अहमदनगर (प्रतिनिधी) नगरमधील उद्योजक करीमभाई हुंडेकरी (अब्दुल करीम सय्यद) (वय 70) यांच्या अपहरण प्रकरणातील दोघांना मंगळवारी (दि. 19) पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परतूर (जि. जालना) येथून अटक केली होती. दोघांपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याने बुधवारी (दि. 20) त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. तर दुसर्या आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.नगरमधील गुन्हेगार अजहर शेख याच्या सांगणावरून हा गुन्हा केल्याची कबुली या अटक केलेल्या दोघांनी दिली होती. अजहरला 25 लाखांची आवश्यकता होती म्हणून त्याने अन्य साथीदाराच्या मदतीने हुंडेकरी यांचे अपहरण केले होते. अटक केलेल्या आरोपींकडे पोलीस चौकशी करीत असताना एकाची शैक्षणिक कागदपत्रे बघितल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. या मुलाला सज्ञान होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी बाकी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. तो परतूरमध्ये बारावीचे शिक्षण घेत आहे. या मुलाचे वडील सरकारी नोकरीला असल्याचे समजले.परतूरमध्ये एका जीममध्ये हा मुलगा व्यायामासाठी जात होता. त्या ठिकाणी व्यायामासाठी आलेल्या अजहर शेख याच्याशी त्याची ओळख झाली. त्यातून पुण्याला फिरण्यासाठी जात असल्याचे सांगून नगरला आणले व उद्योजकाचे अपहरण करण्यात सहभागी केल्याचे हा मुलगा पोलिसांना सांगत आहे. तर अटक केलेला दुसरा आरोपी निहाल ऊर्फ बाबा मुशरफ शेख (वय- 20, रा. परतूर, जि. जालना) याला बुधवारी (दि. 20) मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एस. चांदगुडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून त्यांचा शोध घ्यायचा आहे. गुन्हा कशा पद्धतीने केला, याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती तपासी अधिकारी रवींद्र पिंगळे यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने निहाल शेख याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Post a Comment