नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव. मे महिना आणि अगदी जूनच्या सुरूवातीच्या काळात हे शहर कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून ओळखलं जात होतं. आज मालेगावात अत्यंत कमी संख्येने कोरोना पेशंट सापडत आहेत याचं श्रेय तिथं काम केलेल्या अनेकांना जातं. त्यातंलच एक नाव म्हणजे सुनील कडासने. ‘बस नाम ही काफी है’ ही त्यांची ओळख.
मालेगावातल्या कोरोना परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शासनाने लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची तिथं समन्वयक म्हणून नियुक्ती केली. कडासने यांचा दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्यांना भावेल अशा पद्धतीने थेट संवाद साधण्याचे कौशल्य हे त्यांचे विशेष. हे विशेषच त्यांना इथं कामी आले. आणि त्यातूनच शहराची परिस्थिती आता पूर्वपदावर येऊ लागली आहे.
मालेगाव मध्ये दिवसागणिक वाढणारा रुग्णाचा आकडा आणि मृतांची संख्या, कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी मालेगावच्या रुग्णांना उपचारासाठी येऊ देण्यास नाशिक व धुळ्यातील जनतेचा सक्त विरोध, नीट उपचार मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये व्यवस्थेबद्दल खदखदणारा असंतोष अशी चिंताजनक मालेगावात निर्माण झालेली होती. ज्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित असे मालेगाव मधील काही नागरीक प्रशासकीय नियमावलीकडे सपशेल पाठ फिरवत होते. कोरोना हा काही आजार आहे हे मानायलाच एक मोठा वर्ग प्रारंभी राजी होत नव्हता. झोपडपट्टयांचे शहर अशी ओळख असलेल्या मालेगावात आरोग्य विषयक जागृतीचा अभाव असल्याने कोरोनाशी दोन हात करणे प्रशासनापुढे मोठे आव्हान होते.
त्यानुसार परस्परांबद्दलच्या आपुलकीचा खुबीने वापर करत कडासने हे गेली पंचवीस दिवस कोरोना विरुद्ध लढण्यासाठी शहरवासीयांना साद घालत आहेत. त्याला सकारात्मक व चांगला प्रतिसाद मिळत असून सद्यस्थितीत करोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असलेले यश, लोकांमध्ये रुजत चाललेली जागृकता व त्यांच्या मानसिकतेत होणारा सकारात्मक बदल यात कडासने यांची एकंदरीत भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र आहे.
पोलीस नागरीकांचे मित्र आहेत हे वास्तव कडासने यांच्या कार्यशैलीतून ठळकपणे दिसून येते. याआधी चार वर्षे मालेगावला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असतांना मालेगाव मधील नागरीकांच्या मनात त्यांनी विश्वाास निर्माण केला होता. त्यामुळेच गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत झाली होती. मुस्लिमबहुल मालेगावाची गरज ओळखून तेव्हा त्यांनी उर्दू व अरबी या भाषा शिकून घेतल्या. शांतता, कायदा व सुव्यवस्था तसंच सार्वजनिक हितासाठी त्यांनी कुराणामधील आयतांचा दाखला लोकांना दिला. त्यामुळे मुस्लिम समाजात आपला माणूस अशी एक प्रतिमा त्यांची निर्माण झाली. त्यांची ही शैली प्रशासनाला मदतीची ठरली. करोना आजाराच्या जनजागृतीसाठी ते आता जेव्हा शहरातील गल्लीबोळातून फिरत असतात त्यावेळी आबालवृद्धांकडून त्यांच्यावर केली जाणारी फुलांची उधळण हे त्याचंच द्योतक. लोकांना धाकदपटशा दाखवण्यापेक्षा त्यांच्या खऱ्या अडचणी समजून घेत आणि त्यांना वास्तवाची जाणीव करुन देऊन कार्यप्रणाली अंमलात आणली तर ती अधिक लाभदायक व परिणामकारक ठरते असं कडासने म्हणतात. त्यानुसार त्यांनी लोकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शहरात एकीकडे करोनाने थैमान मांडले असतांना अनेक रुग्णालये बंद होती. अन्य आजार असलेल्या रुग्णांची हेळसांड सुरू होती. ही हेळसांड थांबविण्यासाठी त्यांनी आपल्या पातळीवर प्रयत्न सुरू केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच महापालिकेतर्फे चौदा युनानी डॉक्टरांची नियुक्ती झाली. खाजगी डॉक्टरांना संरक्षण साधने पुरवण्यात आल्यानंतर शहरातील सर्व खाजगी रुग्णालये सुरू झाली. टाळेबंदीमुळे यंत्रमाग बंद असल्याने मजुरांना रोजीरोटीचा प्रश्न सतावत असल्याचे बघून यंत्रमाग कारखाने सुरू करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार शासनाची परवानगी प्राप्त झाल्यावर पहिल्याच दिवशी शहरात सहा हजार यंत्रमाग सुरू होऊ शकले. आजच्या घडीला प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सुमारे सव्वा लाख यंत्रमाग सुरू झाले असून लवकरच सर्व कारखाने सुरू होऊन शहर पूर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर घरोघरी जाऊन रुग्ण शोध मोहिमेचे काम करणाऱ्या आशा वर्कर महिलांच्या प्रती त्यांनी अशीच संवेदना प्रकट केली. दरमहा अवघ्या दोन हजार रुपये मानधनावर डॉक्टरांप्रमाणेच दिवसभर जोखीम उचलणाऱ्या या महिलांचे मानधन वाढवून देण्याची सूचना त्यांनी केली. त्यानुसार महापालिकेने हजार रुपयांची वाढ केली. महसूल खात्यातर्फे धान्य पाकिटांची मदतही त्यांनी या महिलांना मिळवून दिली.
#नवीउमेद #कोरोना
Charushila Kulkarni
Post a Comment