Latest Post


अहमदनगर प्रतिनिधी- दिवसा घरफोडी करणा-या टोळीचा म्होरक्या पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून सुमारे ६ तोळे सोने व ९२० ग्रॅम वजनाची चांदी असे एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अविनाश दिलीप क्षेत्रे (रा भुषणनगर केडगाव अ.नगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि २० मे २०२२ रोजी सकाळी पहाटे ४.३० वा सुमारास मी आई वडिलांसह देवदर्शनकरीता राहते घरास कुलूप लावून जेजुरी येथे गेलो. या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून उचकापाचक करून गोदरेज कपाटातील सोन्या-चांदीचे ३ लाख ३ हजार १०० रुपये किंमतीचे दागीने स्वताःच्या आर्थिक फायद्याकरीता चोरुन नेले आहेत. या पुजा मनोज बडे (रा भुषननगर केडगाव अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं । ३९४/२०२२ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा पाळत ठेवून झालेला असून घराची माहीती देणारे आरोपी हे अहमदनगर येथील आहे. घरफोडी करणारे आरोपी हे पुणे येथून आलेले होते, अशी प्राथमिक माहीती मिळाल्यावरुन आरोपींचा शोध घेणे कामी गुन्हे शोध पथकाचे एक पथक पुणे येथे व दुसरे पथक कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत रवाना करुन आरोपींचा शोध घेत असतांना एकजण गुन्ह्यातील चोरीस गेलेला सोने चांदीचा मुद्देमाल विक्री करणे करीता एकजण गंजबाजार येथे येणार असल्याबाबत माहीती मिळाली. त्या ठिकाणी सापळा लावून एकजण संशयीतरित्या सोने व चांदी विक्री करणे कामी सराफ बाजारात फिरताना मिळून आला. त्यास कोतवाली पोलीस पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याला विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव अविनाश दिलीप क्षेत्रे (रा भूषणनगर केडगाव अ.नगर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिणे मिळून आले. दागिण्याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने व त्याचे साथीदार यांनी मिळून केडगाव भूषणनगर येथे घरफोडी केल्याचे कबुल केले. त्याला गुन्हा करते वेळी पुणे येथील आरोपी साथीदार होते असे त्याने सांगितले आहे. तसेच त्याच्या साथीदाराबाबत माहीती घेतली असून त्याचा कोतवाली पोलिस शोध घेत आहोत.

शिर्डी प्रतिनिधी-अश्लील व्हीडीओ तयार करून एका व्यक्तीकडून एक महिला व तिच्या साथीदाराने वेळोवेळी सुमारे 40 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली असून तिचा साथीदार पसार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित व्यक्ती व आरोपी संगमनेर तालुक्यातील आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण शिर्डीसह जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील महिलेने तिच्या साथीदारासह फिर्यादीची राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील एका हॉटेलात अश्लील व्हीडीओ क्लीप बनवली. या महिलेची व फिर्यादीची ओळख होती. त्या ओळखीने ही महिला आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे, असे सांगत वेगवेगळ्या कारणांसाठी वेळोवेळी हात उसने म्हणून पैसे मागायची. असे तिने लाखो रुपये घेतले. हे पैसे परत मागूनही ते दिले नाही. अचानक 7 मार्च 2022 रोजी या महिलेने फिर्यादीला फोन करून बाभळेश्वर येथील एका हॉटेलवर बोलावले.दुसर्‍या दिवशी 8 मार्च रोजी फिर्यादी हॉटेलवर गेला. रुममध्ये गेल्यावर या महिलेने पैसे मोजून घ्या, असे म्हणत दरवाजा लावून त्यानंतर काही वेळातच एक पुरूष रुममध्ये आला. त्याने या महिलेचे कपडे काढले व व्हीडीओ रेकॉर्डिंग करून माझे व या महिलेचे संबंध आहेत, असे वदवून घेतले व त्याचीही रेकॉर्डिंग केली. कुणाला काही सांगितले, तर जीवे ठार मारण्याची व व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर एमएच 17 बीव्ही 8886 या ब्रेझा गाडीत येऊन व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 9 लाख रुपये उकळले.संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील व्यक्तीने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला व तिचा साथीदार राजेंद्र गिरी यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांनी भा.दं.वि. कलम 384 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत.

नेवासा प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे दोन जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या वैजापूरच्या तरुणास नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 4 जून रोजी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना प्रवरासंगम बसस्टॅण्ड येथे एक मध्यम बांध्याचा तरुण देशी बनावटीचा कट्टा व काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.पोलीस निरीक्षक कटके यांनी विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, हवालदार दत्तात्रय गव्हाणे ,मनोज गोसावी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, दिपक शिंदे कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे व चालक हवालदार संभाजी कोतकर यांना सदर इसमावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे प्रवरासंमम येथे सापळा लावून सोन्या उर्फ संतोष पांडुरंग वंगाळ (वय 29) रा. रोटेगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद यास पकडले. त्याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व 400 रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 459/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत.


औरंगाबाद प्रतिनिधी - शिवप्रहार प्रतिष्ठान व शिव-शंभू भक्त परिवार, महाराष्ट्र यांच्या वतीने औरंगाबाद जिल्हयाचे नामकरण छ.संभाजीनगर व्हावे याकरिता बिगरराजकीय लोकचळवळ / मोहिम गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे. या मोहिमेत वेगवेगळ्या पक्षाचे व संघटनांचे अठरापगड जातीचे शिव-शंभू भक्त सामील झालेले आहे. ही मोहिम लोकशाही मार्गाने, कुठलीही हिंसा न करता, कुठलाही कायदा हातात न घेता, कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध वा समर्थन न करता सुरू आहे. 

        काल दि.०५/०६/२०२२ रोजी या मोहिमेच्या माध्यमातून “शंभू मेळावा - ०२” हा कार्यक्रम दहा ते पंधरा हजार मावळ्यांच्या उपस्थितीत संभाजीनगर शहरातील वीर सावरकर मैदान येथे अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात पार पडला. यावेळी उपस्थिती मावळ्यांना महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज व शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे म्हणाले की, शंभूराजांना मारणाऱ्या मारेकऱ्याचे नाव हटवावे आणि शंभू राजांचे नाव कायदेशीररित्या जिल्हयाला लागावे तसेच जोपर्यंत कायदेशीररित्या संभाजीनगर होत नाही तोपर्यंत हि संभाजीनगर नामकरण मोहिम वेगवेगळ्या लोकशाही मार्गांचा अवलंब करून चालू राहणार आहे. आमची मागणी आहे की, औरंगजेबासारखा कुर शासक ज्याने स्वतःच्या बापची, भावाची, मुलाची, पुतण्याची हत्या केली, तसेच देशाचे आराध्य दैवत शिवछत्रपतींचा आग्रा येथील दरबारात अपमान केला आणि शिवछत्रपतींचा छावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ४० दिवस प्रचंड हालहाल करून हत्या केली. त्या औरंगजेबचे नाव हटणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या औरंगजेबला अन्याय, अत्याचार, अनैतिकता, कुरता, विश्वासघात, गुलामगिरी यांचे प्रतिक मानले गेले त्या औरंगजेबचे नाव हटवून तेथे न्याय, नैतिकता, स्वराज्य, स्वातंत्र, शौर्य, धैर्य, पराक्रम यांचा संगम असलेल्या आपल्या शंभूराजांचे नाव लावावे याकरिता आम्ही लोकशाही मार्गाने लोकचळवळ उभारून ही मोहिम राबवत आहोत. आम्ही राष्ट्रभक्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव हटवण्यासाठी मोहिम काढलेली नसून शंभूराजांचा मारेकरी असलेला औरंगजेबचे नाव हटवण्यासाठी हि मोहिम आहे. 

      या शंभू मेळावा - ०२ कार्यक्रमाला सर्व अठरापगड जातीचे तळमळीचे मावळे स्वतःच्या खर्चाने वाहने करून आले व उपस्थित राहीले. संभाजीनगर, नगर, जालना, जळगाव, सांगली, नाशिक भागातून हजारो मावळे येथे आले होते. भर पावसात हा कार्यक्रम पार पडला. परंतु एकही मावळा जागेवरून हटला नाही आणि उठला पण नाही.

       याच मोहिमेच्या माध्यमातून दि. ०९/०४/२०२२ रोजी आम्ही शंभू मेळावा - ०१ हा कार्यक्रम वैजापूर शहरात घेतला. तसेच नंतरच्या काळात या मोहिमेत जय बाबाजी भक्त परिवार, शांतीगिरीजी महाराज धर्मयोदधा संघ-प्रमुख नागेश्वरजी महाराज ,समस्त शिवभक्त मित्र परिवार या संघटना देखील सामील झाल्या असुन महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी ज्यामध्ये राष्ट्रीय वारकरी परिषद, हिंदू राष्ट्र सेना, हिंदवी जनक्रांती सेना, हिंदूत्व सिंहनाद, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,हिंदू साम्राज्य महासंघ, छावा ,रोड मराठा उत्थान संघटना पानिपत-हरयाणा, धर्माचार्य मेटे महाराज इत्यादी संघटनांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

        तरी शंभूराजांच्या मारेकऱ्याचे "औरंगाबाद" हे नाव काढून शंभूराजांचे छत्रपती संभाजी महाराजनगर असे जिल्हयाचे नाव कायदेशीररित्या करावे व येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात संभाजीनगर नामकरण चा ठराव मंजूर करावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर धरणे आंदोलन करून मागणी पूर्ण करण्यासाठी लढा चालू राहील.


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-श्री  गुरु माऊली सेवा भावी संस्था या वृध्दाश्रमातील वृध्दांना रेशनकार्ड नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते ही बाब श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने कागदपत्रांची पुर्तता करुन वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांच्याकडे रेशनकार्ड सुपुर्त केले अन आजी आजोबांच्या आनंद गगनात मावेनासा झाला.                          श्रीरामपुरातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघुंडे व त्यांच्या पत्नी सौ कल्पना वाघुंडे या श्रीरामपुर येथील काळाराम मंदिराच्या पाठीमागे गेली पाच

वर्षापासून श्री गुरु माऊली सेवाभावी संस्था या नावाने वृध्दाश्रम चालवितात आज या वृध्दाश्रमात २० वयोवृध्द आजी आजोबा तसेच दोन सेवेकरी आहेत वाघुंडे परिवार लोक सहभागातून हा वृध्दाश्रम चालवितात या वृध्दाश्रमातील आजी आजोबांना रेशनकार्ड नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता आजी आजोबांचे दवाखान्याचे काम असल्यास रेशनकार्ड नसल्यामुळे मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता ही बाब वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे  जिल्हाध्यक्ष देविदास देसाई भाऊसाहेब वाघमारे यांना सांगीतली त्यांनी तातडीने श्रीरामपुरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या कानावर ही बाब घातली त्यांनी पुरवठा विभागातील चारुशिला मगरे वंदना नेटके पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी यांना कागदपत्रांची पूर्तता करुन रेशनकार्ड देण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांना तहसीलदार प्रशांत पाटील याचे हस्ते रेशनकार्ड देण्यात आले तहसीलदार पाटील यांनी दिलेल्या रेशनकार्डमुळे वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांनी धन्यवाद दिले असुन या रेशनकार्डमुळे वृध्दाश्रमातील आजी आजोबांना मोफत सोयी सवलतीचा तसेच आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांनी सांगीतले

श्रीरामपूर प्रतिनिधी-शहरातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या सर्कल कामावर किरकोळ खर्चातून 10 लाखांचे काम करून त्याच कामासाठी पुन्हा 17 लाखांचे टेंडर मागवून 10 ते 12 लाखांचे काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. अशा कामात बेजबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांविरुध्द कारवाई करण्याबाबत मुख्याधिकार्‍यांनी दिलेला शब्द पाळला नाही.याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक संजय छल्लारे व मिराताई रोटे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल पालिकेत मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. उपजिल्हाधिकारी गणेश शिंदे यांनी चौकशी समिती नेमून दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या काळात अटलबिहारी वाजपेयी सर्कल करण्यासाठी 17 लाख 06 हजार 146 रुपये खर्चाचे टेंडर मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या सहीने काढण्यात आले. त्या कामास संजय छल्लारे व मिराताई रोटे यांनी हरकत घेतली, कारण श्रीरामपूर परिषदेमधील भुखंडावर 23 जून 2020 रोजी सर्वसाधारण सभेमध्ये किरकोळ काम सुचविले व ते सभेत मंजुर करून घेतले. दि. 4 सप्टेंबर 2020 रोजी काम करण्याचे सांगून सदरचे काम तात्काळ चालु करावे, असा आदेश दिला. तद्नंतर तेथेच अटलबिहारी वाजपेयी सर्कल या नावाने त्याच कामाचे परत ऑनलाईन टेंडर मागिवले. सदर ठेकेदाराकडून जवळपास 10 लाख रुपयांची किरकोळ कामे करून घेतली. ती कामे पूर्ण झाली. अभियंता यांच्या सुचनेनुसार मे. व्यंकटेश कन्सट्रक्शन्स, श्रीरामपूर, के. जी. पाटुले, सावेडी, मे. प्रशांत गोलार, कुकाणा या तीन एजन्सीला दि. 09 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्या स्वखर्चाने दाखले दिले. पण त्याआधी त्या जागेवर सदरचे कामे झालेली होती. सदर कामे जवळपास 10 ते 12 लाखांचे काम पूर्ण झाले होते, पण 6 महिन्यानंतर त्याच कामाचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या सहीने टेंडर काढून जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली असा आरोप श्री. छल्लारे व मिराताई रोटे यांनी केला.तेथील नगरपालिकेच्या प्रापर्टी, वस्तूची चोरी होत आहे हे निर्दशनास आणून देत त्या लोकांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करुन कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. सदरील कामाची निविदा रद्द करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात जबाबदार अधिकार्‍याचा खुलासा मागवण्यात आला असुन खुलासा प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच याप्रकरणी चौकशी समिती नेमून 15 दिवसांत चौकशी पूर्ण करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे.चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. अटलबिहारी वाजपेयी यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्याकामी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदर विषय सादर करण्यात येईल व सभेच्या आदेशानुसार व निर्णयानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, त्यामुळे आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू नये, असे लेखी पत्र मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिल्याने माजी नगरसेवक संजय छल्लारे व माजी नगरसेविका मिरा रितेश रोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणारे उपोषण स्थगित करून 15 दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असे स्पष्ट केले होते.लेखी आश्वासनानंतर 25 दिवसांत आजपर्यंत त्या अधिकार्‍यावर काहीच कारवाई झालेली नाही तसेच समितीही नेमली नाही. तसेच समिती नेमून त्यावर कारवाई झाली नाही म्हणून मुख्याधिकार्‍यांच्या दालनात बैठा सत्याग्रह आंदोलन सुरु केले.अखेर या अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी दोन अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा चौकशी अहवाल येताच कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन उपजिल्हाधिकारी गणेश शिंदे यांनी दिले. या चौकशीसाठी नेवासा येथील नगरपंचायतचे स्थापत्य अभियंता प्रवीण कदम व नेवासा नगरपंचायत लेखापाल भाऊसाहेब म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली. धनंजय कविटकर उपमुख्य अधिकारी यांनी लेखी आश्वासनाचे पत्र संजय छल्लारे व सर्व सहकार्‍यांना दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.या ठिय्या आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे महासचिव हेमंत ओगले, राजु आदिक, रितेश रोटे, संजय साळवे, राहुल मुथ्था, राजु भांबारे, बोरावके, राजु सोनवणे, भगवान उपाध्ये, अण्णासाहेब डावखर, सुभाष तोरणे, मुन्ना पठाण, श्रीनिवास बिहाणी, पप्पू कुर्‍हे, अशोक उपाध्ये, प्रवीण नवले, नितिन पिपाडा, पुंडलिक खरे, निलेश भालेराव, सुनिल जगताप, शरद गवारे, सुरेश ठुबे, राजु डुक्करे, के. सी. शेळके, फिरोज शेख, देवेन पिडीयार आदी सहभागी झाले होते.

अहमदनगर प्रतिनिधी - जिल्ह्यातील आपेगाव (ता.कोपरगाव) येथील वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खून करुन जबरी चोरी करणारे तीन सराईत आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगांव तालुका पोलीसांना संयुक्त पथकाला यश आले आहे. अजय छंदु काळे (वय १९, रा. पढेगांव, ता. कोपरगांव), अमित कागद चव्हाण (वय २०, रा. हिंगणी हल्ली रा. पढेगांव, ता. कोपरगांव), जंतेश छंदु काळे ( वय २२ रा. पढेगाव ता. कोपरगाव) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.याबाबत समजलेले माहिती अशी की, नोकरी निमित्ता कुटूबिंयासह पुणे येथे राहतात. दि. ३० मे २२ ते दि.१ जून २२ रोजीचे दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी रात्रीचे वेळी घराचे छतावर प्रवेश करुन झोपेत असलेली आई राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय ६५) व वडील दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय ७५) अशा दोघांची अज्ञात हत्याराने खून करुन, घरातील कपाटाची उचकापाचक करून १ लाख ९० हजार रु. किंचे सोन्याचे दागिने खुनासह जबरी चोरी करुन चोरुन नेले होते. या घटनेबाबत जालिंदर दत्तात्रय भुजाडे ( वय ४०, रा. आपेगांव, ता. कोपरगांव हल्ली रा. संतोषनगर (बाकी), ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९९७ /२०२२ भादविक ३०२, ३९७, ३९४ प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटना ठिकाणास भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले.त्याप्रमाणे पोनि श्री. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तीन विशेष पथके नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगांव तालुका पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे संयुक्त पथक तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीची माहिती प्राप्त करुन शोध घेत असतांना पथकास माहिती मिळाली. गुन्हा हा अजय काळे (रा. पढेगांव, ता. कोपरगांव) याने त्याचे साथीदारासह केला असून तो त्याचे राहते घरी आहे, कोठेतरी पळुन जाण्याच्या तयारीत आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोलिस पथक तात्काळ पढेगांव येथे जाऊन आरोपी अजय काळे याचे वास्तव्याबाबत माहिती घेत असतांना एक इसम पोलीसांची चाहुल लागताच पळन जाऊ लागला पथकातील अंमलदार यांनी संशयीत इसमाचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अजय छंदु काळे (वय १९, रा. पढेगांव, ता. कोपरगांव) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी करता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, पोलिसांनी त्याला पोलिस खाक्या दाखविताच गुन्हा हा त्याचा साथीदार अमित कागद चव्हाण (वय २०, रा. हिंगणी हल्ली रा. पढेगांव, ता. कोपरगांव), जंतेश छंदु काळे (वय २२ रा. पढेगाव ता. कोपरगाव) अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली.माहिती नुसार आरोपी अमित चव्हाण व जंतेश काळे यांचा त्यांचे राहते घरी जावून शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात हजर केले. पुढील तपास कोपरगांव तालुका पोलीस करीत आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई सोपान गोरे, सफौ बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळुंके, सचिन आडवल, संदीप चव्हाण, दिपक शिंदे, पोकाॅ सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव, चापोहेकॉ बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे व चापोना भरत बुधवंत आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोनि दौलतराव जाधव, सपोनि सुरेश आव्हाड, पोहेकॉ ईरफान शेख आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget