अहमदनगर प्रतिनिधी -वर्षांनुवर्ष फरार, पाहिजे, शिक्षा झालेल्या व स्टॅण्डींग वॉरंटमधील 1163 आरोपींवर जिल्हा पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याची स्थिती पाहून काहींना अटक करण्यात आली तर काही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्र परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.उच्च न्यायालयात शिक्षा झालेले, फरार, पाहिजे व स्टॅण्डींग वॉरंट असलेले चार हजार 682 आरोपी वर्षांनुवर्ष पोलिसांना चकवा देत फरार झाले होते. अशा आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक पाटील यांनी 1 जानेवारी, 2022 ते 6 मार्च, 2022 या दरम्यान विशेष मोहिम राबविली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह तालुकास्तरावरील सर्व पोलिसांंना तशा सुचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक कटके या मोहिमेवर लक्ष ठेऊन होते. फरार असलेल्या 45 आरोपींपैकी 16 आरोपींना, पाहिजे असलेल्या चार हजार 444 आरोपींपैकी एक हजार 86 आरोपींना, स्टॅडिंग वॉरंंटमधील 180 पैकी 59 आरोपींना आणि उच्च न्यायालयात शिक्षा झालेल्या 13 आरोपींपैकी दोन अशा 1163 आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 798 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 35 आरोपी यापूर्वीच अटक केले असल्याचे पोलिसांनी काढलेल्या माहितीतून समोर आले. तर 39 आरोपी मयत झाले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयामध्ये यापूर्वीच निकाली काढलेल्या खटल्यातील आरोपींची संख्या 291 ऐवढी असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.सदरची मोहिम अधीक्षक पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कटके, सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचार्यांनी केली.गंभीर गुन्ह्यातील 790 गंभीर गुन्हे केल्यानंतर वर्षांनुवर्ष फरार झालेल्या आरोपींच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मोक्का, खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी व घरफोडी अशा गुन्ह्यात आरोपी असलेल्या 790 आरोपींना जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मोक्का 4, खुन 24, खुनाचा प्रयत्न 58, दरोडा 55, जबरी चोरी 106, घरफोडी 130 आरोपींचा समावेश आहे.
Post a Comment