Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी - करोनाचा वाढता संसर्ग आणि संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनामास्क कारवाईवर जोर दिला आहे. अहमदनगर शहरातील कोतवाली, तोफखाना हद्दीत कारवाई करण्यात येत आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. तरीही अनेकजण विनामास्क फिरत आहेत. अशा व्यक्तींवर तोफखाना पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत 53 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.ओमिक्रॉन आणि कोविडच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक प्रतिबंध लागू केले आहेत. याबाबतची नियमावलीही जाहीर झाली आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही प्रभारी अधिकार्‍यांना आपापल्या हद्दीत या नियमावलीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे तोफखाना पोलिसांची सकाळ-संध्याकाळ कारवाई सुरू आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून दंड वसूल केला जात आहे.शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात तोफखाना पोलिसांनी रविवारी सकाळपासून नाकेबंदी करीत विनामास्क वाहनचालकांना अडवून दंड वसूल केला. गेले दोन ते तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन दिवसांत सुमारे 53 हजारांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.



श्रीरामपूर प्रतिनिधी - श्रीरामपूर नगरपालिकेच्या सदस्य मंडळाची मुदत संपली असून नगरपालिकेचे काही माजी पदाधिकारी पदाचा गैरवापर करताना आढळून येत आहे. त्यांचा हस्तक्षेप त्वरीत बंद करावा, या मागणीचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रशासकिय अधिकारी अनिल पवार यांना दिले आहे.महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदी व विशेष संदर्भ क्रमांक 1 अन्वये अंतर्भूत केलेल्या 317 (3) कलम मधील तरतुदीनुसार श्रीरामपूर नगरपालिकेची मुदत संपली असल्याने श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार यापूर्वी कार्यरत असलेल्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने माजी पदाधिकार्‍यांना जसे की नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या दालनासमोर नावाच्या पाट्या त्वरित काढून घेण्यात याव्यात.आजही माजी नगराध्यक्षा यांचे स्वीय सहाय्यक व इतर कार्यकर्ते हे नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करत आहेत. नगरपालिका कर्मचार्‍यांना धमकावत आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या दैनंदिन कारभारावर गंभीर परिणाम होत आहेत. म्हणून सदर व्यक्तींना नगरपालिका आवारात मज्जाव करण्यात यावा. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांचे दालन तसेच समिती हॉल व जनरल मिटींग हॉल बंद करण्यात यावे. अशा आशयाचे विनंती निवेदन प्रशासकिय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांना देण्यात आले असून निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेस शहराध्यक्ष संजय छललारे, श्रीनिवासन बिहाणी, दिलीप नागरे,हाजी मुजफ्फर शेख, मनोज लबडे, श्रीमती भारती परदेशी, मिराताई रोटे, आशाताई रासकर यांच्या सह्या आहेत.


अहमदनगर-  जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक बसून, एकंदरीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी माझ्या संकल्पनेतील टुप्लस योजना सर्वच पोलिस ठाण्यात  प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाई केलीच, पण त्याच्या गुन्हेगारी हालचालीवर पोलिस प्रशासनाला बारकाईने लक्ष ठेवाता आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके, नूतन नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे हे उपस्थित होते.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज  पाटील पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व संबंधित आरोपीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाईसाठी अहमदनगर जिल्हयात २०११ पासून प्लस योजना कार्यान्वयीत करण्यात आली.  योजनेसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कमी कालावधीत टुप्लस योजनेसाठी लागणारी माहिती तात्काळ उपलब्ध होण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर आणि स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर येथे एक पोलिस अधिकारी व दोन पोलिस अंमलदार यांची टुप्लस पथक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याकडून  मालाविषक ज्या दोनदोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची सन २०११ पासून माहीती संकलित करण्यात आली. शरीरविषयक ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची सन २०१५ पासून माहीती संकलित करण्यात आली.  संकलित केलेली माहीती टु प्लस पथकामार्फत टु प्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आलेली आली.अहमदनगर जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२१ पासून टुप्लस योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुरुवातीस ३८४९ (मालाविषयक-१९१४,शरीरविषयक -१९२७) आरोपींचा टुप्लस योजनेमध्ये  समावेश करून त्यांची संकलित केलेली  माहिती टुप्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आली होती.जानेवारी २०११ पासून ते आजपावेतो दैनंदिन अटक आरोपीमधून नव्याने १००२ (मालविषयक ४९२, शरीराविषयक १९२७ ) आरोपी टुप्लस योजनेमध्ये समावेश करून त्यांची संकलित केलेली माहिती टुप्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आलेली आली आहे.जानेवारी २०२१ पासून ते आजरोजी पर्यंत दैनंदिन अटक आरोपींमधून नव्याने १००२ (मालविषयक ४९२, शरीराविषयक,५१०) आरोपी निष्पन्न करण्यात करण्यात आले असून आजपोवतो ४८४३ आरोपी वेबसाईटवर माहिती  भरण्यात आलेली आली आहे. ४८ ४३ आरोपीमध्ये मालाविरुद्ध एकूण २४०६ गुन्हेगार आहेत.  शरीराविरुध्द २४३६ गुन्हेगार आहेत. मालाविरूध्द गुन्हे करणारे २४०६ गुन्हेगारांमधून ५७० सराईत , प्रोफेशनल, व्यवसाईक गुन्हेगार निवडून त्यांची माहिती प्रोफेशनल क्रिमिनल वेबसाईटवर भरण्यात आलेली आहे. अशा टुप्लस वेबसाईटवर सामाविष्ठ ४८४३ आरोपींमधून आजपावेतो मालाविषयक २५० व शरीरविषयक १५१ अशा एकूण ४०१ टोळ्या निष्पन्न करण्यात आल्या आहे.  ज्या क्रियाशिल टोळया आहेत, अशा टोळयांवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.आरोपींचे मेळावे घेतली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये  जानेवारी २०२१ पासून टुप्लस योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर सुरुवातीस ३८४१ आरोपींचा टुप्लस योजनेमध्ये समावेश करण्यात आला.  अशा आरोपीचे गुन्हयांसंबंधी मत परिवर्तन करण्यासाठी अहमदनगर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला आरोपीचे मेळावे घेण्यात आले. मार्गदर्शन करण्यासाठी समाज प्रबोधनकार कायदातज्ञ व्यक्ती, न्यायाधिश यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते. काही ठिकाणी  स्वतः भेट देवून आरोपींना मार्गदर्शन केले. मेळाव्यात   आरोपीचे फोटो, फिंगर प्रिंट तसेच इतर माहीतीचे फॉर्म भरुण घेण्यात आले, असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.


मुंबई,नाशिक-गेल्या तीन दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एकीकडे राज्याच्या चिंतेत भर पडलेली असतानाचा नाशिकमध्येही काल (दि ३०) ओमायक्रोनचा रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे....राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून टास्क फोर्स आरोग्य विभागाच्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय जारी करण्यात आला आहे.राज्याने घेतलेला निर्णय जसाच्या तसा नाशिक जिल्ह्याला लागू होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे  यांनी म्हटले आहे. राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार सांस्कृतिक, धार्मिक , राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्याला  केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. ३१ डिसेंबरला होणारी गर्दी लक्षात घेता पर्यटनस्थळावर जमावबंदी  लागू करण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.करोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील असेही काल मध्यरात्री जारी करण्यात आलेल्या नियमावलीत म्हटले आहे. राज्यात तब्बल ५ हजार ३६८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २२ रुग्ण दगावल्याची नोंद आहे. राज्यात काल(दि ३०) एकूण १९८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.राज्यात आतापर्यंत ४५० ओमायक्रॉनबाधितांची नोंद  झाली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर बेलापुर रोडवर असलेल्या ओम साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या नेहे यांच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी जवळपास आडीच लाख रुपयाचा ऐवज लंपास केला                                              या बाबत मिळालेली माहीती अशी की सर्व प्रथम चोरट्यांनी प्रकाश पाटील नाईक याच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु आवाजाने युवराज नाईक यांना जाग आली त्यांनी तातडीने घरातील सर्व लाईट लावले त्यामुळे चोरट्यांनी तेथुन काढता पाय घेतला त्यानंतर चाँदनगर येथे प्रवेश केला स्थानीक नागरीकांनी चोरट्यांना

पहाताच पोलीसांना फोन केला पोलीस गाडीच्या सायरनच्या आवाजामुळे चोरटे तेथुन पुढे सरकले त्या नंतर नवले वस्तीवरील दादा कुताळ यांच्या वस्तीवर ते गेले तेथेही लोक जागे असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा ओम् साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या बाळासाहेब नेहे यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवीला तेथे त्यांनी पाठीमागील दरवाजाला लाथ मारली दोन ते तीन लाथात तो लाकडी दरवाजा उघडला गेला चार जणांनी घरात प्रवेश केला एक जण बाहेर पहारा देत होता घरात बाळासाहेब नेहे व त्यांची पत्नी पुष्पा हे दोघेच होते त्यांना एका बाजुला बसवुन चोरट्यांनी घरात उघका पाचक केली घरातील सोन्याची अंगठी पपोत गळ्यातील मनीमंगळसूत्र कानातील झुबे असा चार तोळे दागीने व ५७ हजार रुपये रोख घेवुन चोरट्यांनी अवघ्या दहा मिनीटात तेथुन पोबारा केला पावणे तीन वाजता उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना दादा कुताळ यांनी चोर आल्याचे कळविले त्यामुळे त्यांनी तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश दिला परंतु तोपर्यत चोरटे आपले काम फत्ते करुन पळून गेले घटना घडताच काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर कुऱ्हे वस्तीकडे कुत्री भुंकण्याचा आवाज आल्यामुळे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ हे पोलीस त्या दिशेने गेले परंतु तोपर्यत दरोडेखोर पसार झाले होते काही वेळातच पोलीस निरीक्षक संजय सानप फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले अहमदनगर गुन्हा अन्वेषनची टिमही घटनास्थळी पोहोचली श्वानपथक तसेच ठसे तज्ञांनाही बोलविण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली चोरटे मराठीत बोलत होते पुष्पा नेहे यांच्या कानातील दागीना लवकर निघाला नाही त्या वेळी निघत नसेल तर राहु द्या काढु नका असेही दरोडेखोर म्हणाले.


श्रीरामपूर प्रतिनिधी-कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी श्रीरामपुरातील आपले काम आटोपून पुन्हा आपल्या गावी जात असताना पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्या शेतकर्‍यास चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम, मोबाईल व मोटारसायकल घेऊन पसार झाले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी नानासाहेब लक्ष्मण नेहे हे त्यांच्या एमएच 17-बीसी 6022 हे मोटारसायकलवरुन ते त्यांच्या दौडेवाडी या गावी चालले होते. श्रीरामपूर एमआयडीसी जवळील यशवंत बाबा चौकी याठिकाणी पाठिमागून पल्सर या मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या मोटारसायकलला आडवी लावून त्यांना थांबण्यास भाग पाडले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत तुमच्याकडील रोख रक्कम काढा असे म्हणताच यांनी त्यांच्या खिशातून 250 रुपये रोख काढून दिले. तसेच त्यांच्याकडे असलेला मोबाईल व मोटारसायकल या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नानासाहेब लक्ष्मण नेहे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम 392, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप व त्यांच्या पोलीस पथकाने भेट देऊन पहाणी करत चौकशी केली.


श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहर पोलिसांनी काल रात्री दोन वेगवेगळ्या घटनेत शहरातून एक गावठी कट्टा व काडतूस तसेच धारदार तलवार अशी हत्यारे जप्त केली. याप्रकरणी शहरातील वॉर्ड नं. 1 व वॉर्ड नं. 2 मधील दोन तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.याप्रकरणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी शहर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यांतर पोलिसांच्या पथकाने पहिल्या घटनेत वॉर्ड नं. 1 गोंधवणी रोड, लबडे पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर रात्री 11.50 च्या सुमारास हातात धारदार तलवार घेऊन आरडाओरड करताना इरफान सय्यद याला पकडले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल महादेव नरवडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून इरफान सय्यद (वय 19, रा. मिल्लतनगर, वार्ड नं. 1, श्रीरामपूर) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुरनं. 868 दाखल करण्यात आला. पोलीस नाईक पवार पुढील तपास करीत आहेत.तर दुसर्‍या घटनेत श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 सुलताननगर भागात रात्री 12.10 च्या सुमारास पोलिसांनी जोएब शेख याच्याजवळून सिल्व्हर रंगाचे देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतूस ताब्यात घेतले. त्यावर 7.62 असे छापलेले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक पंकज विजय गोसावी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून जोएब अन्सार शेख (वय 28, रा. काझीबाबा रोड, वार्ड नं. 2 श्रीरामपूर) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुरनं. 869 दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार विठ्ठल पाटील हे पुढील तपास करीत आहेत.पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी दोन्ही घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर या घटनेतील इरफान सय्यद व जोएब शेख या दोघांनाही अटक करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget