Latest Post

पणजी ( गौरव डेंगळे) – गोवा राज्य क्रीडा आणि युवक व्यवहार संचालनालयाचे (DSYA) नवे संचालक डॉ. अजय गावडे यांनी १७ जुलै २०२५ रोजी पदभार स्वीकारताच तात्काळ कृतीला सुरुवात केली. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी गोव्यातील सर्व १२ तालुक्यांतील तालुका क्रीडा अधिकारी (TSO) व सहायक क्रीडा शिक्षण अधिकारी (APEO) यांच्यासोबत बैठक घेऊन, त्यांच्या समोरील अडचणी आणि स्थानिक पातळीवरील क्रीडा उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.राज्यातील क्रीडा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना सक्षम करण्यासाठी एक व्यापक योजना आखण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. खेळांना गावपातळीपासून गती मिळावी, ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी आणि गोव्यातील सुप्त क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हे या चर्चेचे मुख्य सूत्र

राहिले.या दिवसातच डॉ. गावडे यांनी खेळो इंडिया अधिकारी, क्रीडा प्राधिकरण गोवा (SAG) व विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशीही बैठक घेतली. त्यांनी क्रीडा क्षेत्रात सुसंगत समन्वय ठेवत नव्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले. DSYA, SAG आणि गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट कौन्सिल (GFDC) यांच्यात समन्वय साधत गोव्यातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“गोव्यातील खेळाडूंमध्ये अफाट कौशल्य आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि आधार दिल्यास ते राज्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवतील. गोवा हा देशातील महत्त्वाचा क्रीडा केंद्र बनावा, हीच आमची दिशा व ध्येय आहे,” असे डॉ. गावडे यांनी पदभार स्वीकारताना सांगितले.त्यांच्या या सकारात्मक आणि कृतीशील सुरुवातीमुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व स्तरावर नव्या आशा निर्माण झाल्या असून,गोव्यातील क्रीडा व्यवस्थापनात ठोस बदल होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

कोपरगाव (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने २६ जुलै २०२५ रोजी पहिली ‘शारदा एक्सप्रेस खो-खो लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लावण्यासाठी व कौशल्य वाढवण्यासाठी ही स्पर्धा एक आगळीवेगळी संधी ठरणार आहे.या विशेष लीगमध्ये जिल्ह्यातील १२ संघांना सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक संघात ६ मुले व ३ मुली असा समावेश असणार असून, ही स्पर्धा इयत्ता ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. लिंगसमता आणि सांघिक एकता यावर आधारित ही अभिनव संकल्पना शारदा स्कूलने राबवली आहे.स्पर्धा साखळी पद्धतीने (League Format) खेळवण्यात येईल.

प्रत्येक सामन्यानंतर एक उत्कृष्ट खेळाडू ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात येईल.

हा पुरस्कार कै. महेंद्र अशोकराव नगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणार आहे.या लीगमध्ये अंतिम विजेत्या संघाला ₹२१००/- रोख रक्कम आणि भव्य चषक देण्यात येणार असून,हा पुरस्कार श्री संकेत दिलीपराव पारखे यांच्याकडून दिला जाणार आहे.संघ नोंदणीसाठी इच्छुकांनी खो-खो प्रशिक्षक श्री गणेश वाघ व श्री गणेश मोरे यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य के. एल. वाकचौरे करत असून, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डॉ. धनंजय देवकर यांच्या अधिपत्याखाली या भव्य लीगचे आयोजन करण्यात येत आहे.ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच सामूहिकतेचे मूल्य, स्पर्धात्मकता,आणि स्वतंत्रता यांचा अनुभव देणारी ठरणार आहे.

गौरव डेंगळे श्रीरामपूर :–सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल,कोपरगाव येथे पारंपरिक भारतीय कुस्ती या विषयावर एक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले.मल्ल महाविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश महागुडे यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रभावी शैलीतील मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये कुस्ती या खेळाबाबत नवीन जाणीव निर्माण झाली.

गणेश महागुडे यांनी कुस्तीचा इतिहास मांडताना सांगितले की, हा खेळ केवळ स्पर्धा नसून भारतीय परंपरेचा अभिन्न भाग आहे. रामायण आणि महाभारतातून कुस्तीची सुरुवात झाल्याचे दाखले देत त्यांनी हा खेळ किती पुरातन आणि समृद्ध आहे, हे पटवून दिले. कुस्ती ही फक्त ताकदीची लढाई नसून ती संयम, शिस्त आणि मनोबल यांची परीक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी आपल्या व्याख्यानात १९५२ मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून घडलेल्या खाशाबा जाधव यांचे उदाहरण देत, विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. भारताचे पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवणारे खाशाबा जाधव यांना त्यावेळी आर्थिक अडचणींवर मात करून ऑलिम्पिकमध्ये भाग घेता यावा म्हणून त्यांच्याच कॉलेजमधील प्राचार्यांनी स्वतःचा बंगला गहाण ठेवून मदत केली होती,ही हृदयस्पर्शी गोष्ट त्यांनी सांगितली.

गणेश महागुडे यांनी आधुनिक कुस्तीचे प्रकार समजावून सांगत कुस्तीमुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, कुस्तीमुळे अनेक युवकांना पोलीस, रेल्वे, सैन्य आणि विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळाल्या आहेत. या खेळातून केवळ यश नाही तर एक सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध जीवनशैली मिळते.

आज जरी हरियाणाचे मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये आघाडीवर असले, तरी भारतासाठी पहिले पदक महाराष्ट्रातील मातीतूनच आले, याची आठवण करून देत त्यांनी महाराष्ट्रातील युवकांनीही या खेळाकडे पुन्हा गंभीरतेने पाहावे असे आवाहन केले.

श्री शारदा स्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.उपस्थित विद्यार्थ्यांनी महागुडे सरांच्या व्याख्यानात रस घेतला आणि विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरं दिली.कार्यक्रमाच्या शेवटी सरांनी सांगितले की, कुस्ती म्हणजे केवळ मैदानात लढायचे कौशल्य नव्हे, ती संपूर्ण जीवनात संघर्षातून विजय मिळवण्याची शिकवण आहे. "कुस्ती ही एक संस्कारक्षम जीवनशैली आहे" या शब्दांत त्यांनी आपले व्याख्यान संपवले आणि विद्यार्थ्यांमध्ये नवा जोश निर्माण केला.

बेलापूरमध्ये एका अनैतिक संबंधांच्या कथित प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने शांत झाल्याचे वृत्त आहे. मात्र, हे प्रकरण मिटवण्यासाठी पत्रकार आणि गावातील लोकांना पैसे देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्याने परिसरात नवे कुजबुज सुरू झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बेलापूरमध्ये एका अनैतिक संबंधाच्या प्रकरणामुळे समाजात अशांतता निर्माण झाली होती. परिस्थिती चिघळण्यापूर्वीच, बेलापूरमधील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रकरण शांततेत मिटल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे परिसरातील तणाव काही प्रमाणात निवळला आहे.

परंतु, या शांततेमागे आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. परिसरातील काही नागरिकांच्या मते, हे प्रकरण दडपण्यासाठी आणि कोणतीही बातमी प्रसिद्ध होऊ नये यासाठी, पत्रकार आणि गावातील काही प्रमुख व्यक्तींना पैसे देण्यात आले आहेत. "प्रकरण मिटवण्यासाठी पैसे दिले गेल्याची चर्चा आहे," असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका स्थानिक नागरिकाने सांगितले. ही चर्चा आता बेलापूरमधील अनेकांच्या तोंडी आहे.

या कथित आर्थिक देवाणघेवाणीमुळे या प्रकरणाच्या शांततापूर्ण निराकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली जात आहे. बेलापूरमधील शांतता खरंच स्थापित झाली आहे की, पैशांच्या जोरावर ती केवळ विकत घेतली गेली आहे, हा प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करून आहे.

या प्रकरणावर अजूनतरी कोणत्याही अधिकृत व्यक्तीने किंवा संबंधित पक्षांनी सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही. स्थानिक प्रशासनाने या आरोपांची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज कबड्डी दिनाच्या निमित्ताने एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. कबड्डी क्षेत्रातील महान कार्यासाठी ओळखले जाणारे स्वर्गीय शंकरराव साळवी यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्रभर कबड्डी दिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतीला वंदन करत शाळेने विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द, प्रयत्नशीलता आणि स्वप्नांवर विश्वास निर्माण करणारा उपक्रम आयोजित केला होता.

