Latest Post

चेक रिपब्लिक/२० जुलै/गौरव डेंगळे:भारतीय टेनिसपटू रुतुजा भोसले हिने चीनची झेंग वुशुआंग हिच्यासोबत भागीदारी करत ITS Cup 2025 या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत त्यांनी जबरदस्त खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय नोंदवला.

हा सामना तितकाच उत्कंठावर्धक ठरला. दोघींनी अप्रतिम समन्वय आणि आक्रमक खेळ दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली. रुतुजाची शांत आणि आत्मविश्वासपूर्ण शैली झेंगच्या जलद आणि अचूक खेळीला उत्तम साथ देत होती. त्यांच्या रॅलीज आणि विनर्सनी सामना रंगतदार केला.

या विजयानंतर रुतुजा भोसलेने आपल्या कारकिर्दीत आणखी एक आंतरराष्ट्रीय यशाची भर घातली आहे. ITF स्तरावरील तिचे हे आणखी एक विजेतेपद असून जागतिक स्तरावर तिच्या नावाचा झंकार अधिकच वाढला आहे.रुतुजाच्या या विजयामुळे भारताच्या टेनिस विश्वात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत असून देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नाखोन पथोम (थायलंड) | गौरव डेंगळे भारताने एशियन अंडर-१६ पुरुष व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पदार्पणातच इतिहास रचला आहे. शनिवारी झालेल्या थरारक सामन्यात भारताने जपानचा ३-२ असा पराभव करत कांस्यपदक पटकावले. या विजयानंतर भारतासह पाकिस्तान, जपान आणि इराण हे चारही उपांत्य फेरी गाठलेले संघ २०२६ मध्ये कतारमध्ये होणाऱ्या एफआयव्हीबी बॉईज अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरले आहेत.कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने २५-२१, १२-२५, २५-२३, १८-२५, १५-१० अशा सेट्समध्ये विजय मिळवला. या सामन्यात अब्दुल्ला (१६ गुण), अप्रतीम (१५), रफिक (१२) आणि चरन (४) यांनी भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.याआधी उपांत्य फेरीत भारताचा पाकिस्तानकडून सरळ सेट्समध्ये पराभव झाला होता. मात्र, जपानविरुद्धच्या विजयाने भारताने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान निश्चित केले.

स्पर्धेतील आपल्या गटात भारताने थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि चीन या तिन्ही संघांवर सरळ सेट्समध्ये विजय मिळवून ९ गुणांची कमाई केली होती. त्यानंतर क्रॉसओव्हर फेरीत उझबेकिस्तानवर मात करत भारताने उपांत्य फेरी गाठली. गटपातळीवर जपानकडून झालेल्या पराभवाचा बदलाही भारताने कांस्यपदक सामन्यात घेतला.२०२६ मध्ये कतारमध्ये होणाऱ्या FIVB अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची उपस्थिती निश्चित झाली असून, ही कामगिरी भविष्यातील जागतिक स्तरावरच्या संधींसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पणजी ( गौरव डेंगळे) – गोवा राज्य क्रीडा आणि युवक व्यवहार संचालनालयाचे (DSYA) नवे संचालक डॉ. अजय गावडे यांनी १७ जुलै २०२५ रोजी पदभार स्वीकारताच तात्काळ कृतीला सुरुवात केली. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी गोव्यातील सर्व १२ तालुक्यांतील तालुका क्रीडा अधिकारी (TSO) व सहायक क्रीडा शिक्षण अधिकारी (APEO) यांच्यासोबत बैठक घेऊन, त्यांच्या समोरील अडचणी आणि स्थानिक पातळीवरील क्रीडा उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.राज्यातील क्रीडा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना सक्षम करण्यासाठी एक व्यापक योजना आखण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. खेळांना गावपातळीपासून गती मिळावी, ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी आणि गोव्यातील सुप्त क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हे या चर्चेचे मुख्य सूत्र

राहिले.या दिवसातच डॉ. गावडे यांनी खेळो इंडिया अधिकारी, क्रीडा प्राधिकरण गोवा (SAG) व विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशीही बैठक घेतली. त्यांनी क्रीडा क्षेत्रात सुसंगत समन्वय ठेवत नव्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले. DSYA, SAG आणि गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट कौन्सिल (GFDC) यांच्यात समन्वय साधत गोव्यातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“गोव्यातील खेळाडूंमध्ये अफाट कौशल्य आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि आधार दिल्यास ते राज्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवतील. गोवा हा देशातील महत्त्वाचा क्रीडा केंद्र बनावा, हीच आमची दिशा व ध्येय आहे,” असे डॉ. गावडे यांनी पदभार स्वीकारताना सांगितले.त्यांच्या या सकारात्मक आणि कृतीशील सुरुवातीमुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व स्तरावर नव्या आशा निर्माण झाल्या असून,गोव्यातील क्रीडा व्यवस्थापनात ठोस बदल होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

