बुलडाणा - 25 ऑगस्ट
महावितरणच्या वतीने ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळातील वीजबिले ही अत्यंत वाढीव आणि चुकीच्या रिडींगद्वारे देण्यात आली आहेत. नेहमीपेक्षा तीप्पट तर काहींना पाचपट रकमेची बिले आल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. याबाबत सर्वसामान्यांच्या वाढत्या तक्रारी पाहता चुकीची वीजबिले माफ करावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी लाऊन धरली आहे. यासाठी त्यांनी आंदोलनेही केले मात्र त्याउपरही कोणतीच दखल न घेतल्याने त्यांनी आक्रमक होत २४ ऑगस्टच्या सायंकाळी बुलडाणा अधीक्षक अभियंता देव्हाते यांचे कक्ष गाठले, त्यांनी चुकीची उत्तरे दिल्याने तुपकरांनी कार्यालयातच ठिय्या मांडला व तब्बल चार तास ठिय्या मांडल्यानंतर रविकांत तुपकर अधिक आक्रमक झाल्याचे पाहून अधीक्षक अभियंता यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीत आलेली संपूर्ण चुकीची वीजबिले माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. तुपकरांच्या या आंदोलनामुळे हजारो सर्वसामान्य विद्युत ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चुकीच्या वीजबिले आणि महावितरणाचा सावळा गोंधळ याबाबत माहिती देण्यासाठी रविकांत तुपकर यांनी आज 25 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील पत्रकार भवन मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.या वेळी तुपकरांनी मीटर रीडिंग, विज बिल वाटप करणाऱ्या विविध एजन्सी व महावितरणच्या अधिकाऱ्यां मध्ये साटेलोटे असल्याचा आरोप ही करत या पुढे जर विज कनेक्शन कट करायला एमएसईबीचा कोणी अधिकारी आला तर त्याला कपडे काढून नागडा फटके देऊ,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्य मंत्री रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
Post a Comment