या विशेष दिवशी विद्यार्थ्यांना एका थेट हिरोची भेट मिळाली –


भारताचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असलम इनामदार. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अनुभवाची ठाम बाजू घेऊन ते विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले, आणि सुरू झाला त्यांचा प्रवास उलगडण्याचा प्रवास. त्यांनी आपल्या लहानपणीच्या अडचणी, घरची हलाखीची परिस्थिती, कबड्डीची पहिली ओळख, मोठ्या भावाची साथ, स्थानिक मैदानांवरचा संघर्ष, आणि अखेर भारतीय संघात स्थान मिळवण्यापर्यंतचा प्रवास ओघवत्या शब्दांत मांडला.

सभागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या प्रत्येक आठवणीला मनापासून प्रतिसाद दिला. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल, प्रेरणा आणि आत्मविश्वास यांचा मिलाफ स्पष्ट दिसत होता. असलम इनामदार केवळ यशाची गोष्ट सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी अपयश, अपमान, दुखापती आणि मानसिक तणाव या सगळ्यांनाही समोर ठेवत यशामागील वास्तव स्पष्ट केलं. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली – परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आत्मविश्वास, कुटुंबाची साथ आणि जिद्द असल्यास यश नक्की मिळते.

या कार्यक्रमाच्या विशेषतेपैकी एक म्हणजे शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे यांची समुपदेशनपर उपस्थिती. विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी असलम इनामदार यांना आमंत्रित करण्यामागील उद्देश त्यांनी आपल्या छोट्याशा भाषणात सांगितला. त्यांनी हे ही सांगितले की,अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरचं जीवन शिकता येतं – असं जीवन जे खऱ्या अनुभवांवर उभं आहे. त्यांनी असलम यांचे मनःपूर्वक कौतुक करत विद्यार्थ्यांना त्यांच्यासारखं कष्ट घेऊन जीवनात पुढे जाण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे संयोजन अतिशय उत्तमरीत्या पार पडले. पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, महेश मोरे,सुहास गगे, साईनाथ चाबुकस्वार,गणेश मलिक, दिग्विजय भोरे,क्रीडा शिक्षक,व्यवस्थापन समिती,इतर शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक आयोजन करत विद्यार्थ्यांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.संवादानंतर विद्यार्थ्यांनी असलम इनामदार यांच्यासोबत फोटो काढत, त्यांच्या सहवासात काही क्षण घालवत प्रेरणेचा एक थेट स्पर्श अनुभवला.

बेलापूर( प्रतिनिधी) कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा असफल प्रयत्न झाला चोरट्यांनी  गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.पण तो असफल झाला.               बेलापूर कोल्हार चौकात असलेले एटीएम यापूर्वी देखील फोडण्याचा प्रयत्न झाला होता . त्यावेळी ग्रामस्थांनी  पोलिसांना तातडीने खबर दिली पोलीसही सायरन वाजवी तातडीने घटनास्थळी दाखल झाले

सायरन चा आवाज ऐकताच पोलीस आल्याची चाहुल लागली आणखी चोरटे चार चाकी वाहनातून फराक्ष झाले. काल पुन्हा चोरट्यांनी त्याच एटीएमला लक्ष केले. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला परंतु एटीएम फुटले  नाही. त्यांनी एटीएम च्या  ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कागदी पट्ट्या लावल्या आणि नंतर फोडण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने त्यातील रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, शारदानगर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. सर्वधर्म प्रेम,सहिष्णुता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या दिंडीने परिसर भक्तीरसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.


"देव एकच आहे,त्याची नावे अनेक असू शकतात,पण मानवतेचा हात हाच श्रेष्ठ धर्म आहे,"असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. शाळेच्या बालगोपालांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजून टाळ,मृदंग, पखवाजाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत परिसर पंढरपूरमय केला.

या वेळी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे,शिक्षिका पल्लवी ससाणे, नैथलीन फर्नांडिस,तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय,संत परंपरा व विठ्ठलभक्ती याविषयी माहिती दिली.


शाळेच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरि विठ्ठल", "माऊली माऊली" अशा भक्तीगीतांच्या जयघोषात परिसरात भव्य दिंडी काढली.विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावर झळकणारा भक्तीभाव,टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांनी सादर केलेला उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले.

दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख, सामाजिक ऐक्य, प्रेम, सहिष्णुता आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget