श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील गोंधवणी रोडवरील दशमेश चौकामध्ये दररोज भरणारा रस्त्यावरील भाजीपाला बाजार हा मोठ्या अपघातास निमंत्रण ठरण्याची शक्यता असल्याने सदर बाजार दुसरीकडे हलविण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे . गेल्या काही दिवसापासून दशमेश चौकामध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व दुकानदारांनी आपली दुकाने थाटण्यात सुरुवात केली आहे . सुरुवातीला एक दोन असणारी दुकाने आता मोठ्या संख्येने वाढली असून चौकाच्या चार ही बाजूला सदर दुकानदार भररस्त्यावर बसतात .या संपूर्ण परिसरामध्ये भाजीमंडई नसल्याने व कोरोनामुळे नगरपालिकेने देखील येथे भाजी विकण्यास परवानगी दिली आहे . मात्र आता ही परवानगी जनतेसाठी डोकेदुखी ठरली आहे . राज्य मार्ग असलेला हा रस्ता वैजापूर, कोपरगाव, पुणतांबा,
खैरी निमगाव, गोंधवणी इत्यादी भागात जातो . त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहतूक असते .या चौकातील चारही दिशांना वाहनांची वर्दळ सतत सुरू असते . कॉलेज रोड, प्रांत व तहसील कार्यालय तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेत या चौकातून जावे लागते .पंजाबी कॉलनीतून येणारी वाहने तसेच काजी बाबा रोड वरून येणारी वाहने यांची देखील येथे सतत वर्दळ असते .भाजीपाला विकणारे दुकानदार रस्त्याच्या एकदम कडेला खूप पुढे येऊन बसतात . त्यामुळे चौकांमध्ये वळणाऱ्या गाड्यांसाठी सुद्धा मोठी अडचण निर्माण होत आहे . त्यातच भर म्हणून चौकामध्ये नगरपालिकेच्या बोरचे पाणी भरण्यासाठी सातत्याने पाण्याच्या गाड्या उभ्या असतात . त्यामुळे येथे पाण्यामुळे सतत रस्ता ओला असतो . या भागातील दुकानदार, बँकांचे एटीएममध्ये येणाऱ्या ग्राहकांना भाजी बाजारातील लोकांचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील ही दुकाने वेळीच दखल न घेतल्यास मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारी ठरू शकतात. तरी येथील भाजीबाजार हा मागच्या बाजूला खालच्या काजी बाबा रोडवर हलविल्यास लोकांची सोय होईल आणि अपघाताचा धोका टळेल. तरी याबाबत नगरपालिकेने तातडीने दखल घेण्याची मागणी या परिसरातील दुकानदारांनी केली आहे .

Post a Comment