मिळालेल्या माहितीनुसार, गट नंबर 60 परिसरातील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू असताना अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईदरम्यान शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा जुना रस्ता काढून टाकण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. हा रस्ता लहानपणापासून तसेच त्यांच्या आजोबांच्या काळापासून वापरात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी शेतकऱ्यांनी जनसेवा कार्यालयात तक्रार केल्यानंतर 17 जानेवारी 2026 रोजी जलसंधारण अधिकारी, सर्कल अधिकारी, तलाठी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. त्यावेळी लवकरच रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान गट नंबर 61, 62, 65, 66, 67, 68, 69, 70 व 71 या शेतकऱ्यांसाठी ओढ्यातील रस्त्याचा काही भाग कायम ठेवण्यात आला असून गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता मात्र अर्धवट काढून टाकण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
सध्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना शेजारील शेतातील मका पिकातून जावे लागत आहे. दूध काढण्यासाठी पहाटे व रात्रीही त्याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे जीवितास धोका असल्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर गणेश रमेश काळवाघे, शुभम दत्तात्रेय आहेर आणि निखिल अनिल आहेर यांनी 7 मार्च 2026 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता उपलब्ध करून दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


Post a Comment