत्र्यांना असणारे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांमध्ये असलेल्या पाण्याचे बिगर सिंचनासाठी वाटप करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, तर सिंचनासाठीचे वाटप अधिकार पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना राहणार आहेत. राज्यात विधानसभा भंग झाली असून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या कालावधीत राज्यांच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांचे अधिकार असतील. सचिवांमार्फत राज्याचा कारभार चालवला जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये पाणी आरक्षण बैठक होत असते. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत जिल्ह्याचे पाणीवाटप नियोजन केले जाते. मात्र, यंदा राष्ट्रपती राजवटीमुळे हे निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहेत. शासनाने राज्यातील पाटबंधारे विभागाच्या जलाशयांबद्दल तातडीने आदेश काढला आहे. बिगर सिंचनाच्या पाण्याचे वाटप करण्यासाठी तसेच आरक्षणासाठी जिल्हास्तरीय समितीला कायदेशीर अधिकार आहेत. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती याबाबत निर्णय घेत असते, तर सिंचनासाठीचे पाणी आरक्षित ठेवण्याबाबत जलसंपदा राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समिती निर्णय घेत असते. पाण्याचे आरक्षण गेल्या काही दिवसांत वादग्रस्त ठरत असल्याने या बैठकाही गाजत आहेत. यावर्षीचे पाणीवाटप व आरक्षणही वादाचा विषय होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र आरक्षण वेळेत करणे गरजेचे असल्याने शासनाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार प्रशासकीय अधिकार्‍यांना याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)नगर-मनमाड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. शिर्डी-राहाता या बाह्यवळण रस्त्यावर दररोज अपघात होतात. खड्ड्यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व शासकीय अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्याकडे केली. खा. लोखंडे यांनी यासंदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले.शिर्डी-राहता बाह्यवळण रस्त्यावरील खड्ड्यामुळे सूरज एकनाथ वाणी व दगडू माधव गोर्डे यांचा मृत्यू झाला होता. त्यास जागतिक बॅक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, कार्यकारी अभियंता एन. एन. राजगुरु, सार्वजनिक बांधकान विभागाचे अधीक्षक अभियंता पी. बी. भोसले, अधीक्षक अभियंता जी. एस. मोहिते, सुप्रिम इन्फ्रा कंपनीचे विक्रम शर्मा हे अधिकारी व ठेेकेदार जबाबदार असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालक नवनाथ गणपत वाणी (रा. नादुर्खी, ता. राहता). गंगाधर शंकर गमे (रा. केलवड, ता. राहता) यांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्याकडे केली.खासदार लोखंडे यांनी त्या संदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम सचिव व जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करुन माहिती दिली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघात होतात. वाहनांचे नुकसान होते. अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने या प्रकारात ठेकेदार व अधिकार्‍यांना जबाबदार धरुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी त्यास संदर्भात श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे सांगितल्यावरुन खासदार लोखंडे यांच्यासमवेत येऊन वाणी व गमे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्याकडे फिर्याद नोंदविण्याची मागणी केली.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असतानाही टोल वसुली केली जात होती. खासदार लोखंडे यांनी आंदोलन करुन निर्मळपिंप्री येथील टोल नाका बंद पाडला होता. खड्डे बुजविल्याशिवाय टोल चालु करणार नाही. असे सांगितले. दोन दिवसांनी ठेकेदाराने खासदार सुजय विखे यांची भेट घेतली. भेटीनंतर पुन्हा टोल नाका सुरु केला. टोल नाका सुरु झाल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी पुन्हा आंदोलन करुन निषेध व्यक्त केला. टोल नाक्यावर पोलिस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी पोलीस बंदोबस्त पुरविला. ठेकेदारांनी बाऊर उभे केले. अशी तक्रार लोखंडे यांनी केली.यासंदर्भात लोखंडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. खड्डे न बुजविता टोल वसुलीसाठी पोलीस बंदोबस्त पुरविला जातो. मात्र इतर वेळी पोलीस तत्परता दर्शवीत नाही, जिव गमविलेल्या नागरिकांना न्याय मिळत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रमाणिक अधिकार्‍याची नेमणुक करावी. संबंधित ठेकेदारांसह अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे. अशी आग्रही मागणी लोखंडे केली. अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी तत्काळ याप्रकरणी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची नेमणूक केली. चौकशी करुन तत्काळ अहवाल सादर करावा. अशा सूचना दिल्या. त्याचा अहवाल येताच उचित कारवाई करणार असल्याचे आश्वासन दीपाली काळे यांनी दिले. यावेळी शिवसेनेचे राजेंद्र देवकर, तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, सुधीर वायखिंडे, अतुल शेटे, संदिप दातीर, नानासाहेब बडाख, सोमनाथ पाबळे आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर (नगर): शहरातील हुसेननगर भागात लहान मुलांच्या भांडणातून दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन, गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. आज सायंकाळी पाऊणे पाचच्या सुमारास झालेल्या या घटनेत तीन जण जखमी झाले. जमावाने औरंगाबादच्या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमींवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिस सूत्रांनी सांगितले, की हुसेननगर येथे महेरू निसार शेख व रिजवाना फरीद शेख या शेजाऱ्यांमध्ये दोन घरांच्या मधल्या जागेवरून वाद आहेत. काल (ता. 12) सायंकाळी दोन्ही कुटुंबांतील मुले या जागेत खेळत असताना या दोन्ही कुटुंबांत वाद झाले. या प्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावरूनच आज सायंकाळी महेरू शेख हिचे नातेवाईक शेख रफद शेख रशीद (वय 26, रा. औरंगाबाद) व सय्यद मुजीब सय्यद मैनोद्दीन (वय 37, रा. पढेगाव, औरंगाबाद) मोठ्या वाहनातून तेथे आले. त्यांनी रिजवाना शेख यांच्या घरातील सदस्यांवर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. त्यात जमील रशीद शेख (वय 60), फरीद रशीद शेख (वय 38) व शरीफ रशीद शेख (वय 35) जखमी झाले. या प्रकारामुळे परिसरात मोठा जमाव जमला. जमावातील काहींनी गोळीबार करणाऱ्या दोघांना पकडून ठेवले.माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाने पकडलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक दुचाकी व एक मोटर जप्त केली. मोटारीतून एक तलवारही हस्तगत करण्यात आली. गावठी पिस्तूल आरोपींनी फेकून दिल्याने त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, जमावाशी झटापटीत रफद शेख व मुजीब सय्यद किरकोळ जखमी झाले. जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)  पत्नीच्या नावे काढलेले जीएसटी नंबर बंद करण्यासाठी एजंटामार्फत लाच घेणारा विक्रीकर अधिकारी आज श्रीरामपूरमध्ये एसीबीच्या जाळ्यात सापडले. एजंटगिरी करणारा टॅक्स कन्सल्टंट निघाला. दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.विक्रीकर अधिकारी सुनिल भास्कर टकले (रा. केडगाव) आणि कर सल्लागार निलेश सुरेश हरदास (रा. बेलापुर, श्रीरामपूर) अशी कारवाई झालेल्या दोघांची नावे आहेत.या दोघांनी जीएसटी नंबर बंद करण्यासाठी 4000 रूपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना एजंट हरदास याच्या कार्यालयातच दोघांनाही एसीबी पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. श्रीरामपूरमधील एका व्यक्तीच्या पत्नीने व्यवसाय सुरू करण्यासाठी जीएसटी नंबर काढला होता.परंतु काही कारणास्तव ते व्यवसाय सुरु करु शकले नाहीत. डिसेंबर 2018 मध्ये काढलेला नंबर करण्यासाठी त्यांनी कर सल्लागार असलेल्या हरदास याच्याशी संपर्क साधला. जीएसटी नंबर बंद करण्यासाठी कर सल्लागार हरदास यांचे मार्फत ऑनलाईन अर्ज करण्यात आला. दंड न भरता खाते बंद करण्यासाठी कर सल्लागार हरदास याने संबंधित व्यक्तीकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील विक्रीकर अधिकारी असलेल्या सुनिल टकले यांना साडेतीन हजार रुपये देण्याचे ठरले.पाचशे रुपये कमीशनच्या नावाखाली हरदास यालाही मिळणार होते. आज बुधवारी (दि.13) श्रीरामपुर शहरातील हरीकमल प्लाझा मधील हरदास याच्या कार्यालयात हे दोघे एसीबी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्याम पवरे, पोलिस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या टीमने ही कारवाई केली. दुपारपर्यंत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

श्रीरामपुर (प्रतिनिधी)अंगणात खेळणार्‍या मुलांच्या वादातून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात असलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून आज सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास श्रीरामपुरमधील हुसेननगर भागात गोळीबार करण्यात आला. यात तिघे जखमी झाले,१)शरीफ रशीद शेख २)जमील रशीद शेख ३)फरीद रशीद शेख सर्व राहणार हुसेन नगर श्रीरामपूर तर गोळीबार केल्यानंतर पळताना रस्त्यावर पडल्याने दोघे आरोपी जखमी झाले.१)शेख रफद शेख रशीद राहणार ओरंगाबाद  २)सय्यद मुजीब सय्यद राहणार ओरंगाबाद जखमींवर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गोळ्या झाडल्याची घटनास्थळी चर्चा होती.

अहमदनगर प्रतिनिधी :- मुंबई - 2014 विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर दिग्गज 
नेत्यांचे पक्षांतर  यामुळे काँग्रेस पक्ष कमकुवत झाला होता. त्यातच लोकसभा निवडणुकीत राज्यात केवळ एक खासदार निवडून आल्यानंतर काँग्रेसची अवस्था आणखीच बिकट झाली होती. या संकटातून बाहेर पडत, काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात सत्तेत सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष राज्य काँग्रेससाठी लक्की ठरल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्य काँग्रेसची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होती. या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात दारुण पराभव पत्करावा लागला. तर खुद्द अशोक चव्हाण आपली जागा वाचवू शकले नव्हतं. त्यानंतर चव्हाण यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला .लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे एकाचवेळी विरोधीपक्षनेता आणि प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले होते. विरोधीपक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार तर प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर मतचाचण्यांमध्येही काँग्रेसला 20 पेक्षा कमी जागा दाखवण्यात आल्या होत्या. अशा बिकट स्थितीत थोरात यांनी काँग्रेसला 2014 एवढ्याच जागा जिंकून दिल्या. यामध्ये शरद पवारांचा झंझावात महत्त्वाचा ठरला. तर यश हे थोरातांच्या पारड्यात पडले हे देखील तेवढंच खर आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे विरोधात बसण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची लॉटरी लागली. त्यामुळे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष थोरात लक्की ठरले असंच म्हणाव लागत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget