बेलापुर ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. बेलापुर येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली तालुक्यातील निपाणी वडगाव व बेलापूर या दोन गावांचा सदर अभियानात समावेश आहे, पैकी बेलापूरगाव हे नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे हे अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिली.
गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्या गावांची लोकसंख्या जास्त आहे, प्रदूषणाची शक्यता जास्त आहे, अशा गावांची निवड या अभियानात करण्यात येत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावामधून अभियानास प्रारंभ झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांनुसार पर्यावरण रक्षणाच्या हेतूने सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, प्लास्टिक , घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन , देशी वृक्षारोपन आदिंसह हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. राज्यात या अभियानाअंतर्गत पंचतत्त्वानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र शासनाकडून गौरव करण्यात येणार आहे. अशी माहितीही गटविकास अधिकारी आभाळे यांनी दिली. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून अंगणात एकतरी देशी झाड लावावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी आपल्या भाषणातून केले. सरपंच महेंद्र साळवी यांनीही पर्यावरण संवर्धनासंदर्भात आपले मत प्रकट केले.
यावेळी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. उपमुख्याध्यापिका श्रीमती विजया दहिवाळ यांनी शपथ वाचन केले. याप्रसंगी जिप सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,पंचायत समिती गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे,जलील जनाब, रमेश अमोलिक, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे पत्रकार सुहास शेलार, कासम शेख यांचेसह जिल्हा परिषद मराठी, उर्दू मुला-मुलिंच्या शाळेचे शिक्षक उपस्थित होते.