Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी-घरफोडी करून चोरून नेलेला मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करून तो फिर्यादीस मिळवून देण्याची कामगिरी कोतवाली पोलिसांनी केली आहे. चोरीला गेलेल्या साडेदहा तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी फिर्यादीला दोन लाख 73 हजार रुपये किमतीचे साडेसहा तोळे परत मिळाले आहे.याबाबत माहिती अशी की, गणेश रामदास लालबागे (वय 32 वर्षे रा. दर्शनकृपा, डी-1, रेल्वे स्टेशनरोड, आनंदनगर, अहमदनगर) यांच्या घरी घरफोडी करून चोरट्यांनी साडेदहा तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी लालबागे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज महाजन यांनी करून घरफोडी करणारे आरोपी किशोर तेजराव वायाळ (वय 45 रा. मेरा बुद्रुक, ता. चिखली, जि. बुलढाणा), गोरख रघुनाथ खळेकर (वय 34 रा. देवळाली चौक, सातारा परिसर, औरंगाबाद मूळ रा. शिरसवाडी ता. जि. जालना) यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त केले.न्यायालयाच्या परवानगीनंतर ते फिर्यादी लालबागे यांना देण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. सदरची कामगिरी नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, उपनिरीक्षक महाजन, पोलीस अंमलदार दीपक साबळे, बंडू भागवत, याकूब सय्यद, सुमित गवळी व दीपक कैतके यांनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार तरी केव्हा व नागरीकांची, प्रवाशांची  होणारी लुट थांबणार कधी ? असा सवाल सर्व सामान्य नागरीकाकडून विचारला जात आहे                                          आपल्या मागण्या बाबत एस टी महामंडळाचे कर्मचारी  ठाम आहे .शासन दखल घेत नाही कर्मचारी तुटेपर्यत ताणत आहेत त्याचा परिणाम सर्व सामान्यांच्या खिशावर होत आहे .एस टी कर्मचाऱ्यांंचा संप सुरु होवुन तीन महीन्याचा कालावधी उलटून गेला आहे.त्यांच्या मागण्यावर विचार करण्यास शासनास वेळ नाही काही बाबी न्यायालयाच्या कक्षेत गेलेल्या आहेत, तीन महीन्याच्या कालावधीत  एस टी महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे .त्यात महामंडळाचा तोटा तर झालाच शिवाय प्रवाशांना प्रवासासाठी दाम दुप्पट दर मोजावे लागले तसेच मागेल तितके पैसे देवुनही अनेक प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच गेल्या तीन महीन्यापासून हजारो बसेस डेपोत  उभ्या आहेत त्यांचाही मेंन्टेनन्स खर्च वाढणार आहे खाजगी वहातुकदारांना सोन्याचे दिवस आले आहेत प्रवाशांकडून मन मानेल तसे भाडे आकारले जात आहे .हे सर्व थांबणार कधी?  लाल परी रस्त्यावर धावणार कधी ? असा सवाल नागरीकाकडून विचारला जात आहे या सर्वापेक्षाही कर्मचाऱ्यांचीही अतिशय वाईट अवस्था आहे कुटुंबाचा दररोजचा खर्च कसा भागवायचा याची चिंता सर्वांनाच लागलेली आहे त्यातच संघटनांचे नेते गायब झालेले आहेत कर्मचाऱ्यांनीच आंदोलन हाती घेतलेले आहे .असे असले तरी हे आंदोलन कुठेतरी थांबले पाहीजे एस टी महामंडळ स्थापने पासुन सर्वात मोठा फटका महामंडळाला सध्या बसलेला आहे कोरोनामुळे ठप्प झालेले जनजिवन हळूहळू सुरळीत होत आहे आता लालपरी देखील रस्त्यावर धावणे गरजेचे आहे  .नाहीतर अनेक कुटुंबाची वाताहत होणार हे मात्र नक्कीच.

श्रीरामपूर प्रतिनिधी  - श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई करत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी संचलित नांदुर ता. राहाता शाळा मधील संगणक चोरी करणारे गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोहन विजय बोधक (१९) आणि रोहित शांताराम जाधव (२२) या दोन आरोपींना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार ५ किंवा ६ जानेवारी २०२२ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी संचलित शाळा नांदुर ता राहता शाळेमधील डेल कंपनीचे ७ मॉनीटर, ७ सीपीयू व संगणक साहित्य हे शाळेच्या संगणक कक्षाची पाठीमागील खिडकीची जाळी तोडुन आत प्रवेश करुन शाळेचे मुलांना शिकवण्यासाठी लागणारे संगणक अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. या प्रकरणात मधुकर सोपान वल्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदार मार्फत हा गुन्हा रोहन बोधक आणि रोहित जाधव यांनी मिळून केल्याची माहिती पोनि संजय सानप यांना मिळाली. त्यावरुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे तपास पथक यांनी नांदुर भागात सापळा रचुन रोहन बोधक याला शिताफिने पकडले. त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले तसेच गुन्हयातील ७ डेल कंपनीचे मॉनिटर व ७ डेल कंपनीचे सीपीयु व संगणक साहित्य हे मिळून आले तसेच त्याचा साथीदार रोहित शांताराम जाधव यास आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पाठलाग करुन पकडले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.सदरची कामगिरी मनोज पाटील सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, संदीप मिटके सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि संजय सानप, सपोनिरी बोरसे, पोना/राशिनकर, पोना/रघुवीर कारखेले, पोना/पंकज गोसावी, पोकॉ/राहुल नरवडे, पोकॉ/गौतम लगड, पोकों/गौरव दुर्गुळे, पोकॉ/रमीजराजा आत्तार यांचे पथकाने केलेली आहे. पुढील तपास पोना रघुवीर कारखेले हे करीत आहे.


श्रीरामपूर (गौरव डेंगळे) १८/०२: येथील न्यू इंग्लिश स्कूल क्रिकेट मैदानावर अध्यक्ष श्री राम टेकावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळविण्यात आलेल्या सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीरामपूर इन्‍द्राज संघाने श्रीरामपूर फायटर्स संघाचा २० धावांनी पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

आज रंगलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन श्री दौलत पवार, सौ अस्मिता परदेशी, सौ सारिका भांड,श्री नितीन गायधने,श्री नितीन बलराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.८ संघाने सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत श्रीरामपूर रायडर्स,श्रीरामपूर फायटर्स,श्रीरामपूर इंद्राज, श्रीरामपूर चॅलेंजर्स संघांनी साखळीतील प्रत्येकी २-२ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीरामपूर रायडर्स संघाने श्रीरामपूर चॅलेंजर्स संघाचा ६ गडी राखून तर दुसरा उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीरामपूर इंद्राज संघाने श्रीरामपूर फायटर्स संघाचा ८ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक इन्‍द्राज संघाने जिंकली व प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इन्‍द्राज संघाने निर्धारित ६ षटकात ६ गडी बाद ८१ धावा फटकावल्या.यामध्ये ज्वेल पटोले ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रायडर्स संघाकडून मोहित २ गडी बाद केले. विजयासाठी ८२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला  रायडर्स संघ ६ षटकात ६१ धावाच करू शकला. व हा सामना इन्‍द्राज संघाने २० धावांनी जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री लकी सेठी, तमन भाटीयानी,मातापुरचे सरपंच श्री गणपत गायके,श्री विनोद जोशी,श्री बन्सीलाल फरवानी,श्री गौरव साहनी,श्री प्रशांत माळवे, क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अनुज पाटिल , इशन भोसले, साई सोनावणे,साई जवळे, मोहित माळवे आदी खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणारा ज्वेल पटोलेला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्याकरिता श्री नितीन गायधने,श्री नितीन बलराज,श्री निखिल फासाटे,श्री एस हलनोर, श्री अतुल जाधव,श्री दौलत पवार,दीपक रणपिसे आदींनी अथक परिश्रम घेतले.

श्रीरामपूर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व इतर आदिवासी भागात राहणाऱ्या आदिवासी समूदावरील होत असलेल्या अन्याय-अत्याचाराविरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद ही राष्ट्रव्यापी संघटना आक्रमक झाली असून याविरोधात संघटनेच्या वतीने श्रीरामपूर तहसीलदार यांजमार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी आर. एम. धनवडे, एस. के. बागुल, एम. आर. वैराळ, एस. के. मरभळ, प्रकाश पवार, एस. एल. सुर्यवंशी, संदिप पाळंदे, अनिल दुशिंग, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा प्रभारी पास्टर कर्डक, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जिल्हाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, रवी बोर्डे, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे शिवाजी गांगुर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रकारे ३६ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय अध्यक्ष एच. एन. रेकवाल, राष्ट्रीय संयोजक प्रेमकुमार गेडाम यांच्या सूचनेनुसार निवेदन दिले जात आहेत.

      निवेदनात म्हंटले आहे की, आदीवासींना त्यांचा मूळ अधिवास असलेल्या जल, जंगल आणि जमीन यांपासून विविध प्रकल्पांच्या नावाखाली विस्थापित केले जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विस्थापित झालेले बारूखेडा, सोमठाणा बु, नागरतास, अमोना, केलपानी, गुल्लरघाट, सोमठाणा खु, धारगड आदी गावांचे अद्यापही योग्य प्रकारे पुनर्वसन झालेले नाही. ३७० पेक्षा मृत आदिवासींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मेळघाटातील विस्थापित, जंगलात राहत असलेल्या आदिवासींवर वन विभागाने दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. मेळघाट व अन्य आदिवासींचे सामूहिक वन हक्काचे दावे मंजूर करावेत व प्रति व्यक्ती एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी. 

      शासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात आंदोलनाची गती अधिक तीव्र केली जाईल.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-लहान मुलांच्या भांडणाच्या कारणातुन दोन कुटुंबात जबर हाणामारी झाली असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत पोलीसांनी तीन जणाविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल केला आहे .पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला.                           

बेलापुरातील बोरुडगल्लीत राहणारे ,आतार व सोनवणे या दोन कुटुंबात दोन दिवसापूर्वी लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाले होते परंतु  ते वाद आपापसात समझोता करुन मिटविण्यात आले तेच वाद कालही उफाळून आले सोनवणे कुटुंब व आतार कुटुंब यांच्यात तुफान हाणामारी झाली  मारामारीत लाकडी दांडके लोखंडी साखळीचा वापर करण्यात आला             दोन दिवसापुर्वी सोनवणे व आतार कुटुंबातील लहान मुलात वाद झाले होते ते वाद दोन्ही कुटुंबांनी मिटविले त्या वेळी आतार यांच्या मुलाला कचरु सोनवणे याने मारले असा आतार कुटुंबीयांचा आरोप होता त्या रोषातुनच काल दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद झाले वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले त्या वेळी कचरु धोडीराम सोनवणे विकासा सोनवणे आकाश सोनवणे या तिघांनाही बेदम मारहाण करण्यात आली यात कचरु सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना रक्तभंबाळ अवस्थेत आगोदर पोलीस स्टेशन नंतर साखर कामगार दवाखान्यात पाठविण्यात आले असुन त्यांचेवर तसेच विकास सोनवणे व आकाश सोनवणे यां तिघेवर  साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत .मारामारीची घटना गावात पसरताच मोठा जमाव जमा झाला बेलापुर पोलीस स्टेशनला मोठी गर्दी जमा झाली घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक संजय सानप मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीसांनी संपुर्ण गावातुन गस्त सुरु केली रात्री बारा वाजेपर्यंत गावात तणावाची परिस्थिती होती पतितपावनचे सुनिल मुथा यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधुन घटनेचे गांभीर्य सांगितले त्यामुळे पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली कचरु धोंडीराम सोनवणे यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी अनिस दादासाहेब शेख अकील दादासाहेब आतार बबडी दादासाहेब आतार यांचेविरुध्द भादवि कलम ३०७ ,३२४ ,३२३ ,५०४ ,५०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक संजय सानंप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अतुल लोटके पुढील तपास करत आहेत

अहमदनगर प्रतिनिधी - एका गोडाऊनमध्ये साठा करून ठेवलेला तीन ट्रक गुटखा पोलिसांनी पकडला. बोल्हेगाव परिसरात बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली. कोतवाली पोलिसांनी नगर शहरातील कायनेटीक चौकात दुचाकीवरून गुटखा वाहतूक करणार्‍या दोघांना पकडल्यानंतर गुटखा गोडाऊनविषयी माहिती मिळाली होती. यानंतर ही कारवाई करण्यारत आली. रात्री उशिरापर्यंत गुटख्याची मोजदाद सुरू होती.दरम्यान गोवा, माणिकचंद, हिरा, सितार अशा विविध कंपनीचा हा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन तरुण दुचाकीवर गुटखा विक्री करण्यासाठी नगर-पुणे रोडवरून जात असल्याची खबर कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कायनेटीक चौकात सापळा लावला. तेथे पाठलाग करून दोन तरूणांना पोलिसांनी पकडले.त्यांच्याकडे पिशवीमध्ये गोवा गुटखा मिळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता बोल्हेगावातील गुटखा गोडाऊनची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी या गोडाऊनवर छापा टाकला. तेथे विविध कंपन्यांचा गुटखा साठा पोलिसांना मिळून आला. सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ट्रकमध्ये भरण्यात आला. तीन ट्रक भरून हा गुटखा होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget