शिर्डी,प्रतिनिधि जय शर्मा )कोपरगाव तालुक्यात नोव्हेल कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्या पार्श्वभूमीवीर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल (केशरी शिधापत्रिकाधारक) धारकांना मे,2020 व जून,2020 या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे. कोपरगाव तालुक्यात 16 हजार 777 शिधापत्रिकाधारक असून एकूण 65 हजार 146 लाभार्थी आहेत. त्यांना 3 हजार 6 क्विंटल गहू व 2 हजार 3 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. गहू 8 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिमाह 2 किलो असे एकूण पाच किलो अन्नधान्य वितरीत करण्यात येणार आहे.
शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल, तरी त्या शिधापत्रिकाधारकांना विहीत केलेल्या दराने व परिमाणात धान्य देण्यात येणार आहे. तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकेवर बारा अंकी नोंदणी क्रमांक नाही त्या शिधापत्रिकाधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारींचे तेथेच निराकरण होईल याची दक्षता सर्व संबधितांनी घ्यावी. असे आवाहन तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार, कोपरगांव योगेश चंद्रे यांनी केले आहे.
Post a Comment