शिर्डीतील हॉटेल व्यवहारात ‘भाडेकरार’च्या नावाखाली कोट्यवधींची सावली; नागपूर कनेक्शनमुळे प्रकरण तापले
शिर्डी येथील व्यावसायिक सुनील तोलानी यांच्या हॉटेलसंदर्भात उघड झालेल्या आर्थिक वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. नागपूर येथील एका व्यावसायिकाने हॉटेल भाड्याने घेतल्याचा आभास निर्माण करून काही नागरिकांकडून पैशांची उकळपट्टी केली, थकीत रक्कम न भरता पलायन केले आणि उलट हॉटेल मालकांवरच गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या घडामोडींमुळे शिर्डी–नागपूर व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
५ लाखांवरून ३ लाखांवर ठरलेली ठेव; कराराआधीच अटी बदलण्याचा खेळ
जानेवारी महिन्यात रेस्टॉरंट सुरू करण्याच्या तयारीदरम्यान संबंधित व्यावसायिकाने जागा भाड्याने घेण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला ५,००,००० रुपये ठेव व ६०,००० रुपये मासिक भाडे अशी स्पष्ट अट ठेवण्यात आली होती. मात्र मैत्रीच्या नात्याने आणि मदतीच्या भूमिकेतून अटी शिथिल करत ३,००,००० रुपये ठेव व ५०,००० रुपये मासिक भाडे असा तडजोडीचा निर्णय झाला.
कराराची तोंडी पुष्टी देत “मी सर्व जबाबदारी स्वीकारतो” असे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ठेवीपोटी केवळ ९८,००० रुपयेच अदा करण्यात आले. उर्वरित २,०२,००० रुपये तसेच तीन महिन्यांचे भाडे थकवण्यात आले. करार अंतिम होण्यापूर्वीच आर्थिक शिस्त ढासळल्याचे स्पष्ट झाले.
२४ जूनचा करार; ‘गाडीत पैसे आहेत’ म्हणत नागपूरला पलायन
२४ जून रोजी कोपरगाव येथे औपचारिक करार करण्यात आला. त्या वेळी २,५०,००० रुपये (२ लाख ठेव + ५० हजार भाडे) देणे अपेक्षित होते. करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर संबंधिताने “पैसे गाडीत आहेत” असे सांगून सर्वांना बाहेर बोलावले. काही क्षणातच विधान बदलत “पैसे शिर्डीत विसरलो” असे कारण देत तो थेट नागपूरला रवाना झाला.
या घटनेनंतर काही दिवसांनी तो परत आला आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र थकीत रक्कम भरल्याशिवाय परवानगी देणार नाही, अशी ठाम भूमिका तोलानी कुटुंबाने घेतली.
खोट्या नोटिसा, बनावट तक्रारी आणि दबावतंत्राचा आरोप
थकीत रक्कम न भरता उलट संबंधिताने लाईट मीटर नसल्याची खोटी नोटीस पाठवली. प्रत्यक्षात मीटर आधीच बसवलेला असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर बजाज नगर पोलिस ठाण्यात २५,००० रुपये उकळल्याची तक्रार दाखल केल्याचे समोर आले.
याचबरोबर “वन व्यापार” केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. सतत खोटे आरोप, बनावट एफआयआर आणि पोलिस तक्रारींच्या माध्यमातून मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप हॉटेल मालकांकडून करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्यांची तक्रार; रोहन तोलानी यांना अटक
दरम्यान, काही नागरिकांनी संबंधित व्यावसायिकावर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार केल्याचे सांगितले जाते. तो फरार झाल्यानंतर त्यांनी थेट हॉटेल मालकांवरच गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर राहुल तोलानी यांना नागपूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मूळ व्यवहार आणि तृतीय पक्षातील आर्थिक देवाणघेवाण याचा गुंता अधिकच वाढला आहे.
“सर्व पुरावे आमच्याकडे”; कायदेशीर लढाईसाठी सज्ज
पेमेंट रेकॉर्ड, बँक व्यवहार, करारपत्र, संदेश, सीसीटीव्ही फुटेज व कॉल लॉग असे सर्व ठोस पुरावे आपल्या ताब्यात असून आवश्यकतेनुसार न्यायालयात सादर करू, अशी भूमिका तोलानी कुटुंबाने स्पष्ट केली आहे. खोट्या तक्रारींविरोधात कायदेशीर पावले उचलण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे शिर्डी व नागपूर व्यापारी क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरे तथ्य तपासाअंतीच स्पष्ट होणार असले तरी ‘भाडेकरार’च्या नावाखाली सुरू झालेल्या या वादाने आता गुन्हेगारी स्वरूप धारण केल्याचे चित्र आहे. प्रशासनाने सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.


Post a Comment