कोपरगाव (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने २६ जुलै २०२५ रोजी पहिली ‘शारदा एक्सप्रेस खो-खो लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लावण्यासाठी व कौशल्य वाढवण्यासाठी ही स्पर्धा एक आगळीवेगळी संधी ठरणार आहे.या विशेष लीगमध्ये जिल्ह्यातील १२ संघांना सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक संघात ६ मुले व ३ मुली असा समावेश असणार असून, ही स्पर्धा इयत्ता ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. लिंगसमता आणि सांघिक एकता यावर आधारित ही अभिनव संकल्पना शारदा स्कूलने राबवली आहे.स्पर्धा साखळी पद्धतीने (League Format) खेळवण्यात येईल.

प्रत्येक सामन्यानंतर एक उत्कृष्ट खेळाडू ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात येईल.

हा पुरस्कार कै. महेंद्र अशोकराव नगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणार आहे.या लीगमध्ये अंतिम विजेत्या संघाला ₹२१००/- रोख रक्कम आणि भव्य चषक देण्यात येणार असून,हा पुरस्कार श्री संकेत दिलीपराव पारखे यांच्याकडून दिला जाणार आहे.संघ नोंदणीसाठी इच्छुकांनी खो-खो प्रशिक्षक श्री गणेश वाघ व श्री गणेश मोरे यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य के. एल. वाकचौरे करत असून, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डॉ. धनंजय देवकर यांच्या अधिपत्याखाली या भव्य लीगचे आयोजन करण्यात येत आहे.ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच सामूहिकतेचे मूल्य, स्पर्धात्मकता,आणि स्वतंत्रता यांचा अनुभव देणारी ठरणार आहे.

गौरव डेंगळे श्रीरामपूर :–सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल,कोपरगाव येथे पारंपरिक भारतीय कुस्ती या विषयावर एक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले.मल्ल महाविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश महागुडे यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रभावी शैलीतील मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये कुस्ती या खेळाबाबत नवीन जाणीव निर्माण झाली.

गणेश महागुडे यांनी कुस्तीचा इतिहास मांडताना सांगितले की, हा खेळ केवळ स्पर्धा नसून भारतीय परंपरेचा अभिन्न भाग आहे. रामायण आणि महाभारतातून कुस्तीची सुरुवात झाल्याचे दाखले देत त्यांनी हा खेळ किती पुरातन आणि समृद्ध आहे, हे पटवून दिले. कुस्ती ही फक्त ताकदीची लढाई नसून ती संयम, शिस्त आणि मनोबल यांची परीक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी आपल्या व्याख्यानात १९५२ मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून घडलेल्या खाशाबा जाधव यांचे उदाहरण देत, विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. भारताचे पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवणारे खाशाबा जाधव यांना त्यावेळी आर्थिक अडचणींवर मात करून ऑलिम्पिकमध्ये भाग घेता यावा म्हणून त्यांच्याच कॉलेजमधील प्राचार्यांनी स्वतःचा बंगला गहाण ठेवून मदत केली होती,ही हृदयस्पर्शी गोष्ट त्यांनी सांगितली.

गणेश महागुडे यांनी आधुनिक कुस्तीचे प्रकार समजावून सांगत कुस्तीमुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, कुस्तीमुळे अनेक युवकांना पोलीस, रेल्वे, सैन्य आणि विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळाल्या आहेत. या खेळातून केवळ यश नाही तर एक सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध जीवनशैली मिळते.

आज जरी हरियाणाचे मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये आघाडीवर असले, तरी भारतासाठी पहिले पदक महाराष्ट्रातील मातीतूनच आले, याची आठवण करून देत त्यांनी महाराष्ट्रातील युवकांनीही या खेळाकडे पुन्हा गंभीरतेने पाहावे असे आवाहन केले.

श्री शारदा स्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.उपस्थित विद्यार्थ्यांनी महागुडे सरांच्या व्याख्यानात रस घेतला आणि विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरं दिली.कार्यक्रमाच्या शेवटी सरांनी सांगितले की, कुस्ती म्हणजे केवळ मैदानात लढायचे कौशल्य नव्हे, ती संपूर्ण जीवनात संघर्षातून विजय मिळवण्याची शिकवण आहे. "कुस्ती ही एक संस्कारक्षम जीवनशैली आहे" या शब्दांत त्यांनी आपले व्याख्यान संपवले आणि विद्यार्थ्यांमध्ये नवा जोश निर्माण केला.

बेलापूरमध्ये एका अनैतिक संबंधांच्या कथित प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने शांत झाल्याचे वृत्त आहे. मात्र, हे प्रकरण मिटवण्यासाठी पत्रकार आणि गावातील लोकांना पैसे देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्याने परिसरात नवे कुजबुज सुरू झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बेलापूरमध्ये एका अनैतिक संबंधाच्या प्रकरणामुळे समाजात अशांतता निर्माण झाली होती. परिस्थिती चिघळण्यापूर्वीच, बेलापूरमधील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रकरण शांततेत मिटल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे परिसरातील तणाव काही प्रमाणात निवळला आहे.

परंतु, या शांततेमागे आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. परिसरातील काही नागरिकांच्या मते, हे प्रकरण दडपण्यासाठी आणि कोणतीही बातमी प्रसिद्ध होऊ नये यासाठी, पत्रकार आणि गावातील काही प्रमुख व्यक्तींना पैसे देण्यात आले आहेत. "प्रकरण मिटवण्यासाठी पैसे दिले गेल्याची चर्चा आहे," असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका स्थानिक नागरिकाने सांगितले. ही चर्चा आता बेलापूरमधील अनेकांच्या तोंडी आहे.

या कथित आर्थिक देवाणघेवाणीमुळे या प्रकरणाच्या शांततापूर्ण निराकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली जात आहे. बेलापूरमधील शांतता खरंच स्थापित झाली आहे की, पैशांच्या जोरावर ती केवळ विकत घेतली गेली आहे, हा प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करून आहे.

या प्रकरणावर अजूनतरी कोणत्याही अधिकृत व्यक्तीने किंवा संबंधित पक्षांनी सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही. स्थानिक प्रशासनाने या आरोपांची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज कबड्डी दिनाच्या निमित्ताने एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. कबड्डी क्षेत्रातील महान कार्यासाठी ओळखले जाणारे स्वर्गीय शंकरराव साळवी यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्रभर कबड्डी दिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतीला वंदन करत शाळेने विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द, प्रयत्नशीलता आणि स्वप्नांवर विश्वास निर्माण करणारा उपक्रम आयोजित केला होता.

या विशेष दिवशी विद्यार्थ्यांना एका थेट हिरोची भेट मिळाली –


भारताचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असलम इनामदार. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अनुभवाची ठाम बाजू घेऊन ते विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले, आणि सुरू झाला त्यांचा प्रवास उलगडण्याचा प्रवास. त्यांनी आपल्या लहानपणीच्या अडचणी, घरची हलाखीची परिस्थिती, कबड्डीची पहिली ओळख, मोठ्या भावाची साथ, स्थानिक मैदानांवरचा संघर्ष, आणि अखेर भारतीय संघात स्थान मिळवण्यापर्यंतचा प्रवास ओघवत्या शब्दांत मांडला.

सभागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या प्रत्येक आठवणीला मनापासून प्रतिसाद दिला. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल, प्रेरणा आणि आत्मविश्वास यांचा मिलाफ स्पष्ट दिसत होता. असलम इनामदार केवळ यशाची गोष्ट सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी अपयश, अपमान, दुखापती आणि मानसिक तणाव या सगळ्यांनाही समोर ठेवत यशामागील वास्तव स्पष्ट केलं. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली – परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आत्मविश्वास, कुटुंबाची साथ आणि जिद्द असल्यास यश नक्की मिळते.

या कार्यक्रमाच्या विशेषतेपैकी एक म्हणजे शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे यांची समुपदेशनपर उपस्थिती. विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी असलम इनामदार यांना आमंत्रित करण्यामागील उद्देश त्यांनी आपल्या छोट्याशा भाषणात सांगितला. त्यांनी हे ही सांगितले की,अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरचं जीवन शिकता येतं – असं जीवन जे खऱ्या अनुभवांवर उभं आहे. त्यांनी असलम यांचे मनःपूर्वक कौतुक करत विद्यार्थ्यांना त्यांच्यासारखं कष्ट घेऊन जीवनात पुढे जाण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे संयोजन अतिशय उत्तमरीत्या पार पडले. पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, महेश मोरे,सुहास गगे, साईनाथ चाबुकस्वार,गणेश मलिक, दिग्विजय भोरे,क्रीडा शिक्षक,व्यवस्थापन समिती,इतर शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक आयोजन करत विद्यार्थ्यांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.संवादानंतर विद्यार्थ्यांनी असलम इनामदार यांच्यासोबत फोटो काढत, त्यांच्या सहवासात काही क्षण घालवत प्रेरणेचा एक थेट स्पर्श अनुभवला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget