खंडाळा प्रतिनिधी -शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जवळपास 10-15 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. काल दि. 28 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे ही घटना घडली. या आगीचा गावातील चार शेतकर्यांना फटका बसला.सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंडाळा येथील शेतकरी अरविंद डेंगळे, अप्पासाहेब म्हसे, एस. शर्मा, परसराम डेंगळे यांच्या उसाला आग लागली. या आगीत शेतकर्यांचा 10 ते 15 एकर क्षेत्रातील ऊस खाक झाला.या घटनेची माहिती मिळताच गणेशनगर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी
दाखल झाला. मात्र वार्यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. त्यातच अग्निशमन बंबास शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता न मिळाल्यामुळे मदत कार्यात अडथळे आले. त्यामुळे आग आणखी वाढत राहिली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. यापुर्वी याच महिन्यात येथे आगीची घटना घडली होती. त्यावेळीही सुमारे 10-15 एकर उसाच्या क्षेत्राची हानी झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अशी घटना घडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment