बेलापूर(वार्ताहर)सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या प्रभु श्रीराम मंदिराच्या समितीचे विश्वस्त म्हणुन अहमदनगर जिल्ह्यातील ,श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरचे भूमिपुत्र स्वामी गोविंददेव गिरी यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी येथील मंदिर उभारणीचा मार्ग जवळपास पाचशे वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मार्गी लागला. लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. या मंदिराच्या विश्वस्तांची घोषणा आजच केंद्र सरकारने केली. त्यात बेलापूर येथील राष्ट्रसंत स्वामी पंडित गोविंददेव गिरि यांच्या नावाचा समावेश झाल्यामुळे बेलापूरात फटाके फोडुन मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला
त्यांचा जन्म बेलापूर येथे १९४९ मध्ये व्यास परिवारात झाला. ११ वी पर्यंत शिक्षण जे टी एस् हायस्कूल मधे झाले. कांची कामकोटीचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांचेकडून स्वामींनी अनुग्रह घेतला. तसेच स्वामी सत्यमित्रानंद महाराज यांच्याकडून संन्यास दिक्षा घेतली.भागवत, रामायण, महाभारत, श्रीमदभगवद्गीता आणि अन्य धर्मग्रंथांचे देश विदेशात प्रबोधन करून संपूर्ण आयुष्य राष्ट्रधर्म आणि अध्यात्मासाठी समर्पित केले आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले यांचे विद्यार्थी व प्रज्ञाचक्षु प. पू. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे ते सहयोगी आहेत.त्यांच्या धार्मिक कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.
त्यांच्या नियुक्तीने बेलापूरला थेट देशपातळीवर सन्मान मिळाला आहे. ही बातमी समजताच जिल्ह्यात ठिकठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला.त्याप्रीत्यर्थ पेठेतील बालाजी मंदिरापुढे फटाके वाजविण्यात आले.या वेळी पंडीत महेश व्यास रणजीत श्रीगोड दिलीप दायमा दिलीप काळे रमेश बैरागी रवि कोळपकर ओमप्रकाश व्यास आदिसह नागरीक उपस्थित होते