Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी)  नेवासा फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुलबर्गा (कर्नाटक) येथील चौघांना शनिवारी रात्री (दि. 15) नेवासा-शेवगाव रोडवरील नागापूर गावच्या शिवारात हत्यारासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. देवराज कृष्णप्पा खडमंची (वय- 45), मारूती शिवकुमार खडमंची (वय- 19), रवी आनंद खडमंची (वय- 19), नागराज देवराज खडमंची (वय- 19 सर्व रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, एकजण पसार झाला आहे. त्यांच्याकडून एक टीव्हीएस स्टार दुचाकी, एक स्टीलचा सत्तूर, एक सूरा, एक लोखंडी दांडके, पाच मोबाईल असा 22 हजार 850 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.गुलबर्गा (कर्नाटक) येथील सराईत गुन्हेगारांची टोळी दोन दुचाकीवरून शेवगाव-नेवासा रोडने नेवासा फाट्याच्या दिशेने दरोडा घालण्यासाठी जात आहे. शेवगाव-नेवासा रोडवरील नागापूर गावच्या कमानीजवळ वनीकरणात सापळा लावला तर ते मिळून येतील, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख, सहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणेकर, पोलीस हवालदार बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक रवींद्र कर्डीले, विशाल दळवी, रवी सोनटक्के, अण्णा पवार, संदीप चव्हाण, राहुल सोळुंके, शिवाजी ढाकणे, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.पथकाने शनिवारी रात्री शेवगाव-नेवासा रोडवर नागापूरच्या कमानीजवळ सापळा लावला. काही वेळातच शेवगावकडून नेवासा फाट्याच्या दिशेने दोन दुचाकी येताना पोलिसांना दिसल्या. पोलिसांनी एकाचवेळी रस्तावर येत बॅटरीचा प्रकाश देऊन त्यांना घेराव घातला. यावेळी पोलिसांनी पुढे असलेल्या दुचाकीवरील दोघांना व मागे असलेल्या दुचाकीवरील दोघांना जेरबंद केले. तर एक जण दुचाकी घेऊन पसार झाला. पोलीस नाईक संदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चौघांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीक्कीतून शेतकर्‍याचे चार लाख चोरल्याची दिली कबुली 7 जानेवारी रोजी नेवासा बसस्थानकजवळ उभ्या असलेल्या दुचाकीच्या डीक्कीतून चार लाख रुपये चोरल्याची कबुली या चार भामट्यांनी दिली आहे. नेवासा येथील आसाराम नळघे यांना ऊस व कापूस विक्रीतून मिळालेले चार लाख रुपये त्यांनी स्वत:च्या व मुलाच्या खात्यावर टाकले होते. लोकांचे उसने घेतले पैसे देण्यासाठी नळघे यांनी 7 जानेवारीला मुलाच्या खात्यातून एक लाख पाच हजार रुपये व स्वत:च्या खात्यावरून तीन लाख दहा हजार रुपये काढले. चार लाख दुचाकीच्या डीक्कीत ठेवले तर, 15 हजार रुपये खिशात ठेवले. दुचाकी बसस्थानक परिसरात लावून जवळच असलेल्या कृषी केंद्र चालकाला 15 हजार रुपये देण्यासाठी गेले. काही वेळाने नळघे दुचाकीजवळ आले असता डीक्कीचे कुलूप तोडून चार लाख चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास सुरू केला होता. चार लाख चोरलेले चोरटे पुन्हा मोठा दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांनी जेरबंद केले आहेत.

देवळाली प्रवरा - १६ फेब्रुवारी २०१९
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे बिबट्या चा वावर वाढला असून रात्री  बिबट्याच्या एक शेळी ठार झाली आहे.     आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे श्रीरामपूर रोड लगत सोसायटी डिझेल पंप मागे असलेल्या ढुस वस्ती येथील निवासस्थानी दि. १६ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केला. परंतु कुत्र्यांच्या भुंकण्याने खेळाडू आप्पासाहेब ढुस व त्यांचे बंधू अरुण ढुस हे उठून बाहेर आलेने बिबट्याने मृत शेळी तशीच सोडून पळ काढला.
     ही शेळी पाच महिन्याची गाभन असल्याचे सांगून देवळाली सोसायटीच्या माजी संचालिका चांगुणाबाई ढुस व नंदा ढुस यांनी दुःख व्यक्त केले असून ढुस वस्ती व देवळाली परिसरातील शेतकरी वर्गामध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
     वन विभागाने या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन ढुस वस्ती परिसरात पिंजरा लाऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा व रात्री अपरात्री शेतात जाणाऱ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे.

अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये शिक्षक वर्गात येऊन वेळ कसा वाया घालवतात? हे सांगत त्यांनी शिक्षकांवर टीका केली आहे. त्यामुळे आता शिक्षक संघटना इंदुरीकर महाराजांवर नाराज झाल्या आहेत.
चार दिवसांपूर्वीच त्यांच्या किर्तनातलं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं होतं. ओझरमध्ये झालेल्या किर्तनात “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे वक्तव्य केल होतं. त्या पाठोपाठ आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे.

अॅड.अनिल परब, मंत्री, परिवहन, संसदीय कार्य, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर.

बुलडाणा - 15 फेब्रूवारी
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे राज्यात प्रतिबंधित गुटखा विक्री विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.काल अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी स्वतः एका टपरीवर गुटखा मिळतो का याची विचारणा केली असता त्याच्याकडे गुटखा असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी सोबत असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या पानठेल्याची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले. या झाडाझडतीमध्ये गुटखा पुड्या आढळून आल्याने टपरी धारकविरोधात अकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
       
 14 फेब्रुवारी रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे हे अकोला येथे स्वर्गीय वसंतराव धोत्रे यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाकरिता गेले असता त्यांनी अचानक निंबवाडी ट्रॅव्हल्स बस स्टँड जवळील मे.जामणिक कोल्ड्रिंक्स नामक पान टपरीवर जावून टपरीधारकला गुटखा मिळतो का अशी विचारणा केली असता त्याच्याकडे गुटखा विक्री होत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. त्यावेळी त्यांनी लगेचच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना त्या पानटपरीची झडती घेण्याचे आदेश दिले. झडती दरम्यान 150 रु. किमतीच्या बाजीराव पान मसाला 30 पुड्या, 80 रु. किमतीच्या करमचंद पान मसाल्याच्या 20 पुड्या, 850 रु किमतीच्या राज रजणीगंधा पान मसाल्याच्या 50 पुड्या, 210 रु आरएमडी च्या 30 पुड्या, 255 रु विमल कंपनीच्या 30 पुड्या अशा प्रतिबंधित गुटख्याच्या एकूण 160 पुड्या मिळून आल्याने नामदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशावरून अन्न सुरक्षा अधिकारी अकोला या. बा.दहातोंडे यांनी सुरेंद्र रामराव जामणिक वय 31 रा.अकोला याच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्वतः अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी पानटपरीवर केलेल्या या कारवाहीमुळे चिल्लर गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेतर्फे जिल्हा भरात 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान उर्दू सप्ताह मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याची सांगता आज शनिवारी 15 फेब्रुवारी उर्दू दिनी शहरात उर्दू जुलूस काढून करण्यात आली. या उर्दू जुलूस मध्ये शहरातील नऊ उर्दू माध्यमाच्या शाळांचे तीन हजार विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक सहभागी झाले होते. खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात समारोपाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी शाळेचे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अॅड. जयंत चौधरी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मुक्तार शहा. कलीमभाई कुरेशी, रज्जाकभाई पठाण, हाजी जलील काझी, विषय तज्ञ शाहीन अहमद,मुख्याध्यापिका जबीनखान, परवीन शेख, जैद मिर्झा, नसीम शेख, मोहम्मद ईमदादुल्लाह, नाझिया शेख, मजीद बागवान, अस्मा शेख तसेच मोहम्मद उमर बागवान, वसीम अहमद,मुद्दस्सर सय्यद,अल्ताफ शाह,एकबाल काकर, फिरोज पठाण, मोहम्मद आसिफ आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अहमदनगर जिल्हा साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष, शिक्षक बँकेचे संचालक व नगरपालिका शाळा क्रमांक पाच चे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी सांगितले की उर्दू साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी अहमदनगर जिल्ह्यात ऊर्दू सप्ताह साजरा करण्यात येतो. देशभरात असा सप्ताह साजरा करणारी अहमदनगर उर्दू साहित्य परिषद ही एकमेव संस्था आहे. यावर्षी जिल्ह्यातील 87 शाळांनी या उर्दू सप्ताहामध्ये सहभाग घेतला. वेगवेगळे कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये उर्दू भाषेचे महत्व व इतिहास, गीत, गजल गायन, हस्ताक्षर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, उर्दू जुलूस असे कार्यक्रम जिल्हाभर घेण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील 15000 उर्दू विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पुढील महिन्यांमध्ये राज्यस्तरीय ऊर्दू शिक्षण परिषद श्रीरामपूर येथे घेण्यात येणार असून सर्वसहभागी शाळांना सन्मानचिन्ह व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 नगरसेवक मुक्तार शहा यांनी उर्दू साहित्य परिषदेच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा देऊन उर्दू भाषेची गोडी ही मनावर भुरळ पाडणारी असून ही गोडी वाढावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. अॅड. जयंत चौधरी यांनी व्हाट्सअप च्या एका मेसेजवर जिल्हाभरांमध्ये हा सप्ताह साजरा झाला, ही एक फार मोठी बाब असून याच पद्धतीने उर्दु शाळांमधून वेगवेगळे कार्यक्रम घेऊन चांगले व दर्जेदार विद्यार्थी घडविण्याचे आवाहन त्यांनी केले . उर्दू सप्ताहमध्ये सहभागी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचा साहित्य परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. शहरातील विविध मार्गावरून हा जुलूस नगरपालिका परमवीर शहीद अब्दुल हमीद नगर पालिका शाळा क्रमांक पाच च्या प्रांगणात विसर्जित झाला. रस्त्यात ठिकठिकाणी जूलूसचे स्वागत करण्यात आले. उम्मती फौंडेशनतर्के जुलूस मधील सहभागी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप सोहेल बारूदवाला व त्यांच्या सहकार्‍यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकबाल काकर, मोहम्मद आसिफ, उमर बागवान, वसीम अहमद आदींनी केले. आभार अल्ताफ शाह यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एजाज चौधरी,  साबिर शाह,  अरबाज पठान, शाहनवाज,  युवराज पाटील, सुयोग सस्कर, शहजाद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील एका शिक्षण मंडळाशी संबंधित असलेल्या एका शाळेत काल व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच शिक्षक-शिक्षिकेच्या घडलेल्या ‘नाजूक’ प्रकरणामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला टाळे ठोकून संताप व्यक्त केला. दरम्यान, वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन मुख्याधिकार्‍यांसह संबंधित शिक्षक आणि शिक्षीकेची बदली केली आहे.या शिक्षक प्रेमीयुगुलावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.ही घटना व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच झाल्याने याबाबत चर्चेला उधाण आले आहे. घटनेची माहिती समजताच नगरपालिकेच्या तीन नगरसेवकांनी शिष्टाई करून पोलीस अधिकार्‍यांच्या मध्यस्थीने शाळेचे टाळे उघडण्यास सांगितले. या शिक्षण मंडळाच्या शाळेत गेल्या महिन्याभरापासून शिक्षक व शिक्षिकेमध्ये नको ते प्रकार घडत असताना शाळेतील विद्यार्थ्यांनी दैनंदिन शाळेच्या दुपारच्या सुट्टीत होत असलेला हा ‘आँखो देखा हाल’ काही पालकांना सांगितला. त्यावर या घटनेबाबत काल शुक्रवार दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजे दरम्यान संतप्त पालकांनी शाळेत येऊन टाळे ठोकले. या प्रकरणामुळे परिसरात सर्व नागरिक व महिलांनी गर्दी केली. शाळेला टाळे ठोकल्याने सर्वच विद्यार्थी शाळेच्या बाहेरच ताटकळत उभे होते.ही घटना समजताच राहुरी नगरपालिकेचे नगरसेवक दिलीप चौधरी, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, टाकळीमिया येथील सुरेश निमसे आदींनी धाव घेत प्रकरणाचे गांभीर्य समजावून घेत गटशिक्षण अधिकारी सुलोचना पटारे, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना पाचारण केले. उपस्थितांनी शाळेला टाळे ठोकणार्‍या पालकांची समजूत काढून शिक्षण अधिकारी पटारे यांनी या शिक्षक व शिक्षिकेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या प्रकरणावर तात्पुरता पडदा टाकण्यात आला आहे. दरम्यान या संबंधित शिक्षक आणि शिक्षिकेची बदली करण्यात आली आहे. तसेच मुख्याध्यापकांवरही दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेऊन त्यांचीही बदली करण्यात आली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget